प्रॉन्स

प्रत्येक घटनेवर अभिव्यक्तीचे ठरावीक संस्कार करून त्याचे सौंदर्य हरवून टाकण्यापेक्षा त्यातल्या मोकळ्या जागा वाचता आल्या, तर अनोखी अनुभूती येते. तसेच याही लघुपटाच्या बाबतीत झाले आहे असे म्हटले, तर ती निश्चितच अतिशयोक्ती ठरणार नाही...

Story: आवडलेलं |
27th June, 10:04 pm
प्रॉन्स

मागे आम्ही तळकोकणातल्या एका निवांत समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. समुद्रकिनाऱ्यावरचे ते अतिशय लहानसे गाव होते. तिथे किनाऱ्याला अगदी लागून काही घरे होती. त्यातल्या एका घरात राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांच्याच घराच्या बाहेर चार खोल्या बांधल्या होत्या. जेवण पुरवायचे काम ते घरातून करायचे. समुद्र अगदी अंगणातच होता! शांतता, निवांतपणा वगैरेची अनुभूती तिथे आम्हाला मिळाली हे काही वेगळे सांगायला नको. 

आम्ही तिथे तीन दिवस होतो. तिन्ही दिवस पहाटे किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर, आम्हाला मासेमारी करून येणाऱ्या बोटी दिसायच्या. पाण्यातून त्या बोटी बाहेर काढायची दमवणारी प्रक्रिया बघितली आणि लक्षात आले, की तीन दिवसांची मजा वेगळी; पण हे रोजचे आयुष्य किती खडतर आहे! आणखीही विचार त्यावेळी मनात आला होता, तो म्हणजे; हे काम करणारे सगळे लोक मध्यमवयीन होते. काही वयस्कर होते. तरुण मंडळी कुणीच नव्हती. बरोबरच आहे, कशी असणार? ते सगळे चाकरमानी. कोकणात तरुण लोक राहत नाहीत, इथे त्यांना करण्यासारखे काही व्यवसाय नाही ही तक्रार तर कायम ऐकू येतेच. आमचेही याबद्दल बोलणे झाले. 'पुढे काय होणार?’ वगैरे गोष्टींबद्दल उगीच चर्चा करून झाल्या. आपण चार दिवसांच्या सुट्टीसाठी म्हणून जातो, तेव्हा बऱ्याचदा त्या त्या ठिकाणचे प्रत्यक्ष जगणे बघतच नाही. यावेळी आम्हाला ते जरा जवळून बघायला मिळाले. त्यामुळे त्याबद्दलही आम्ही भरभरून बोललो आणि चार दिवसांनी परत येऊन आमच्या नेहमीच्या, रोजच्या व्यापात गुंतून गेलो. आठवणींच्या कोणत्यातरी कप्यात या गप्पा आणि विचार गेले. 

'प्रॉन्झ' लघुपट बघताना मात्र या आठवणी एकदमच बाहेर आल्या. लघुपटाच्या सुरुवातीला दिसणारे कोकणातले लहान गाव, मासेमारीचा व्यवसाय, मालवणी भाषा थेट मला त्या सुट्टीच्या चार दिवसांत घेऊन गेली. हल्ली बऱ्याचदा एकाच विषयावरचे, एकाच पठडीतले लघुपट बघून बघून मी खरेतर जरा कंटाळले होते. पण याची सुरुवातीचीच फ्रेम इतकी आल्हाददायक होती, की वाटले बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान हाती लागले आहे. लघुपटाच्या सुरुवातीला त्या सहलीच्या आठवणी मनात आल्या आणि नंतर अवघ्या काही मिनिटांतच त्या सहलीदरम्यान आम्ही केलेली चर्चा मनात आली. 

