पणजी : राज्यात रेंट अ बाईक आणि रेंट अ कार सेवेमुळे अपघात वाढले असून, टॅक्सी चालकांच्या व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. या सेवा बंद केल्यास स्थानिक टॅक्सी चालकांना फायदा होईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी केले. सोमवारी पणजी, ताळगाव व सांता क्रूझमधील टॅक्सी चालकांनी मंत्री मोन्सेरात यांची भेट घेऊन ॲप आधारित टॅक्सी सेवा थांबवण्याची मागणी केली. यावेळी टॅक्सी संघटनांचे योगेश गोवेकर, रौनक अली आदी उपस्थित होते.
मोन्सेरात म्हणाले, पाटो परिसरात पार्किंगची ९०टक्के जागा रेंट वाहने व्यापून बसली आहेत. वाहतूक विभागाने त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा शोधायला हवी होती, पण ती व्यवस्था अजून नाही. त्यामुळे हे खाते अपयशी ठरले आहे. वाहतूक खात्याच्या संचालकांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. असे ते म्हणाले. मंत्री मोन्सेरात म्हणाले की, सरकारने टॅक्सी व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी ॲप अग्रिगेटरचे धोरण आणले आहे. हे धोरण स्थानिक टॅक्सी चालकांच्या विरोधात नाही. याबाबत सूचना, मते देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. सरकार टॅक्सी मालकांची बाजू ऐकून पुढील निर्णय घेईल. काही टॅक्सी चालकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे पर्यटकांना त्रास होतो हे देखील मान्य केले पाहिजे.
ते म्हणाले, रेंट अ बाईक, कार मुळे होणाऱ्या समस्यांबाबत मी कॅबिनेटमध्ये चर्चा केली होती. त्यावेळी मी या दोन्ही सेवा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. यानंतर वाहतूक खात्याने नवीन परवाने देणे बंद केले होते. काही रेंट वाहनधारकांकडे एक टॅक्सी, १५ कार व ५० बाईक असतात, त्यामुळे ते भरपूर नफा कमावतात, पण ज्यांचा संपूर्ण व्यवसाय टॅक्सीवर आहे, त्यांच्यावर अन्याय होतो, असेही मोन्सेरात म्हणाले.