स्वर्गेच्छेने सोमयज्ञ : कल्पवृक्षातळी पापांची भीक मागणे!

तीनही वेदांमध्ये पारंगत होऊनही असे शेकडो यज्ञ स्वर्गसुखाची आस मनी धरून जरी केले, तरी जर ते त्यांचे फळ मला अर्पण करणार नसतील तर ते कल्पतरूखाली बसून भीक मागण्यासारखेच आहे!

Story: विचारचक्र |
10 hours ago
स्वर्गेच्छेने सोमयज्ञ : कल्पवृक्षातळी पापांची भीक मागणे!

मा    गील लेखात आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या ९ व्या अध्यायाच्या १८ व्या श्लोकाच्या विस्तृत विवेचनाच्या शेवटापर्यंत आलो होतो. जगाच्या उत्पत्तीचे कारण असलेला अती सूक्ष्म वासनास्वरूप जो आदी संकल्प वा मूळ संकल्प आहे, तो जिथून आपला आकार प्राप्त करतो व कल्पक्षयान्ती जिथे विसावतो ते स्थानही मीच आहे, हे समजून घे असे श्रीकृष्ण म्हणत होते. अर्जुना, हे लक्षात घे की, तेही निराकारी अंतिम निधान जिथे शेवटी सगळी नावे आणि रूपे विरून जातात, जिथे शेवटी सगळ्या वर्ण-व्यक्ती आटून जातात, जिथे शेवटी सगळे जाती - भेद नष्ट होतात आणि जिथे अगदी सगळे संकल्प-वासना-संस्कार पुनश्च या चराचराची रचना करण्यास दीर्घ विश्रांतीसाठी जाऊन विसावतात, तेही मीच आहे!


तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन।।१९।।


सरळ अर्थ : आणि मीच सूर्यरूप बनून तपतो, पर्जन्याला आकर्षित करतो आणि वृष्टी करितो आणि हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू एवं सत् व असत्, सगळे काही मीच आहे.

विस्तृत विवेचन : सूर्याच्या रूपाने मीच प्रखर ऊन पाडून सर्व विश्व शुष्क करतो. मग मीच इंद्र होऊन पाऊस पाडल्यावर परत सगळीकडे समृद्धी येते. अग्नी काष्ठ भक्षण करतो तेव्हा ते काष्ठच अग्निरूप होते. तसेच जे जे काही माझे स्वरूप आहे, त्या त्या सर्वांचे सृजन आणि विनाश मीच करतो. विनाश होणाराही मीच, विनाश करणाराही मीच आणि विनाशही मीच. अखिल वस्तुमात्रात जे काही अविनाशी तत्व आहे, तेही मीच आहे. जास्त बोलून सांगण्यापेक्षा एकदाच सांगतो की जे जे काही अविनाशी आहे, ते सर्व आणि जे जे काही नाशिवंत आहे तेही सर्व मीच आहे. म्हणून मी नाही अशी जागाच नाही आणि सर्वत्र सदैव संपूर्ण मीच मी भरून राहिलेलो आहे. पाणी आहे म्हणून लाट आहे आणि दिवा आहे म्हणून उजेड आहे, तसे मी आहे म्हणून हे सगळे विश्व आहे. या सगळ्या विश्वात मीच एक भरून राहिलेलो आहे आणि हे सगळे त्रैलोक्य माझेच रूप आहे. असे असूनही नवल काय घडते, ते बघ. हे सगळे प्राणी हे माझेच रूप असूनही म्हणजे मीच असूनही ते मला जाणत नाहीत. त्यांचे विपरीत कर्म (मुख्यतः मानसिक) त्यांच्या आड येते, ज्यामुळे ते माझ्या स्वरूपाला न जाणल्याने ईश्वराचे म्हणजे आत्म्याचे (म्हणजे माझे) अस्तित्वच मानत नाहीत! त्यांना पाखंडी किंवा नास्तिक म्हणतात. अमृताच्या विहिरीत पडूनही मला बाहेर काढा असे जो म्हणतो, त्याला काय म्हणावे? करंटाच तो! एखादा आंधळा जसा जवळ असलेले अन्न न दिसल्याने अन्नसाठी इकडे तिकडे वणवण धावत असतो, तशी त्याची स्थिती असते. वाटेत चिंतामणीवर (म्हणजे असा एखादा काल्पनिक दगड किंवा मोती जो काय हवे ते मागितलेले देतो) जरी पाय पडला तरी (तो चिंतामणी आहे हे न कळल्याने) त्याला लाथाडून तो पुढे जातो. तद्वतच आपल्याच जवळ ज्ञान असूनही ते न कळल्याने प्राणी तिकडे लक्ष देत नाहीत! आणि ज्ञानेवीण जे काही केले जाते ते व्यर्थच होय. आंधळ्या गरुडाचे पंख कितीही चांगले असले तरी त्यांचा काय उपयोग? तसे ज्ञानाशिवाय केलेल्या सत्कर्माच्या सायासांचाही काही उपयोग होत नाही. ते फुकट जातात!