मासेमारी करणाऱ्या एका माणसाला कामाचा खूप ताण होत असतो. मदत करणारे कुणीच नसते. घर तर चालायला हवे? तो त्याच्या आठ-दहा वर्षाच्या मुलाला हाताशी घेतो पण मुलाला याची बरीच मोठी किंमत चुकवावी लागणार असते. लघुपटाचा इथपर्यंतचा प्रवास कोकणातल्या रस्त्यांप्रमाणेच अनेक वळणावळणांचा आहे. काही ठिकाणी तर निवेदन, संवाद यांचीही अडगळ नाहीये; इतके सुंदर चित्रीकरण आहे. 'तुला पुढे जाऊन हेच करायचे आहे..' असे मुलाला ठामपणे सांगणारा; आणि मुळात हे स्वाभाविकपणे गृहीत धरणारा बाबा आपल्याला चूकही वाटतो आणि बरोबरसुद्धा. आयुष्य काळे पांढरे कधीच असत नाही. ते राखाडी रंगाचेच असते आणि या राखाडीच्याही अनेक छटा असतात. प्रत्येक गोष्टीला मध्यम मार्ग असतो, दोन टोके गाठायची गरज नसते हे एखाद्या समस्येकडे बघणाऱ्या बाहेरच्या माणसाला सहज जाणवते पण ती समस्या प्रत्यक्ष अनुभवत असलेल्यांना मात्र तो मध्यममार्ग दिसणे कठीणच. मुलाला करायला लागणारी ही तडजोड पटण्यासारखी नाहीच. हीच समस्या म्हणजे या लघुपटाचे केंद्रस्थान. तरुण पिढी कोकणात राहत नाही; कोकणात उद्योग, व्यवसाय नाहीत या तक्रारीचीही दखल यात एका अनोख्या पद्धतीने घेतली आहे. फक्त ही गोष्ट सरळ, स्पष्टपणे न मांडता ती त्या गोष्टीत अगदी बेमालूमपणे गुंफलेली आहे आणि म्हणूनच ती जास्त प्रकर्षाने बघणाऱ्यांपर्यंत पोहचते असे मला वाटले. फक्त समस्या अधोरेखित करून लघुपट जास्त भावनिक न करण्याचा हा कल वेगळा वाटला. याही कारणासाठी हा लघुपट मला फार आवडला. 

मुलाकडून विचित्र अपेक्षा करणारा बाप आपल्याला दिसत असतो. त्याचे म्हणणे रास्त नसतेच, ते आपल्याला पटत नाहीच; पण त्याचवेळेला त्याचे मुलावर असलेले प्रेमही आपल्याला दिसत असते. अशावेळेला त्याचा तिरस्कार कसा करणार? काहीवेळा समजावणे, चूक, बरोबर सांगणे हा पर्याय नसतोच. अशावेळी दृष्टिकोन बदलणे हा एकमेव उपाय असतो. आणि कुणाला न दुखवता, वर्चस्व न गाजवता ते साध्य केले जाऊ शकते. लघुपटाच्या शेवटी हे घडते आणि सगळे आकाश एकाएकी मोकळे होऊन जाते. एक समस्या, तिच्याभोवती असलेल्या आणखी काही समस्या आणि शेवटी त्याच्यावर उपाय अशा ठरावीक चौकटीतला हा लघुपट असला, तरी तो तितक्यापुरता मर्यादित नाही. न बोलता, न सांगता काहीवेळा फार उत्तम संभाषण होऊ शकते. प्रत्येक घटनेवर 

अभिव्यक्तीचे ठरावीक संस्कार करून त्याचे सौंदर्य हरवून टाकण्यापेक्षा  त्यातल्या मोकळ्या जागा वाचता आल्या, तर अनोखी अनुभूती येते. तसेच याही लघुपटाच्या बाबतीत झाले आहे असे म्हटले, तर ती निश्चितच अतिशयोक्ती ठरणार नाही. 

एका वेगळ्या विषयावरचा, भावनांनी ओथंबलेला तरीही अनेक पदर उलगडणारा असा हा लघुपट सगळ्यांनी बघावा असाच आहे!


- मुग्धा मणेरीकर

फोंडा