द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सत्तेच्या जोरावर पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेची उमेदवारी देऊन कमल हसन यांची प्रचारासाठी मदत घेण्याचा त्यांचा इरादा आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका जरी पुढील वर्षी एप्रिलमध्ये असल्या तरी राजकीय हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत. वर्षभर आधीपासून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणे ही भाजपची कार्यपद्धत राहिली असली तरी आता सारेच पक्ष पूर्वतयारीला लागतात, असे चित्र दिसते. तामिळनाडूवर भाजपने लक्ष केंद्रित करण्यामागील कारण तसे स्पष्ट आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपची टक्केवारी फक्त ३.६ होती, ती २०२४ मध्ये तब्बल तीन पट वाढून ११.२४ झाल्याने पक्षातील उत्साह वाढणे साहजिक आहे. यामागील कारणेही सांगता येतील.
भाजपने दरवेळी अण्णा द्रमुकशी जशी युती केली, त्याचप्रमाणे कमी मतदार संख्या असलेल्या जातींवरही लक्ष केंद्रित करताना पीएमके, एएमएमके अशा लहान पक्षांशीही जागावाटप करीत एनडीए अधिक मजबूत केली. वन्नियार, थेवर आणि दलित अशा मतदारांपर्यंत भाजपने धडक दिली. के. अन्नामलाई सारख्या उमद्या नेत्याच्या सहाय्याने तळागाळात पक्षबांधणीवर भर तर दिलाच, तसेच युवकांना आकर्षित केले. दोन्ही प्रादेशिक पक्षांना आव्हान देताना भाजपने आपली प्रतिमा राष्ट्रवादी, विकासाला प्राधान्य देणारी आणि स्वच्छ अशी तयार करण्यात यश मिळवले. सोशल मीडियाचा वापर करताना स्थानिक भाषेला प्राधान्य देत युवा वर्गापर्यंत संपर्क साधला. केवळ राष्ट्रीय प्रश्नांना जनतेसमोर नेताना, रस्ते, पाणी, कायदा व सुव्यवस्था यावर अधिक भर दिल्यांने हा पक्ष जनतेला जवळचा वाटायला लागला. ओबीसी व दलित समाजाला द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे पक्ष आपली उपेक्षा करीत असल्याचे वाटत असतानाच त्या समाजातील नेत्यांना भाजपने सक्रिय केले. त्यामुळे लोकसभेत त्या राज्यात एकही जागा न जिंकताही भाजपने टक्केवारीत लक्षणीय वाढ केली, याची दखल घ्यावीच लागते. राजकीय विश्लेषकांच्या मते, शिक्षित वर्ग वाढला, ज्याने प्रादेशिक पक्षाची तळी उचलण्यास नकार दिला. याच कारणास्तव भाजपने अनेक मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून आपल्यासोबत न आलेल्या पक्षांना तिसऱ्या जागी ढकलून हादरा दिला असे म्हणता येईल. हिंदू मुनानी, या भाजपशी संलग्न असलेल्या संघटनेने आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हिंदू मतांच्या शक्तीला ओळखून मतदान करा, असे आवाहन केले आहे.
भगवान मुरुगन भक्त परिषदेत बोलताना, या गटाने हिंदू एकतेचे आणि हिंदू हक्कांचा आणि मंदिरांचे संरक्षण करण्याचे प्रस्ताव संमत केले आहेत. या परिषदेत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि तमिळनाडूमधील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. द्रमुक सरकारने मंदिरे ही महसुलाची साधने म्हणून न वापरता मंदिराच्या कामकाजासाठी निधीचा वापर करावा, असाही ठराव यावेळी संमत करण्यात आला. पवन कल्याण यांनी कथित सेक्युलरवादी आणि नास्तिकांवर टीका केली आणि इतर धर्मांवर मौन बाळगून हिंदू धर्माला लक्ष्य केले जात असल्याची टीका केली. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाचे चार माजी मंत्री, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन आणि भाजपचे नेते एच. राजा, तमिलिसाई साउंडराराजन आणि वानाथी श्रीनिवासन या संमेलनात सहभागी झाले होते, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल असे दिसते. भाजप अण्णाद्रमुकचे अध्यक्ष एडप्पाडी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे, असे यापूर्वीच ठरले आहे.
दुसरीकडे, द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सत्तेच्या जोरावर पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांना यावेळी अभिनेता कमल हसन यांची साथ मिळेल अशी चिन्हे दिसतात. खुद्द कमल हसन राजकीय पटलावर अपयशी ठरले आहेत. त्यांच्या मक्कल निथी माईम या पक्षाला २०१९ मध्ये ३.७ टक्के मते मिळाली होती, ती घटून २०२४ मध्ये २.६ टक्के एवढी झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्य अधांतरी बनले आहे. तामिळनाडूत १७ ते १८ टक्के मतदार एकाही द्रविडी पक्षाला मतदान करीत नाहीत, त्यामुळे ते आपल्याकडे वळतील हा त्यांचा आशावाद फोल ठरला. अभिनेता म्हणून जनतेला आवडणारी व्यक्ती नेता म्हणून स्वीकारली जाईलच असे नाही, असे यापूर्वीही सुशिक्षित मतदारांनी त्या राज्यात दाखवून दिले आहे. रजनीकांत, विजयकांत आदी नेत्यांची उदाहरणे समोर आहेत. महाराष्ट्रात मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते, कारण त्यांना चांगले वक्तृत्व लाभले आहे. त्यांच्या पक्षाला मात्र मते मिळत नाहीत, तशीच काहीशी अवस्था कमल हसन यांच्याबाबत झाल्याचे दिसते. कमल हसन यांना पाहायला, ऐकायला गर्दी होत असल्याने त्यांच्या भव्य सभा झाल्या होत्या, पण मते मात्र त्यावेळीही द्रमुकलाच मिळाली होती. कमल हसन हे स्वत:ला नास्तिक मानणारे आहेत पण इतर अनेक राजकीय प्रश्नांवर त्यांचे धोरण स्पष्ट नाही. त्यांनी दोन्ही द्रविडी पक्षांच्या अनेक धोरणांवर तीव्र टीका करून राजकीय कारकीर्द सुरू केली, पण हळूहळू द्रमुक हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम सहकारी आहे, असा विश्वास त्यांना वाटू लागला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान केलेल्या करारानुसार, त्यांनी निवडणुकांपासून दूर राहून केवळ द्रमुकसाठी प्रचार केला. त्यामुळे त्यांना राज्यसभेसाठी द्रमुकने उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. याच्या बदल्यात त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ द्रमुक घेईल यात शंका नाही. खरे तर आजची राजकीय स्थिती पाहता, द्रमुकची कसोटीच आगामी निवडणुकीत लागेल, अशी चिन्हे दिसतात. केंद्रात मोदी सरकार, राज्यात भाजपचा वाढता प्रभाव आणि एनडीएत सहभागी पक्ष पाहता, द्रमुकला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. दोन पक्षांना आलटून पालटून सत्ता प्रदान करण्याची तामिळनाडूची आतापर्यंतची प्रथा पाहता, द्रमुकसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, असे म्हणता येईल.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४