आपत्ती व्यवस्थापनाअभावी फेरीबोट प्रवासही धोकादायक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आग नियंत्रण उपकरणे तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठीची यंत्रणा नसल्याने राज्यातील क्रूज बोटी व फेरीबोटी प्रवाशांसाठी धोकादायक बनल्या आहेत. बिठ्ठोण येथे क्रूज बोटीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व क्रूज बोटींचे १५ दिवसांत सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
पणजीतील ‘काँग्रेस भवन’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, क्रूज बोटी व फेरीबोटीमध्ये सुरक्षेची किमान साधने नसल्याने शिरगावसारखी दुर्घटना बोटीवर घडणे शक्य आहे. मागील आठवड्यात बिठ्ठोण येथे क्रूज बोटीला आग लागली होती. पहाटे घडलेल्या या घटनेवेळी कोणीही प्रवासी बोटीत नसल्याने मोठी हानी टळली. पर्यटक असताना आग लागली असती तर शिरगाव दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती. या आगीपासून बंदर कप्तान (कॅप्टन ऑफ पोर्टस) तसेच सरकारने धडा घेण्याची गरज आहे. दिवाडी येथेही फेरीबोटीला आग लागली होती. तेव्हा आग विझवण्यासाठी नदीतील पाण्याचा वापर केला गेला होता.
क्रूज व फेरीबोटीवर आपत्कालीन यंत्रणा वा सुरक्षेची साधने उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर बोटींचे सुरक्षा ऑडिट गरजेचे आहे.
दुर्लक्ष ठरेल मोठ्या आपत्तींसाठी निमंत्रण
बंदर कप्तान खात्यात रेडिओ अधिकारी, सुरक्षा अधिकारी नियुक्त झालेला नाही. नवीन बोटींना परवाना देताना बोटींची तपासणी कोण करतो, हा प्रश्न आहे. बंदर कप्तान खाते, सरकारचे बोटींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष मोठ्या आपत्तीला आमंत्रण देणारे ठरू शकते, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला.