अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक...

अभ्यास तर सर्वच जण करतात परंतु यात यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. आपण कुठे कमी पडलो याचा विचार गोमंतकीय विद्यार्थी करताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.

Story: यशस्वी भव: |
12 hours ago
अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक...

जीपीएससीसारख्या संस्थातर्फे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांना स्पर्धा परीक्षा असे म्हटले जाते. यातून स्पर्धात्मक पद्धतीने कुशल मनुष्यबळ निवडले जाते. एखाद्या महत्त्वाच्या सरकारी पोस्टसाठी काही खास कलागुण असणे अनिवार्य असते. हे खास कलागुण सांख्यिक पद्धतीने तपासले जातात. या परीक्षांमधून ज्या उमेदवाराची निवड होणार आहे तो उमेदवार कसा असला पाहिजे, त्याचे शिक्षण किती पाहिजे, त्याचे आकलन कसे पाहिजे, त्याची भाषेवर कशी पकड पाहिजे, त्याची तांत्रिक बाबींवर कशी हुकूमत आहे, टेक्नॉलॉजीबद्दल त्याचे विशेष गुण कसे आहेत, रिडिंग-रायटिंग-लिसनिंग-टॉकिंग सेन्स कसा आहे, त्याची अक्कलहुशारी किती आहे, निर्णय क्षमता त्याची कशी आहे, अवांतर वाचन व सामान्य ज्ञान त्याचे कसे आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे स्पर्धात्मक परीक्षेतून सापडतात.

अभ्यास तर सर्वच जण करतात परंतु यात यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. आपण कुठे कमी पडलो याचा विचार गोमंतकीय विद्यार्थी करताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. भारतातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ५०% प्रश्न हे न्यूमरिकल अॅबिलिटिज म्हणजेच अंकगणित शास्त्र, इंग्रजी, भाषा, निबंध व व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशास्त्रावर आधारित विषय, कॉम्प्युटर, बँकिंग व्यवस्था या विषयावर असतात. बरं हे विषय कोणी शाळा कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. त्यामुळे याचा सराव कुठेच होत नाही. खूपदा ही माहिती नसल्याने गुण मिळतचं नाही. परंतु जे उमेदवार अभ्यास करतात, सराव करतात व परीक्षेला बसतात त्यावेळेस प्रश्नपत्रिका वाटप करावयाच्या क्षणी हृदयाचे ठोके वाढलेले असतात; धडधड वाढलेली असते. त्यामुळे तणाव येणे व घसा कोरडा पडणे हे नैसर्गिकच आहे. पेपर हातात आल्यावर प्रथम सोपे-सोपे, सहज येणारे प्रश्न पटापट सोडवून पुढे जायचे असते. कठीण वाटणारे प्रश्न नंतर सोडवावेत. कठीणमध्ये सौम्य कठीण, कठीण, अगदी कठीण, काहीच न येणारे अशी विभागणी असते.

अभ्यास आणि मेहनती विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना जे प्रश्न कठीण गेले आहेत ते इतरांनाही कठीणच गेलेले आहेत. यामुळे मनातील तणाव ९० % नी कमी होतो. या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘ऑल इज वेल’ या पद्धतीने तयारी केल्यास नक्कीच फायदा होतो. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर बरेचदा मुले ब्लँक होतात. अवघड प्रश्न दिसले की पुढे सर्वच अवघड वाटून भीती वाटू लागते. काही आठवेनासे होते. मागचे आणि पुढचे सपाट होते. हातपाय थरथरु लागतात व यामुळे एकंदर सर्व पेपरवर त्याचा परिणाम होतो. चालू घडामोडींनी सुरुवात करू की इंग्रजीच्या समानार्थी व विरुद्धार्थी प्रश्नांनी सुरुवात करू हेच कळत नाही. घाबरायचे कारण नाही कारण सर्वांबाबत हीच सिच्युएशन असते. सराव न केल्यास हा परिणाम होतो. यासाठी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये या प्रश्नांचा सराव करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. 'प्रॅक्टिस' हेच यशाचे गमक आहे. जेवढी आधी प्रॅक्टिस कराल तेवढे ताणतणाव व्यवस्थापन उपयोगी पडते. अवघड 

प्रश्नांना पुढे सारून सोपे आधी सोडवून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. चालू घडामोडी तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दर सेकंदाला घडत असतात. त्यामुळे याचा नेमका कसा व कश्याचा अभ्यास करावा हेच कळत नाही. लक्षात तर किती व काय काय ठेवणार? त्यामुळे फार तणाव न घेता सर्व प्रश्न सोडवण्याकडे कल असावा.

यशाची गुरुकिल्ली:
सातत्य आणि योग्य रणनीती

स्पर्धा परीक्षांचा प्रवास हा केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित नसतो, तर तो मानसिक कणखरपणा, वेळेचे नियोजन आणि योग्य रणनीती यांचा कस पाहणारा असतो. अनेकदा विद्यार्थी अफाट अभ्यास करतात, पण परीक्षेच्या तीन तासांत त्या ज्ञानाचे रूपांतर गुणांमध्ये करण्यात अपयशी ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे अभ्यासातील सातत्याचा अभाव आणि परीक्षा देण्याच्या तंत्राचा सराव नसणे.

गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अधिक प्रकर्षाने जाणवते. अनेकदा स्थानिक स्तरावर चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध असूनही, अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची व्याप्ती आणि अपेक्षित कौशल्ये याबद्दल पुरेशी माहिती नसते. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे नाही, तर त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची सोडवणूक करण्याची पद्धत, वेळेचे बंधन पाळणे, आणि अचूक उत्तरांची निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी नियमित मॉक टेस्ट (सराव परीक्षा) देणे आणि प्रत्येक टेस्टनंतर आपल्या चुकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. 

कोणत्या विभागात कमी गुण मिळाले, कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना जास्त वेळ लागला, किंवा कोणत्या संकल्पना अजून स्पष्ट नाहीत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

शिवाय, स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर जगामध्ये काय घडत आहे, याचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे. यासाठी नियमितपणे वर्तमानपत्रे वाचणे, मासिके वाचणे आणि विविध वृत्तवाहिन्या व ऑनलाइन स्रोतांचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. परंतु, केवळ माहिती गोळा करून चालत नाही, तर त्या माहितीचे विश्लेषण करून, त्याचे विविध पैलूंशी संबंध जोडता येणे हे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या आर्थिक घडामोडीचा सामाजिक किंवा राजकीय परिणामांशी कसा संबंध आहे, याचा विचार करता येणे आवश्यक आहे.

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे देखील यशाचे महत्त्वाचे घटक आहेत. जेव्हा परीक्षेत अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा निराश न होता, आपल्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याची तयारी असावी लागते. प्रत्येक अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास, सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावरच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते. गोमंतकीय विद्यार्थ्यांनी या बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास, त्यांनाही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडता येईल यात शंका नाही.


अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)