दामू नाईक यांचे आवाहन : बाणावलीत भाजप कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद
मेळाव्याला उपस्थित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार उल्हास तुयेकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली, त्यांचे सत्कार करण्यात आले. ते मिरवण्यासाठी नाही, तर पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी आहे. सरकारच्या योजना, कामे लोकांपर्यंत पोहोचवा. अंत्योदय तत्त्वावर सरकार काम करते. त्यामुळे आपापसातील मतभेद दूर ठेवून पक्षाचे कार्य पुढे न्या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
बाणावली मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा कोलवा येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार उल्हास तुयेकर, प्रभाकर गावकर, सर्वानंद भगत, सत्यविजय नाईक आदी उपस्थित होते. मेळाव्यात बाणावली भाजप समितीच्या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार तुयेकर म्हणाले की, भाजप हा सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. विविध योजना तळागाळातील लोकांना मिळत आहेत. आगामी काळात बाणावलीत ‘कमळ’ फुलू शकते. खासदार तानावडे यांनी सांगितले की, देशात २०१४ पासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार चांगले काम करत आहे. राममंदिर उभारणीसह अत्याचारी कायद्यात बदल करण्यात आले आहेत. एकजुटीने काम केल्यास यश निश्चित मिळते. सरकारच्या योजना, सरकारने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या सरकारने पायाभूत सुविधा उभारताना युवक, महिला यांच्या विकासावरही भर दिला. भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनली आहे. देशात काँग्रेसच्या काळात न झालेली अनेक विकासकामे केली जात आहेत.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप