कडकडे यांनी गायनाच्या माध्यमातून गावागावांतील घराघरांत आपले स्थान मिळवले यावरून त्यांची गायन शैली ही वेगळी, स्वतंत्र आहे हे अधोरेखित होते. त्यांच्या अभंगांनी घराघरांत भक्तीचा दीप प्रज्वलित केला. त्यांची संगीताची साधना आणि निष्ठा त्यांच्या गायनातून उजळून दिसते, हे विशेष.
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो लोकांची वारी सुरू आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश असा मराठी प्रांत जिथे पसरला आहे, तिथून आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होण्यासाठी लाखो भाविक वारीने जातात. एका बाजूने वारी सुरू असताना ज्या विठ्ठलावरील अनेक अभंग गाऊन भजनाच्या गायकीला वेगळा आयाम देणारा तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि जगात मराठी माणूस राहतो तिथे कुठे पोहचला नसेल असा एकमेव आवाज म्हणजेच गोव्याचे सुपुत्र अजितकुमार कडकडे यांचा या वारीच्याच काळात ‘गोमंत विभूषण’ पुरस्कार देऊन गोवा सरकार सन्मान करते, हा निव्वळ योगायोग आहे. फक्त योगायोग नाही तर गेली कित्येक दशके भक्तिगायनात रमून गेलेल्या आणि आपल्या गायनाद्वारे देवाची अभंग सेवा केलेल्या कडकडे यांचा सन्मान म्हणजे असंख्य, कोट्यवधी भाविकांचाही सन्मान आहे. गोवा सरकारने यापूर्वीही ‘गोमंत विभूषण’ पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड केली होती. यावेळी मूळ डिचोलीतील पण महाराष्ट्राला कर्मभूमी केलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक अजित कडकडे यांची निवड केली. मराठी जिथे आहे, तिथे असा गाव किंवा असे घर नसेल जिथे अजित कडकडे यांचा आवाज पोहचला नसेल. गोव्याच्या या महान सुपुत्राला राज्य सरकारने योग्यवेळी ‘गोमंत विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.
अजितकुमार कडकडे यांनी शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीत, अभंग, चित्रपट गिते, नाट्यसंगीत, गवळणी, भावगीते गाऊन मराठीजनांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केले. कडकडे यांची गायकी ही खणखणीत आवाजाची आणि प्रचंड अशा ताकदीची आहे. भक्तिगीत गायनात त्यांनी महाराष्ट्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. वयाची सत्तरी ओलांडली, तरीही त्यांच्या आवाजात आजही तोच भारदस्तपणा आहे. लहानपणी गायनाची आवड नसतानाही वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी माडये गुरुजींकडे गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतरही त्यांना गायनाची आवड निर्माण झाली नाही. पण डिचोलीत एकदा पं. जितेंद्र अभिषेकी यांची मैफल होती. त्या मैफलीने अजित कडकडे यांच्या मनात गायन शिकण्याची इच्छा जागृत केली. पण अभिषेकी बुवांकडे त्यांना सहज शिकण्याची संधी मिळाली नव्हती. बुवांचे मन जिंकण्यासाठीही त्यांना मोठी कसरत करावी लागली. अभिषेकीबुवानंतर त्यांनी गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडेही शिक्षण घेतले. अभिषेकी बुवांकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, तर जयपूरवाले यांच्याकडे कबीर, मिराबाईंची भजने शिकले. तिथून पुढे त्यांचा प्रवास आकाशवाणी, टेपरेकॉर्डर, सीडी असा सुरू झाला. प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या महान गोमंतकीय सुपुत्राची मुलाखत ‘गोवन वार्ता’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या गायनाने भक्तीच्या आणि अध्यात्माच्या मार्गालाही एक वेगळी किनार प्राप्त झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अजित कडकडे हे नाव म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि जिथे मराठी माणूस स्थिरावला आहे, अशा सर्वत्र भक्तीचा मार्ग पोहचवणारा दूत आहे. त्यांनी पूर्वी गायिलेली विठ्ठलाच्या भक्तीची कित्येक गाणी, अभंग ऐकलले, तर ते अभंग त्यांनीच गावेत असा सर्वाधिकार त्यांना प्राप्त झाल्याचे दिसते. प्रत्येक गायकाची वैगळी शैली असते. कडकडे यांनी गावागावांतील घराघरांत आपले स्थान मिळवले यावरून त्यांची शैलीही वेगळी, स्वतंत्र आहे हे अधोरेखित होते. त्यांच्या अभंगांनी घराघरांत भक्तीचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या गायनातून फक्त त्यांची व्यावसायिक कारकीर्द पाहू नये. त्यांची संगीताची साधना आणि निष्ठा त्यांच्या गायनातून उजळून दिसते, हे विशेष.
वारीचे दिवस सुरू असताना मराठी भक्तिक्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या गोव्याच्या महान सुपुत्राला गोवा सरकारने ‘गोमंत विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करणे हा गोव्याचाही सन्मान आहे. हे पुरस्कार आतापर्यंत ज्यांना दिले गेले त्यांनी देशाला, गोव्याला आणि समाजाला प्रेरणा दिली आहे. कडकडे हे त्याच परंपरेतील आहेत. त्यांनी आपल्या गायनकलेतून भक्तीचे जे बीज पेरले, त्याचे अनुकरण करून गावोगावी अनेक अजित कडकडे पहाडी गळ्याने गाऊ लागले. त्यांनी पेरलेल्या या बिजाचे कोंब अनेक पिढ्यांमध्ये उमलतील. जय हरिविठ्ठल!