मंजिरी वाटवे

प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या लेखनाची आवड जोपासली, ज्यातून ‘प्राजक्त सडा’ आणि ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ यांसारखी पुस्तके साकारली. आंतरिक समाधान आणि सकारात्मक इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी केलेला हा प्रवास त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतो.

Story: प्रेरक सर्जक |
01st June, 12:07 am
मंजिरी वाटवे

छोटी छोटी वाक्ये... साधी, सोपी, सरळ, परंतु भावगर्भ आणि हृदयस्पर्शी भाषा... नेमक्या, नेटक्या शब्दांत एखाद्याचे व्यक्तिमत्त्व उभे करणारी शब्दसंपत्ती. सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि कलात्मकता यांचा सुयोग्य मेळ... सभोवतालचा परिसर जिवंत करण्याची शैली ज्यांना लाभलेली आहे, त्या म्हणजे सौ. मंजिरी मयुरेश वाटवे. लेखकाची मुळातली शोधक नजर त्यांना लाभलेली आहे. ज्यांच्याकडे उपजत प्रतिभा शक्ती असते, त्यांना अभिव्यक्तीसाठी विषय शोधावे लागत नाहीत, तर ते त्यांच्या अवतीभोवतीच असतात. लता देवधर ते मंजिरी वाटवे या प्रवासात त्यांच्या जीवनात त्यांना अनेक व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला.

एका संस्कारसंपन्न घरातील त्यांचा जन्म. त्यांचे घर खेडेगावात, दुर्गम ग्रामीण भागातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचित लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे गावात होते. दाट वनराई, कुळागराने संपन्न समृद्ध असा हा प्रदेश. बालपणापासूनच हिरव्या वैभवाच्या कुशीत वाढत, खेळत त्या मोठ्या झाल्या. तेथील निसर्ग, संस्कृती, माणसे, अध्यात्म, तत्त्वज्ञान यांचा प्रभाव त्यांच्या उमलत्या वयात त्यांच्यावर झाला आणि त्यातूनच त्यांची जडणघडण झाली.

कविता त्यांना अधिक जवळची होती. साहित्य लेखनाविषयीची आवड ही तरुण वयात अधिक विकसित झाली. पुढे ती वाढली, पण लग्नानंतर मात्र ती ऐन भरात आली. सर्जकतेची बीजं लेखिकेच्या अंतर्मनात दडून होतीच, पण त्यांना मोकळा अवकाश अजून प्राप्त झाला नव्हता. लग्न, संसार, मुलगी अशा प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून इतर आवडीची कामे करताना दमछाक व्हायची. परंतु, सकारात्मक इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी या गोष्टी पेलल्या.

विद्या प्रबोधिनी, पर्वरी आणि जी. एस. आमोणकर विद्यालय, म्हापसा या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांच्या पूर्वप्राथमिक विभागात त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले. कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण अर्थशास्त्र या विषयातून घेत, प्राथमिक स्तरावरील शिक्षणशास्त्राचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. तसेच, रेकी हिलिंग कोर्स, हेल्थ सायकॉलॉजी आणि कौन्सिलिंग कोर्स, वास्तुशास्त्र बेसिक कोर्स यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून देत व्यक्तिमत्त्वाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. हे असे असले तरी, लेखनाची आतील ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. छोटे-मोठे लेख, कविता, कथा, परिचयात्मक लेखन, व्यक्तिचित्रण, इतर प्रासंगिक लिखाण सुरूच होते.

एकाच वातावरणात राहणारे अनेक जण एकच अनुभव एकाच वेळी घेत असतात. परंतु, प्रत्येकाची तो क्षण टिपण्याची पद्धत एकच नसते. काहींना त्यात स्वारस्य वाटत नाही, तर काहींना त्यातूनच जीवनाचे शाश्वत सत्य गवसते. लेखिकेने आपल्या ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकात लेखनकौशल्याचे वेगळेपण उठून दिसते.

साडीवर लिहिलेल्या लेखाने लेखनाची सुरुवात झाली. अनेकांना लेख आवडला, बऱ्याच जणांनी तसे कळवले, लिहीत राहण्याची प्रेरणा दिली आणि त्या लिहीत गेल्या. शब्दांचे प्रोत्साहन एखाद्याच्या जीवनात बदल कसा घडवून आणू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अर्थात, सहजीवनाच्या निर्मळ नात्याची सोबत होतीच; त्यामुळेच तर एवढा प्रवास सकस झाला.

