सांतआंद्रे : आगशीमध्ये काळ्या, दुर्गंधीयुक्त पाण्याचा थेट शेतात निचरा

प्रदूषणाची तातडीने चौकशी व्हावी : चिंताग्रस्त स्थानिकांची मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th June, 10:54 am
सांतआंद्रे : आगशीमध्ये काळ्या, दुर्गंधीयुक्त पाण्याचा थेट शेतात निचरा

पणजी : आगशी गावातील नाल्यातून गेल्या आठवड्याभरापासून काळ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात होत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा निचरा थेट परिसरात असलेल्या मुख्य जलस्त्रोतांत होत असून, त्यामुळे शेती, इतर पाण्याचे स्रोत, जनावरे आणि स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाण्याचा रंग आणि दुर्गंधी पाहता ते औद्योगिक रसायन किंवा सांडपाण्याचा विसर्ग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.



या दूषित पाण्यामुळे  त्वचाविकार आणि डासजन्य आजारांचा धोका वाढला असून शेतकऱ्यांनी शेतात काम करणे तूर्तास  थांबवले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याचीही माहिती दिली असून  जनावरांनाही पाणी देताना भीती वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हे पाणी मुख्य नाल्यापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावरील शेतांपर्यंत पोहोचले आहे. स्थानिकांच्या मते, वाहिन्यांची गळती किंवा एकूणच जलनिचरा यंत्रणेतील बिघाड यामागचे कारण असावे. तसेच, रात्रीच्या वेळी औद्योगिक सांडपाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकर्समधून हे पाणी सोडले जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.



प्रशासनाने या प्रकाराची दखल घेत पर्यावरण खात्याच्या तज्ज्ञांना पाण्याचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. आगशी बायपास, पाद्रीभाट आणि आसपासच्या भागांतून नमुने संकलित करण्यात आले असून, त्यांचे रासायनिक परीक्षण सुरू आहे. मात्र स्थानिकांचा आरोप आहे की, आठ दिवस उलटूनही ठोस कारवाई झालेली नाही.




धक्कादायक बाब म्हणजे, नाल्यातून सोडण्यात आलेले दूषित पाणी आता गावातील पाण्याच्या मुख्य स्त्रोतांत आणि झुआरी नदीतही मिसळल्याने जलजीवसृष्टी आणि मासेमारी व्यवसायावरही धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत  पारंपरिक 'मानशीकार' मच्छीमारांचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि प्रदूषणाचा स्रोत तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. आगशी परिसरातील पर्यावरणीय समतोल धोक्यात आला असून, प्रशासनाने पारदर्शक आणि कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.