‘अक्षयपात्र’ला धान्य मिळेपर्यंत स्वयंसाहाय्य गट पुरवणार माध्यान्ह आहार

बेंच पुरविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे


04th June, 01:19 am
‘अक्षयपात्र’ला धान्य मिळेपर्यंत स्वयंसाहाय्य गट पुरवणार माध्यान्ह आहार


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात बुधवार, ४ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार दिले जाणार आहे. सरकारकडून अद्याप धान्य प्राप्त न झाल्यामुळे ‘अक्षयपात्र’कडून लगेच माध्यान्ह आहार पुरवठा होणार नाही. मात्र तोपर्यंतच्या काळात स्वयंसाहाय्य संस्थांकडून माध्यान्ह आहार पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
स्वयंसाहाय्य गटांमार्फत जवळपास ५,००० विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवला जातो. सरकार दर तीन महिन्यांनी अन्नधान्याचा कोटा वितरित करत असते. एप्रिल, मे, जून महिन्यांसाठीचा कोटा दिल्यानंतर, जुलैपासून नव्या टप्प्याचा कोटा देण्यास सुरुवात होणार आहे. सध्याचा कोटा ‘अक्षयपात्र’ऐवजी स्वयंसाहाय्यक गटांना वितरित करण्यात आला आहे.
पिळर्ण येथील स्वयंपाक घराचा अद्याप वापर नाही
सरकारने पिळर्ण येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्राची जागा ‘अक्षयपात्र’ संस्थेला स्वयंपाक घरासाठी म्हणून दिला आहे. याचे उद्घाटन १७ मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले होते. मात्र अद्याप या जागेचा वापर सुरू झालेला नाही.
फक्त फोंडा तालुक्याला मिळाले नवे बेंच
राज्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक बेंच पुरविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. सध्या फोंडा तालुक्यातील तीन शाळांमध्ये नवे बेंच देण्यात आले आहेत. यापुढे शाळांना थेट भाग शिक्षण अधिकारी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे अर्ज करून बेंचची मागणी करता येईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत.