इपी कामत ग्रूपच्या ‘रिस्पॉन्सिबल अर्थ फाउंडेशन’तर्फे 'हरित चर्चा' मुलाखतीचा कार्यक्रम
कार्यक्रमात बोलताना डॉ. प्रकाश आमटे. सोबत डॉ. मंदाकिनी आमटे आणि प्रमोद आचार्य.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मानवाने लोभ सोडून केवळ गरजांची पूर्तता करावी. झाडे लावा आणि ती जगवा. जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासींप्रमाणे साधे आणि समतोल जीवन जगायला शिका, असे प्रतिपादन प्रसिद्ध समाजसेवक व मेगासेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
इपी कामत ग्रुपच्या ‘रिस्पॉन्सिबल अर्थ फाउंडेशन’तर्फे आयोजित 'हरित चर्चा' कार्यक्रमात ते बोलत होते. प्रुडंट मीडिया समूहाचे संचालक संपादक प्रमोद आचार्य यांनी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुलाखत घेतली. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते.डॉ. प्रकाश आमटे पुढे म्हणाले, आदिवासींना मदत करता आली नाही तरी त्यांच्यासोबत उभे राहता येते. आमच्या सामाजिक कार्याची सुरुवात आदिवासींच्या सहवासातूनच झाली. त्यांच्या जीवनपद्धतीचा अनुभव घेतल्यावर अनेक संस्था प्रेरित झाल्या आणि मदतीसाठी पुढे आल्या. आता माणसे जंगलांवर अतिक्रमण करत आहेत. परिणामी वाघ जंगल सोडून गावांकडे येत आहेत. मात्र, सरकारकडून आदिवासींच्या सुरक्षेची कोणतीच व्यवस्था केली जात नाही.
झाडे लावा, झाडे जगवा, संघर्ष टाळा
माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगवणे हाच एकमेव उपाय आहे. सर्वांनाच जगण्याचा अधिकार आहे. गरजा कमी करा आणि लोभ टाळा, असा स्पष्ट संदेशही डॉ. प्रकाश आमटे यांनी दिला.
गोव्याशी जुळले नाते
गोव्याबद्दलच्या आठवणी सांगताना डॉ. आमटे म्हणाले, माझ्या मुलाच्या लग्नासाठी गोव्यातूनच प्रस्ताव आला होता. गोव्याची संस्कृती खूपच वेगळी आणि समृद्ध आहे. २४ तासांत दोघांचे मन जुळले; पण हेमलकसामध्ये वीज आणि पाण्याची सोय नव्हती, त्यामुळे लग्न करण्यास संकोच होता. अखेर २००३ मध्ये ही सोय उपलब्ध झाल्यावर त्यांचे लग्न पार पडले.