मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : वाहतूक खात्याकडून अध्यादेश जारी
पणजी : खासगी वाहनांचा वापर रेंट-ए-कार किंवा रेंट-ए-बाईक व्यवसायासाठी केल्यास संबंधितांचा परवाना रद्द केला जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. खासगी वाहनांचा व्यवसायिक वापर थांबवण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला असून यासंदर्भात वाहतूक खात्याकडून अध्यादेश जारी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीस पोलीस महासंचालक आलोक कुमार, वाहतूक संचालक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या अनेक रेंट-ए-कार/बाईक ऑपरेटरकडून व्यवसायासाठी खासगी वाहनांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर कारवाई करण्याची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला.
सीमाचौक्यांवर कडक तपासणी
पत्रादेवी, केरी, मोले व पोळे या राज्याच्या सीमांवर असलेल्या चौक्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा उभारण्यासह गस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेत पारदर्शक तपासणी यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत झाडांची लागवड
या बैठकीदरम्यान सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचेही जाहीर करण्यात आले. पर्यावरण संवर्धनास चालना देण्यासाठी पोलीस विभागाकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.