चेंगराचेंगरीत १० ठार, २४ जखमी
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) विजेतेपद पटकावल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या अलोट गर्दीला चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे, तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तब्बल १८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएलचे जेतेपद जिंकल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. आपल्या लाडक्या संघाची एक झलक पाहण्यासाठी आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. गेट नंबर तीन येथे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
या गर्दीत काही उत्साही चाहते झाडांवर चढताना आणि संरक्षक भिंतीवरून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, हलका पाऊस सुरू झाल्याने लोक इकडे तिकडे धावू लागले आणि त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला, ज्यात लाठीमाराचाही समावेश होता.
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मागितली माफी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करत मोठ्या गर्दीमुळे गोंधळ उडाल्याचे म्हटले आहे. त्यांनी जनतेची माफी मागितली असून, लाखो लोक उपस्थित राहिल्याने परिस्थिती हाताळणे कठीण झाल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे आणि जखमींना भेट देण्यासाठी रुग्णालयात जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रम १० मिनिटांत आटोपण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.