मुख्यमंत्री डॉ. सावंत : पर्यावरणदिनी पणजीत कार्यक्रम
खाजन जमीन व्यवस्थापन आराखडा प्रकाशित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, खासदार सदानंद शेट तानावडे व इतर.
पणजी : राज्यात सिंगल युझ प्लास्टिक बंदीबाबत कायदा करण्यात आला आहे. हा कायदा कागदावरच राहिला आहे. यापुढे कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पणजीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यावरण खात्याचे संचालक सचिन देसाई, मुख्य सचिव व्ही कांडावेलू उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, प्लास्टिक वस्तूंची सुरुवात झाल्यावर त्याची खूप वाहवा झाली होती. आज मात्र प्लास्टिक एक भयंकर समस्या बनले आहे. समुद्रातील प्लास्टिक माशांच्या पोटातून आपल्या पोटात पोहोचले आहे. यासाठी नद्या, समुद्रात प्लास्टिक किंवा अन्य कचरा फेकणे बंद झाले पाहिजे. कचरा व्यवस्थापनासाठी गोवा सरकारने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. साळगाव येथील घनकचरा तसेच कुंडई येथील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प देशात आदर्श ठरत आहेत. लवकरच पिसुर्ले येथे ई वेस्ट आणि रासायनिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, लहानशा गोव्याच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला पश्चिम घाट आहे. यामुळे जमिनीची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. असे असले तरी आम्ही येथील ६६ टक्के हरित आच्छादन कायम ठेवून विकासकामे करत आहोत. सरकार राज्यातील पर्यावरण चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोवा कायमस्वरूपी हरित राखायचा असेल तर प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम सर्वांनीच पाळले पाहिजेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ छळ करते ही चुकीची मानसिकता सोडली पाहिजे. त्यांच्या नियमांचे पालन केले तरच गोवा हरित राहू शकतो.
खाजन जमीन व्यवस्थापन आराखडा प्रकाशित
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने प्रलंबित खाजन जमीन व्यवस्थापन आराखडा प्रकाशित केला आहे. यामुळे गोव्यातील खाजन जमीन पुनरुज्जीवित करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच खारफुटीच्या व्यवस्थापनाचा आराखडा देखील प्रकाशित केला आहे. माती आणि किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी विविध अभ्यास सुरू आहेत. याबाबत लवकरच आराखडा तयार केला जाईल.
गोव्याची सून सांभाळते काम
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, आमची धाकटी सून डॉ. अनघा मूळची गोव्याची आहे. गेली काही वर्षे आमच्या मुलांसोबत ती देखील हेमलकसा येथील काम जबाबदारीने सांभाळत आहे. गोवा कायम हरित रहावा यासाठी पर्यावरणाचा समतोल राखून विकास करावा.