सुपरस्पाय

भारतातील दहशतवादी हल्ले हे पाकिस्तान पुरस्कृत आहेत, हे सर्वश्रुत आहे. अशा घटनांवर भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. अशा स्थितीत पराग जैनसारख्या अधिकाऱ्याकडे ‘रॉ’चे नेतृत्व येणे, हा देशाच्या सुरक्षात्मक रणनीतीचाच भाग असेल.

Story: संपादकीय |
11 hours ago
सुपरस्पाय

पाकिस्तानकडून भारताला वारंवार डिवचले जात असताना आणि शेजारील देशांचे कुकारनामे सुरू असताना पाकिस्तानला वरून खालून ओळखून असलेले, पाकिस्तानच्या कुरापतींबाबत जाण असलेले देशाचे ‘सुपरस्पाय’ म्हणून ओळख असलेले आयपीएस पराग जैन यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी नियुक्ती होणे याला महत्त्व आहे. पाकिस्तानमधून भारतात होत असलेले दहशतवादी हल्ले मोडून काढण्याचे आव्हान असो किंवा भारताची जगासमोर पाकिस्तानच्या विरोधातील भूमिका असो, हे सगळे स्पष्ट करून सांगताना अनेक आव्हाने देशासमोर उभी राहत आहेत. अशा मोक्याच्या वेळी पराग जैन यांची नियुक्ती ही निश्चितच देशाच्या गुप्तचर यंत्रणेलाही बळ देणारी आहे. पराग जैन यांची आतापर्यंतची कारकीर्द आणि त्यांचे कार्य यामुळे त्यांना भारताचे ‘सुपरस्पाय’ असेही संबोधले जाते.

हल्लीच पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’साठी आवश्यक असलेली पाकिस्तानातील दहशतवादी तळांविषयीची तसेच तिथल्या सुरक्षा यंत्रणांच्या लपण्याच्या ठिकाणांबद्दल गुप्त माहिती मिळवण्यात पराग जैन यांचे विशेष योगदान होते. त्यापूर्वी काश्मीरमधून ३७० कलम हटवताना सुरक्षात्मक दौऱ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी श्रीलंकेतही काही काळ कार्यभार संभाळला. त्यांच्यातील नेतृत्व गुणांच्या अनेक कथा पंजाब पोलीस दलात प्रसिद्ध आहेत. विश्लेषणात माहीर, दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आवश्यक गोष्टींचा अभ्यास असलेला अधिकारी ‘रॉ’चा प्रमुख होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कॅनडामध्ये असताना तिथे सुरू असलेल्या खलिस्तानींच्या कारवायांचे ट्रॅकिंग करण्यात जैन यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती, हे विसरता येणार नाही. देशात आणि विदेशात अनेक पदांवर काम केल्यानंतर सध्या ते ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’चे प्रमुख होते. ‘रॉ’मध्ये विद्यमान क्रमवारीत ते दुसरे वरिष्ठ अधिकारी होते. ‘रॉ’चे प्रमुख रवी सिन्हा हे निवृत्त होत आहेत. दोन वर्षांपूर्वी सिन्हा यांची ‘रॉ’चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. ‘रॉ’मध्ये दीर्घकाळ सेवा केल्यानंतर रवी सिन्हा ‘रॉ’चे प्रमुख झाले होते. त्यांनी ‘रॉ’ला बळकटी देण्यासाठी केलेल्या कार्याला आता त्यांचे उत्तराधिकारी असलेले पराग जैन पुढे नेतील. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत ‘रॉ - रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ची भूमिका, कार्य महत्त्वाचे असते. या संस्थेचे कार्य पुढे नेताना भारताला कमकुवत करण्यासाठी शत्रू देशांकडून सुरू असलेल्या गोष्टींची माहिती मिळवण्याचे मोठे काम जैन यांच्या नेतृत्वाखाली पुढे ‘रॉ’ला करावे लागेल. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी आणि तांत्रिक गुप्तचर माहिती मिळवणे, ज्यात सीमावर्ती भागातील मानवी दहशतवादी कारवाया, मानवी गुप्तचर तसेच सायबर धोके ओळखणारा, रणनीतीमध्ये निपुण अधिकारी ‘रॉ’चे नेतृत्व करतो, हे देशासाठीही फार महत्त्वाचे आणि अभिमानाचे आहे.

पराग जैन १९८९ च्या पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी. पंजाबमधील खलिस्तानी कारवाया मोडून काढण्यासाठी जैन यांचे मोठे योगदान आहे. पंजाबमध्ये भटिंडा, मान्सा, होशियारपूरमध्ये एसएसपी म्हणून त्यांनी काम पाहिले. शिवाय चंदीगडमध्ये ते एसएसपी होते. लुधियानात डीआयजी होते. त्यांनी काश्मीरमध्येही सेवा दिली आहे. सध्याच्या काळात मानवी दहशतावादाचा धोका आणि तांत्रिकदृष्ट्या देशाला दिसत असलेले संभाव्य धोके यांना ओळखण्याची क्षमता असलेला अधिकारी म्हणून पराग जैन यांच्याकडेच पाहिले जाते. 

सध्याच्या स्थितीत देशासमोरील सुरक्षेसंबंधीची आव्हाने फार क्लिष्ट होत चाललेली आहेत. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तान आणि चीनविषयी वेळोवेळी आपली भूमिका मांडली असली तरीही काही देशांकडून पाकिस्तानला मदत केली जाते. पाकिस्तानमधून येणारे दहशतवादी असो वा सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणारे उल्लंघन असो, चीनमध्ये झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार देणे, हाही भारताच्या दहशतवादविरोधी ैभूमिकेचा भाग आहे. दहशतवादाविषयी भारताने संयुक्त निवेदनात उल्लेख हवा अशी भूमिका घेतली होती. पण त्याला एका देशाने विरोध केल्यामुळे भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली. भारतातील दहशतवादी हल्ले हे पाकिस्तान पुरस्कृत आहेत, हे सर्वश्रुत आहे. अशा घटनांवर भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. अशा स्थितीत पराग जैनसारख्या अधिकाऱ्याकडे ‘रॉ’चे नेतृत्व येणे, हा देशाच्या सुरक्षात्मक रणनीतीचाच भाग असेल. गोपनीयता आणि गुप्तचर माहिती यात अग्रेसर असणारी ‘रॉ’ थेट कधी समोर येत नाही, त्यामुळेच देशाच्या सुरक्षा यंत्रणेत ‘रॉ’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे.