दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत चर्चा : पूर्णवेळ कनिष्ठ अभियंता देण्याची मागणी
मडगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांसाठी २० टक्क्यांपेक्षा कमी दराने लावण्यात येणार्या बोली मान्य करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे कामांच्या दर्जांसह काहीवेळा कामे न परवडल्याने कामे पूर्ण न होण्याचा धोका आहे. त्यामुळे या परिपत्रकाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी करत सरकारला पत्र पाठवण्यात यावे, असा निर्णय दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.
१. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची बैठक शुक्रवारी सकाळी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अध्यक्ष संजना वेळीप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर अध्यक्ष संजना वेळीप व उपाध्यक्ष सिध्दार्थ देसाई यांनी माहिती देताना काही सदस्यांकडून बांधकाम विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकावर चिंता व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले.
२. यापूर्वी राज्यातील विविध बांधकामांसाठीच्या निविदात अंदाजित रकमेपेक्षा २० टक्के कमी दराने बोली लावली जात असल्याने त्या मान्य न करता फेटाळल्या जात होत्या. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आता २० टक्क्यांपेक्षा कमी दराच्या बोलींना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३. यामुळे कामांचा दर्जा निकृष्ट राहू शकतो. काहीवेळा ठेकेदाराकडून कमी बोली लावून हाती घेतलेले काम परवडत नसल्याचे सांगून मध्येच सोडून देण्याचे प्रकार घडलेले असून अशा प्रकारात वाढ होऊ शकते. तसेच जिल्हा पंचायतीला जास्तीत जास्त १५ लाखांपर्यंत कामे करण्याची परवानगी असून यातही २० टक्क्यांपेक्षा कमी दराने काम हाती घेण्यात आल्यास कामांवर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे, असे सांगत माजी अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी यावर पुनर्विचार करण्याचा मुद्दा मांडला.
जिल्हा पंचायत भवनाचे काम हे जागा निश्चित होत नसल्याने बाकी आहे. याआधी पाहणी करण्यात आलेली जागा ही पार्किंग व इतर सुविधांसाठी योग्य नसल्याने निश्चित झाली नाही. जागा निश्चित झाल्यानंतर जिल्हा भवनाचे काम मार्गी लागेल, असेही अध्यक्ष संजना वेळीप यांनी सांगितले.
कनिष्ठ अभियंत्यांकडून कामे केली जात नसल्याचा दावा काही सदस्यांनी या बैठकीत केला. यावेळी अभियंत्याच्या बदलीवरही चर्चा झाली. 'जिल्हा पंचायतीचा कालावधी कमी राहिलेला असून अशावेळी अभियंत्याची बदली मागण्यात आल्यास जी कामे होतील तीही होणार नाहीत', असा सूर उमटला.
सद्यस्थितीत जिल्हा पंचायतीकडे पाच कनिष्ठ अभियंता असून एका अभियंत्याकडे पाच सदस्यांची कामे असतात. यातूनच काही कामांची बिले होण्यास विलंब होत जातो. या पाच कनिष्ठ अभियंत्यांपैकी एक अभियंता हा पूर्णवेळ असून इतर चार अभियंत्यांकडे दोन ठिकाणचे काम असते. त्यामुळे जिल्हा पंचायतीला चार कायमस्वरुपी पूर्णवेळ कनिष्ठ अभियंता उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.