मुख्यमंत्री : स्थानिक समित्या, ग्रामसभांमुळे दावे निकाली काढण्यास विलंब
पणजी : वन हक्क कायद्यांतर्गत सनदीसाठींचे सर्व दावे १९ डिसेंबर २०२५ पर्यंत निकालात काढण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. स्थानिक समित्या व ग्रामसभांना उशीर होत असल्याने अर्ज निकालात काढण्यास विलंब होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी वन हक्क दाव्यांविषयीची उच्च पातळीवरील बैठक घेतली. बैठकीला मुख्य सचिव, महसूल सचिव, जिल्हाधिकारी व वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. वन हक्क दाव्यांचे अर्ज निकालात काढण्याबाबतची कालमर्यादा बैठकीत निश्चित करण्यात आली. बैठकीनंंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत वन हक्क दाव्यांच्या अर्जांची स्थिती स्पष्ट केली.
वन हक्क सनदीसाठी आलेल्या १० हजार ५०० अर्जांपैकी आतापर्यंत ८७१ अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. तर ९४९ अर्ज फेटाळ्यात आले आहेत. १५० सनदींचे वितरण ९ जून रोजी फोंड्यात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात केले जाईल. राज्यातील ६ तालुक्यांत १४ जून रोजी खास शिबिरे आयोजित करण्यात येतील. या शिबिरात उपजिल्हाधिकारी सुनावणी घेऊन अर्ज निकालात काढतील. तसेच सनदीसंबंधीच्या खटल्यांवर चर्चा करण्यासाठी २१ जून रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
वन हक्क सनदीचा विषय हा २००६ पासून प्रलंबित आहे. २००६ ते २०१९ पर्यंत एकही अर्ज निकालात काढण्यात आला नव्हता. माझ्या सरकारच्या काळात सुमारे २ हजार अर्ज निकालात काढले गेले आहेत. आता जेे ८,५०० पेक्षा अधिक अर्ज प्रलंबित आहेत, ते १९ डिसेंबरपर्यंत निकालात काढले जातील. यासाठीची कालमर्यादा वा वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. वन हक्क दावे निकालात काढण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. बऱ्याचदा अर्जदार ग्रामसभांना उपस्थित रहात नाहीत. आता सरकारी कर्मचारी फाईल्स हातावेगळ्या करणार आहेत. ग्रामसभांना अर्जदारांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याची गरज आहे.
उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी प्रलंबित वन हक्क दाव्यांविषयी गुरुवारी (दि. ५) बैठक घेतील. या बैठकीला पंचायत सचिव, बीडीओ, संयुक्त मामलेदार उपस्थित राहतील. यानंतर १४ जून रोजी काणकोण, सांगे, केपे, फोंडा, धारबांदोडा व सत्तरी तालुक्यात वन हक्क दावे निकालात काढण्यासाठी खास शिबिरे होतील.
प्रलंबित अर्जांवर जलद कार्यवाही
काणकोण (८८२), केपे (४६०), धारबांदोडा (५८), सत्तरी (२२), फोंडा (२१), सांगे (२२) या तालुक्यातील १,९६५ अर्ज शिबिरात निकालात काढले जातील. यानंतर १८ जून रोजी उपजिल्हाधिकारी ३,९७० अर्ज निकालात काढण्यासाठी बैठक घेतील. जिल्हाधिकारी पातळीवर ५६४ अर्ज प्रलंबित असून २१ जूननंतर ते निकालात काढले जातील, अशी माहितीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
एजन्सीने काम सोडल्याने समस्या
वन हक्क दाव्यांसाठी ज्या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती, त्या एजन्सीने मधेच काम सोडून दिले. यामुळे समस्या निर्माण झाली. आता त्याच एजन्सीची पुन्हा नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे.
.....
वन हक्क अर्जांची स्थिती
एकूण : १०,५००
मंजुर : ८७१
फेटाळलेले : ९४९
प्रलंबित : ८,६८०