स्थानिक शेतकरी संकटात, सरकारकडे मदतीची मागणी
पणजी : आगशी येथील शेतांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सांडपाणी भरले आहे. यामुळे संपूर्ण शेती आणि पावसाचे पाणी प्रदूषित झाले आहे. हे सांडपाणी शेतात कुठून आणि कसे आले याचा अद्याप शोध लागला नाही. या समस्येमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना शेतात लागवड करणे कठीण झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर, गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठवले आहेत. मात्र, हे सांडपाणी कुठून आले आणि कोणी शेतात सोडले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
दुर्गंधीने हैराण, शेतीत काम करणे अशक्यस्थानिक शेतकरी लुकास पेरिस यांनी सांगितले की, ३१ मे पासून शेतातील पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. दुर्गंधीमुळे शेतात येणेही कठीण झाले आहे. संपूर्ण शेत दुर्गंधीमय झाल्यामुळे स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. हा प्रकार प्रथमच घडला असून यापूर्वी कधीही असे झाले नव्हते. अशा वातावरणात आम्ही शेत लागवड करू शकणार नाही. जर सरकारने नुकसानभरपाई दिली नाही, तर आमचे जगणे कठीण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.