म्हादईः बेळगावकर रस्त्यावर आले, आता गोमंतकीयांनी कृती करावी : राजन घाटे

व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यास न्यायालयात गोव्याची बाजू अधिक बळकट होणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd June, 04:44 pm
म्हादईः बेळगावकर रस्त्यावर आले, आता गोमंतकीयांनी कृती करावी : राजन घाटे

पणजी : 'म्हादईचे पाणी वळवू नये', यासाठी बेळगावकर एक झाले आहेत. कणकुंबी, खानापूरचे काही लोक देखील पाणी वळवण्याला विरोध करत आहेत. या आंदोलनाला प्रख्यात पर्यावरणवादी रिधिमा पांडे यांनी पाठिंबा दिला आहे. आता गोमंतकीयांनी देखील याबाबत ठोस कृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन राजन घाटे यांनी केले. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शंकर पोळजी व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

घाटे म्हणाले की, कर्नाटकमध्ये वीसहून अधिक मोठ्या नद्या आहेत. असे असूनही तेथील जनता म्हादईचा प्रवाह वळवू नये यासाठी आंदोलन करत आहे. जवळपास ४६ टक्के गोवा पाण्यासाठी म्हादईवर अवलंबून आहे. येथे व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यास न्यायालयात गोव्याची बाजू बळकट होऊ शकते. मात्र सरकार यामध्ये चालढकल करत आहे. व्याघ्र प्रकल्पाबाबत जागृती करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरलो. येथील स्थानिकांना देखील तो हवा आहे. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे ते सांगत असल्याचे घाटेंनी सांगितले.

गोवा सरकार या म्हादईबाबत गंभीर नाही. येथील एक अधिकारी कर्नाटकला माहिती पुरवत असल्याचा आमचा आरोप आहे. आम्ही विरोध केल्याने त्या अधिकाऱ्याला आता मुदतवाढ देण्यात आली नाही. त्याच्या जागी आलेल्या नवीन अधिकाऱ्याने म्हादई वाचवण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. म्हादई वळवू नये यासाठी कर्नाटक एक झाला आहे. आता आम्ही देखील आमचे भेद विसरून म्हादई वाचवण्याठी एकत्र आले पाहिजे, असे मत घाटे यांनी यावेळी व्यक्त केले.