त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा

यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक

मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ।।२०।।


सरळ अर्थ : परंतु जे तिन्ही वेदांमध्ये विधान केलेली सकामकर्में करणारे व सोमरस पिणारे तसेच पापापासून पवित्र झालेले पुरुष माझे यज्ञद्वारा पूजन करून स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात, ते पुरुष आपल्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवांचे भोग उपभोगतात.

विस्तृत विवेचन : या श्लोकाचा सरळ अर्थ साधा आहे. वर्णाश्रम धर्म (म्हणजे वर्ण आणि आश्रम यास साजेसे कर्तव्य. वर्ण म्हणजे स्वभाव-गुणांवरून केलेले-झालेले- समाजाचे चार बृहद् वर्ग. पुढे हे वर्ण जन्मावरून ठरूं लागले, त्यांच्यातून जाती निर्माण झाल्या. वर्ण चार आहेत ते असे : १) ब्राह्मण : ज्ञान मिळवून ते समाजाला देणारा. २) क्षत्रिय : शूरपणाने समाजाचे संरक्षण करणारा. ३) वैश्य : शेती, व्यापार इत्यादी उद्योगांनी संपत्ती उत्पन्न करणारा. ४) शूद्र : वरील तिन्ही वर्णांची सेवा करणारा) ज्याला म्हणतात त्याला अनुसरून जे चालतात ते म्हणजे विधिमार्गासाठी एक प्रकारची परीक्षा असतात! त्यांच्यातर्फे जेव्हा यजन होत (म्हणजे यज्ञ प्रक्रिया केली जाते) तेव्हा तिन्ही वेद कौतुकाने मान डोलवतात. ती यज्ञक्रिया मूर्तिमंत होऊन हातात फळभोग घेऊन त्यांच्यापुढे उभी राहते! असे दीक्षा घेतलेले यज्ञमूर्ती सोमरसपान करतात.

सोमरसपान म्हणजे सोम नावाच्या वेलीचा रस पिणे. वेदांमध्ये सांगितलेल्या काही यज्ञकर्मांत सोमवल्ली नावाच्या एका वनस्पतीचा रस काढून तो देवांना अर्पण करीत व शेष भाग यज्ञकर्ते प्राशन करीत. सोमयाग करून सोमरस पिणे हे अत्यंत पुण्यकारक समजले जात असे. या सोमरसात मद्याचे काही गुण असावेत, असे काहींचे म्हणणे आहे.

अशारितीने माझे यजन-याजन-अर्चन करताहेत असे मानून ते आपल्या चित्ती स्वर्गसुख-भोगाची वाञ्छा करतात! हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. पण गर्भित अर्थ वेगळा आहे! तीनही वेदांमधे पारंगत होऊनही असे शेकडो यज्ञ स्वर्गसुखाची आस मनी धरून जरी  केले, तरी जर ते त्यांचे फळ मला अर्पण करणार नसतील (म्हणजे अर्थातच त्या फलेच्छेमुळे स्वर्गसुखाच्या वासनेने भरून राहणार असतील) तर ते कल्पतरूखाली बसून भीक मागण्यासारखेच आहे! पुण्यवान होण्याऐवजी पापात्मा होण्यासारखेच आहे!

(क्रमशः)




- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३