सोबतीने वाढत जाते ते सहजीवन... एकमेकांच्या स्वभावाचे मुरलेपण जेव्हा विचारात मिसळते, ते सहजीवन असते. उणीदुणी काढूनही समंजसपणे प्रवाहित होते, ते सहजीवन असते. असा सहजीवनाचा नितळ प्रवाह मयुरेश वाटवे यांच्या सहवासात त्यांना लाभला. नोकरी आणि मुलगी सुकन्या हिचे संगोपन अशा दोन बाजूंचा विचार करताना, मुलगी आणि सांसारिक जबाबदाऱ्या यांनाच त्यांनी प्राधान्य दिले. अर्थशास्त्रातील पदवी घेऊन जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय नात्यांची वीण पक्की करणारा होता.

नोकरी सोडली म्हणून त्या गप्प बसल्या नाहीत, तर स्वतःच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे... शारीरिक, मानसिक स्वास्थ्याला सक्रिय ठेवणारे रेकी हिलिंग, वास्तुशास्त्र, आरोग्याचे मानसशास्त्र यांसारखे बेसिक कोर्स करून स्वतःला कार्यरत ठेवले. या अभ्यासक्रमाचा त्यांनी एकंदरीत त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना लाभ मिळवून दिला. त्याचबरोबर इतर गरजूंना मार्गदर्शनही केले. आपण केलेल्या या अभ्यासक्रमातून इतरांना लाभ होतो यावर समाधान मानून त्या वाटचाल करत आहेत. कोणत्याही आर्थिक पुंजीसाठी या ज्ञानाचा वापर न करता, केवळ आंतरिक समाधानासाठी त्या स्वतःकडील या ज्ञानाचा वापर करत आहेत.

सहज म्हणून त्यांनी एका स्थानिक दैनिकात ‘साडीचा पदर’ सदरात लेख लिहिला. तो लेख वाचकांच्या पसंतीस पडला. अनेकांचे संदेश आले. बऱ्याच जणांनी लेखन आवडत असल्याचे कळवले... घरातून प्रोत्साहन मिळाले आणि सुरू झाला त्यांचा लेखन प्रवास... वर्तमानपत्रातून विविध सदरांतून... कधी प्रासंगिक अशा तऱ्हेने त्या लिहीत राहिल्या. त्यातूनच ‘सहज जाता जाता’ सारखा लेखसंग्रह ‘शॉपिजन’ या अॅपवर ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाला.

 ‘प्राजक्त सडा’ हा काव्यसंग्रह आणि ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ हा लेखसंग्रह ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘प्राजक्त सडा’ या कवितासंग्रहाला ‘गोमंतक साहित्य सेवक मंडळा’तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘स्व. ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार’ प्राप्त झाला असून, ही त्यांच्या लेखनाला मिळालेली पोचपावती आहे.

मंजिरी यांचा स्वभाव धडपड्या आहे. या धडपडीत कृतिशील कौशल्य जाणवते. अनुभवांमुळे बघण्याची त्यांची दृष्टी जशी सजग आहे, तितकीच ती कलात्मकही आहे. वस्तूच्या, व्यक्तीच्या, घटना, प्रसंगांच्या अंतरंगात शिरून, त्यांच्याशी समरस होऊन त्या लिहितात. त्यात वास्तव असतेच, शिवाय त्या-त्या अनुभवांची संवेदनशीलता खुद्द लेखिकेला जाणवल्यामुळे ती तशी वाचकांच्या मनातही उतरते. म्हणूनच त्यांचे लेख वाचताना वाचकांना तशी अनुभूती येते.

त्यांनी ‘इन गोवा’ मधून वृत्तलेखन आणि मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्या मुलाखती वृत्तवाहिन्यांवर झाल्या आहेत. युट्युब चॅनेलच्या माध्यमातूनही त्या अभिव्यक्त होत आहेत. निवेदन, सूत्रसंचालन, काव्यवाचन, लेखन आणि त्यांच्या आवडीच्या इतर प्रांतांत त्या सक्रिय आहेत. वाचन, अभ्यास, चिंतन आणि ध्येयपूर्ण वाटचालीतील सातत्य व्यक्तिमत्त्वाला अष्टपैलुत्व प्रदान करते. माहेर आणि सासरकडून मिळालेले अभिजात संस्कारांचे संचित, आणि स्वतःकडे असलेल्या स्वतंत्र प्रतिभेला नवनवीन कल्पनांचे धुमारे फुटून मंजिरी वाटवे यांचा यापुढील लेखनप्रवास निरंतर होवो, हीच सदिच्छा!


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)