आणि काँग्रेसचे साफ पानिपत झाले...

भाजपाला विधानसभेत प्रथमच २१ म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाले होते. ९ मार्च २०१२ रोजी मनोहर पर्रीकर यांचा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. अशाप्रकारे भाजपाचा खऱ्या अर्थाने भाग्योदय झाला.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
01st June, 12:17 am
आणि काँग्रेसचे  साफ पानिपत झाले...

दिगंबर कामत सरकारला आता हटविणे शक्य नाही याची खात्री पटताच भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांनी आपले राजकीय डावपेच बदलले. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी गोवाभर प्रखर आंदोलन सुरू करून कामत सरकारला कचाट्यात पकडले. ‘इंग्लिश व्हाय? मायभास जाय!’ अशा घोषणा लिहिलेले टी शर्ट घालून १८ जून रोजी गोवा क्रांती दिन सोहळ्यात आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या युवा  कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या ब्लॅक टीशर्ट आंदोलनात सहभागी झाले. गोवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषा सुरक्षा मंच ही संस्था काढून जन आंदोलन छेडले. कट्टर कोंकणीवादी उदय भेंब्रे, अरविंद भाटिकर तसेच मराठीप्रेमी सीताराम टेंगसे, दिलीप धारवाडकर आदी नेते एकत्र येऊन हे आंदोलन छेडण्यात आले. इंग्रजी माध्यमांतील इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान देऊ नये अशी मागणी करण्यात आली. सुभाष वेलिंगकर यांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवले.

२००५ मध्ये भाजपला रामराम ठोकून दिगंबर कामत यांनी मनोहर पर्रीकर यांचे सरकार पाडले होते याचा राग होताच. त्यामुळे कामत यांच्या विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली होती. गोव्यातील कमी दर्जाच्या लोहखनिजाला चीनमधून मागणी वाढतच होती. त्याचा परिणाम म्हणून लोहखनिजाचे बेकायदा उत्खनन वाढले. बरेच राजकीय नेते या धंदा-व्यवसायाकडे आकर्षित झाले. खनिज मागणी वाढली तसे उत्खनन वाढले. बेकायदा वाहतूक वाढली. खनिज वाहतूक मार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात खनिजांचे उत्खनन करता यावे म्हणून सर्व नियम धाब्यावर बसवून लीजांचे नूतनीकरण करण्यात आले. गोवा फाऊंडेशनने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. या सगळ्या अंदाधुंदीचा लाभ घेण्यासाठी भाजपाने जन आंदोलन छेडले. दिगंबर कामत सरकार हे अत्यंत भ्रष्ट सरकार असल्याचे वातावरण तयार करण्यात आले. भाजपाच्या वाढत्या दबावामुळे खाण खात्यातील काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या दबावाखाली खाण लीजांचे नूतनीकरण करण्यात आले होते असा आरोप करुन भाजपाने कामत सरकारविरुद्ध रान उठविले. 

कॅसिनो प्रश्नावरून सरकारला अडचणीत आणण्यासाठी कॅसिनो विरुद्ध महिला मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मेणबत्ती धरणे आंदोलन पेटविले. विधानसभा अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी आपल्या सहकारी आमदारांच्या सहकार्याने आरोप प्रत्यारोपांच्या एवढ्या फैरी झाडल्या की, सरकारचे नैतिक बळच राहिले नाही.

आपले सरकार अस्थिर बनू नये म्हणून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या मंत्र्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. काही मंत्र्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. एका मंत्र्याची सेक्रेटरी कंत्राट देताना १५ टक्के कमिशन मागू लागली. १० टक्के मंत्र्यांना आणि ५ टक्के मला; असे ती जाहीरपणे निर्लज्जपणे सांगायची!

दिगंबर कामत यांनी अशा प्रकारे तडजोड करत पावणे पाच वर्षे पूर्ण केली. एवढ्यात विधानसभा निवडणुकीचा शंख वाजू लागला. सर्व इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली. चर्चिल आलेमांव यांची कन्या वालंका, बंधू ज्योकी आलेमांव व त्यांचे पुत्र युरी आलेमाव आणि चर्चिल अशा एकाच घरातील चौघांनी चार मतदारसंघावर दावा केला. २००७ मध्ये फॅमिलीराजला विरोध करुन विश्वजीत राणे यांना तिकीट नाकारणाऱ्या काँग्रेस पक्षाने चर्चिल, ज्योकी व वालंका या तिघांना काँग्रेसची उमेदवारी दिली आणि युरी आलेमाव यांना सांगे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली. भाजपाने दिगंबर कामत सरकारविरुद्ध जोरदार प्रचार मोहीम उघडली त्यामुळे ३ मार्च २०१२ रोजी झालेल्या मतदानात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. काँग्रेसने केवळ ९ उमेदवार कसे बसे निवडून आले.

इजिदोर फर्नांडिस (काणकोण), शाम सातार्डेकर (कुडचडे), फिलीप नेरी रॉड्रिगीस (वेळळी), ज्योकी आलेमांव (कुंकळी), चर्चिल आलेमांव (नावेली), वालंका आलेमाव (बाणावली), अलेक्स सिक्वेरा (नुवे),  रितेश रवी नाईक (मडकई), सुभाष शिरोडकर (शिरोडा), रवी नाईक (फोंडा), फ्रान्सिस सिल्वेरा (सांत आंद्रे), दयानंद नार्वेकर (हळदोणे), आग्नेल फर्नांडिस (कळंगुट), बाबू आजगावकर (पेडणे) हे काँग्रेसचे मातब्बर नेते या निवडणुकीत पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे युती करूनही काँग्रेस उमेदवारांची परिस्थिती बरीच बिकट झाली होती.

भाजपाचे नेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३ वर्षे भाजपाने गोवाभर जी आंदोलने छेडली त्याचे फळ लोकांनी भाजपला दिले. काँग्रेसचे रथी महारथी नेस्तनाबूत झाले आणि भाजपाचे तब्बल २१ उमेदवार स्वबळावर निवडून आले. या निवडणुकीत भाजपा-मगो युती होती. मगोचे तीन आमदार निवडून आले होते.

सामाजिक कार्यकर्ते स्व. सीताराम फडते बांदोडकर यांची गोवा विकास पार्टी मिकी पाशेको यांनी ताब्यात घेऊन निवडणूक आखाड्यात उतरले होते. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले. नरेश सावळ (डिचोली), रोहन खंवटे (पर्वरी), विजय सरदेसाई (फातोर्डा), आवेरतान फुरतादो (नावेली) आणि बेंजामिन सिल्वा (वेळ्ळी) हे ५ आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. या बहुतेक सर्व अपक्ष आमदारांना भजप पक्षाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यामुळेच तब्बल ५ अपक्ष आमदार निवडून येऊ शकले आणि काँग्रेसचे साफ पानिपत झाले. भाजपाला विधानसभेत प्रथमच २१ म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाले होते. ९ मार्च २०१२ रोजी मनोहर पर्रीकर यांचा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. अशाप्रकारे भाजपाचा खऱ्या अर्थाने भाग्योदय झाला.


गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)