राज्यातील नद्या, धबधबे, खाडीही प्रदूषणाच्या विळख्यात

जीपीसीबीचा अहवाल : प्राणवायूचे प्रमाण कमी, घातक जीवाणूंचे प्रमाण अधिक


16 hours ago
राज्यातील नद्या, धबधबे, खाडीही प्रदूषणाच्या विळख्यात

प्लास्टिक बाटल्यांचा खच पडल्याने प्रदूषित झालेली सांतिनेज खाडी. (नारायण पिसुर्लेकर) 

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीपीसीबी) एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात राज्यातील नद्या, तलाव, खाड्या, झरे, धरण, समुद्र किनारे तसेच विहरीतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली होती. या नमुन्यांतील ३० ते ५० प्रकारच्या प्रदूषणकारी घटकांचे मापन करण्यात आले. यात प्रमुख नद्यांसह अन्य पाणथळ ठिकाणे काही वेळेस प्रदूषित असल्याचे दिसून आले. काही वेळेस येथील प्रदूषण मर्यादेत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी पाण्याचा पीएच, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी झाले, तर काही ठिकाणी फिकल कॉलिफॉर्म या घातक जीवाणूंचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२४-२५ मध्ये एकूण ११५ पाणथळ ठिकाणांहून पाण्याचे १,२६३ नमुने गोळा केले होते. ११५ पैकी १०७ ठिकाणी दर महिन्याला तपासणी करण्यात आली. ११५ ठिकाणांमध्ये उत्तर गोव्यातील ५४, तर दक्षिण गोव्यातील ६१ ठिकाणांचा समावेश होता. यामध्ये नद्या, तलाव, विहिरी, झरे यांच्यासह २० समुद्र किनाऱ्यांवरील पाण्याची तपासणी करण्यात आली होती. काही औद्योगिक वसाहतीत ८ ठिकाणी भूजल तपासणी केली होती. ही तपासणी सहा महिन्यांतून एकदा करण्यात आली होती.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, मार्च २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान मांडवी, साळ, वाळवंटी, जुवारी, शापोरा या नद्या आणि कोलवा खाडी येथील पाण्याच्या नमुन्यांत बहुतेक वेळा फिकल कॉलिफॉर्म या घातक जीवाणूंचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले होते. फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण जास्त असणारे पाणी पिल्यास पोटाचे आजार होऊ शकतात. याशिवाय बायाणा, बांबोळी, मिरामार, बागा, कळंगुट, मोरजी, मोबोर, गालजीबाग, कोलवा, बाणवली, बेताळभाटी, वार्का, आगोंद, पाळोळे, राजबाग, वेळसांव, वागातोर, हरमल, बोगमाळो येथील समुद्र किनाऱ्यांवरील पाण्यातही फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे.
बेतोडा नाला, सांतिनेज खाडी, म्हापसा नदी येथील पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण बहुतेक वेळा कमी झाल्याचे आढळले. येथील बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) प्रमाणाबाहेर वाढले आहे. पीएचचे प्रमाण कमी झाल्यावर पाण्यातील आम्ल गुणधर्म वाढतात. यामुळे जलचरांसाठी आरोग्यास धोका पोहोचण्याची शक्यता असते. अहवालानुसार, खांडेपार तलाव, रायतळे, पिळर्ण तलाव येथील पाण्याच्या नमुन्यांत काही वेळा पीएचचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. कुडका तळ्यातील एसएआरचे प्रमाण १२ पैकी २ महिने मर्यादेपेक्षा तिपटीहून अधिक होते. एका वर्षात राज्यातील बहुतेक विहीर आणि कूपनलिकांमध्ये (बोअर वेल) पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी, तर बीओडीचे प्रमाण अधिक होते.
साळ नदीतील फिकल कॉलिफॉर्म मर्यादेपेक्षा १० पटीने अधिक
अहवालानुसार, १२ पैकी ८ महिने साळ नदीच्या पाण्यातील फिकल कॉलिफॉर्म मर्यादेपेक्षा दहापटीने अधिक होते. याचे योग्य प्रमाण प्रति १०० मिलीलिटरमध्ये १०० किंवा त्याहून कमी इतके आहे. साळ नदीत ८ महिने फिकल कॉलिफॉर्म १३०० ते १७०० प्रति १०० मिलीलिटरपर्यंत पोहोचले होते. बायणा किनारी १० महिने फिकल कॉलिफॉर्म मर्यादेपेक्षा जास्त होते. येथे सप्टेंबर २०२४ मध्ये फिकल कॉलिफॉर्म ३५० प्रति १०० मिलीलिटर होते.
हरवळे धबधबा तीन महिने प्रदूषित
हरवळे धबधब्यातील पाण्यात तीन महिने एकूण फिकल कॉलिफॉर्म मर्यादेपेक्षा जास्त होते. येथे एकूण कॉलिफॉर्म मर्यादा प्रति १०० मिलीलिटरमध्ये ५००० किंवा त्याहून कमी इतकी आहे. हरवळेतील प्रति १०० मिलीलिटर पाण्यात ऑगस्टमध्ये ७,९००, सप्टेंबरमध्ये ९,४००, तर ऑक्टोबरमध्ये ५,४०० एकूण फिकल कॉलिफॉर्म आढळले होते.                  

हेही वाचा