मुख्यमंत्री डॉ. सावंत : शेतीत यांत्रिकीकरणाची गरज; कृषी पर्यटनावरही सरकारचा भर
मडगाव : राज्यातील पडिक शेत लागवडीखाली आणण्यात यावे. शेतकर्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी एकात्मिक शेतीवर भर दिलेला आहे. यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास उत्पन्न वाढू शकते. पर्यटनाच्या क्षेत्रातही कृषी पर्यटनावर भर देण्यात येणार आहे. गोवा आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांनी शेती क्षेत्राकडे वळावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राय कुडतरी येथे डॉन बॉस्को सोसायटी व कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक, फा. जॉर्ज क्वाद्रोस, डॉ. प्रवीणकुमार आदी उपस्थित होते. फा. जॉर्ज यांनी चर्चपासून शेतीपर्यंत युवकांना आणण्याचे कार्य गेली दहा वर्षे केले आहे. गोव्यातही तंत्रज्ञानाचा वापर करत शेती केली जाऊ शकते, हे फा. जॉर्ज यांनी दाखवून दिले. ४० हजारांपासून ४० लाख चौमीपर्यंत शेती यांत्रिकी पद्धतीने करण्याचे काम केले आहे. पुढील दहा वर्षांत ४०० हेक्टर जमिनीवरून ४ हजार हेक्टर जमिनीवर शेती यांत्रिकीकरणातून केली जाते. आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेती, फळउत्पादन, मत्स्यउत्पादन, दुग्धउत्पादन, फुलउत्पादनासह कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यांच्या जोरावर हे शक्य आहे. व्यवस्थितरित्या काम केल्यास कृषीतूनही आर्थिक उत्पादन मिळवले जाऊ शकते. कामगारांची कमी असून यांत्रिकीकरण ही गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य दिले जात आहे. लाखो एकर शेत पडिक ठेवण्यापेक्षा यांत्रिकीकरणातून जास्त उत्पादन देणार्या पिकांची लागवड करावी. दहा वर्षे पडिक जमिनी फा. जॉर्ज यांनी शेती लागवडीत आणल्या आहेत. बियाण्यापासून भातलावणी, पाणीपुरवठा, यांत्रिकीकरण, कापणीपर्यंत सर्व बाबतीत कृषी खात्याकडून सबसिडी दिली जाते.
शेतीसाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. शेतीसाठी ड्रोन वापरण्यात येत असून भातलावणी यंत्राव्दारे शेती केली जाते. राज्यात १० ड्रोन महिनाभरात येणार असून त्यांचा वापर शेतीसाठी होणार आहे. केवळ चर्च, मंदिर, समुद्रकिनारे पाहण्यासाठी नाही तर कृषी पर्यटनावर भर देण्यात येणार आहे. झाडे लावण्यासाठी हा काळ सर्वाधिक योग्य आहे. सर्वांनी मिळून झाडे लावून त्याची काळजी घेण्याची गरज आहे. आठवी ते दहावी पाठ्यपुस्तकात कृषीविषयक अभ्यास असतील. त्यानंतर कृषीविषयक कोर्सही उपलब्ध आहेत. शेतीतील यांत्रिकीचा वापर वाढलेला असून त्याच्या दुरुस्तीच्या क्षेत्रातही चांगल्या संधी आहेत. जागतिक पर्यावरण दिन असून आजपासून गोव्यातील खरीप हंगाम सुरू झाल्याचे जाहीर करतो. कृषी उत्पादनांना जास्तीत जास्त चांगली किंमत मिळावी. गोव्यातील कृषी उत्पादने देशाबाहेरही निर्यात व्हावीत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले की, उच्चशिक्षित युवक कृषी क्षेत्राकडे वळत आहेत. आपले कामधंदे सांभाळून युवक कृषी प्रशिक्षण घेत पडिक जमिनी लागवडीखाली आणत आहेत. कृषी खात्याकडून शेतकर्यांनी प्रोत्साहन दिले जात आहेत. भातशेतीसह काजू, आंबा व इतर उत्पादने घेण्यावरही भर द्यावा. गोवा कृषी उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यात ‘अॅग्री क्लिनिक’ची संकल्पना
मातीची गुणवत्ता ही शेतीसाठी गरजेची बाब आहे. त्यासाठी माती परीक्षणासाठीचा कोर्स साखळी येथे सुरू केला जात असून जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तीन महिन्यांचा कोर्स पूर्ण केल्यावर त्यांना प्रमाणपत्रासह ‘अॅग्री क्लिनिक’ उभारणीसाठी कर्ज योजनाही आहे. युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.