दक्षिण गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालकांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला टॅक्सी स्टँड व हॉटेल्सवरील व्यवसाय बुडत असल्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. गावातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शॅक्स यांचे व्यवसाय राखण्याची व गावात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सरकारची असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दक्षिण गोव्यासह राज्यात किनारी भागात बाहेरील टॅक्सीचालकांकडून हॉटेल्सबाहेर येऊन भाडे घेऊन जाण्याचे प्रकार होत आहेत. स्थानिक टॅक्सीचालकांचे पोट याच व्यवसायावर असल्याने अॅपद्वारे बुकिंग केलेल्या गाड्या येऊन त्यांचा व्यवसाय घेत असताना ते आक्रमक होत आहेत. यातून वाद घडतात, गुन्हे नोंद होतात. या प्रकारात दक्षिण गोव्यात पर्यटक भरडले जात असून, गोव्याला दोष दिला जातो. राज्य सरकारने या वादावर गांभीर्याने विचार करत असे प्रकार थांबवण्यासाठी सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे.
राज्यातील टॅक्सी व्यवसायाला स्थानिक आणि अॅपधारक टॅक्सीचालकांमधील वादाने ग्रासले आहे. गोवा हे पर्यटन राज्य असून, देशी पर्यटकांसह विदेशी पर्यटकांचीही रेलचेल या ठिकाणी असते. पर्यटक येतात, किनारी भागात फिरतात, मंदिरे, नद्या, डोंगरदऱ्या, धबधबे व येथील हॉटेल्समधील पाहुणचाराचाही आस्वाद घेतात. मात्र, हे सगळे झाल्यानंतरही टॅक्सीचालकांच्या वादात पर्यटक भरडले गेले, तर त्यांना राग अनावर होतो. यानंतर ते सरकारच्या भूमिकेसह सुरक्षितता व आदरातिथ्याच्या मुद्द्यांबाबतही बोलतात व त्यामुळे गोव्याची बदनामी होत असते. हे सर्व थांबण्याची गरज आहे.
काही जणांकडून हा प्रश्न भडकवण्याचा प्रयत्न होत आहे का, याचीही चौकशी व्हावी. राजकारणाचा मुद्दा म्हणून टॅक्सीचालकांमध्ये फूट पाडण्याचे काम कुणी करत असल्यास, त्याचा परिणाम राज्याच्या बदनामीमध्ये होत असल्याने अशांवरही कारवाईची गरज आहे. राज्य सरकारने योग्य उपाययोजना करत हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.
दक्षिण गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालकांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला टॅक्सी स्टँड व हॉटेल्सवरील व्यवसाय बुडत असल्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. गावातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शॅक्स यांचे व्यवसाय राखण्याची व गावात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सरकारची असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अॅप-आधारित टॅक्सीचालकांकडून कोणत्याही गाडीला कुठूनही भाडे घेण्याची परवानगी परवान्याद्वारे दिल्याचे सांगण्यात येते. पण यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय काढून घेतला जात आहे. गरज पडल्यास गोवा बंद करण्याची तयारी दाखवत स्थानिक टॅक्सीचालकांनी सांगितले की, कोणत्याही गाडीला हॉटेल्सच्या गेटसमोर गाडी लावण्यास बंदी असतानाही, गोवा माईल्सच्या गाड्या तिथे उभ्या करतात. हे बंद होण्याची गरज आहे. हॉटेल्सवाल्यांनाही निवेदन सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.
किनारी भागातील हॉटेल्सचा फायदा हा त्या-त्या गावातील लोकांना होण्याची गरज आहे. त्यासाठीच गावातील जमिनी हॉटेल्ससाठी देण्यात आल्या आहेत. किनारी भागातील टॅक्सीचालक मागील ४० वर्षांपासून व्यवसाय करत चांगली सेवा देत आहेत. आता बाहेरून येणाऱ्या टॅक्सी, बसेस हॉटेलमधील व्यवसायही त्यांच्याकडून काढून घेतात, हा प्रश्न सुटण्याची गरज आहे. हॉटेल्सबाहेर टॅक्सी उभी करून पर्यटकांना घेऊन जाऊ नये. पर्यटकांना त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका असल्याने राज्य सरकारनेही यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी विरोधी व सत्ताधारी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत स्थानिक टॅक्सीचालक मांडतात. अॅपद्वारे येणाऱ्या टॅक्सी हॉटेलबाहेर थांबून व्यवसाय करतात, हा मुख्य प्रश्न आहे. गोमंतकीयांचे व्यवसाय धोक्यात येत असतानाही रायकर या विषयावर बोलून स्थानिक टॅक्सीचालकांवर गुन्हे नोंद करत त्यांना भडकावत आहेत, असेही स्थानिक टॅक्सीचालकांचे मत आहे.
किनारी भागातील हॉटेल्सना गावातील लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत. याची जाणीव ठेवत हॉटेल्स व्यवस्थापनानेही स्टँडवरील टॅक्सीचालकांकडून गाड्या घेऊन पर्यटकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांनी स्टँडवरील गाड्यांऐवजी बाहेरील गाड्यांची नेमणूक लग्न समारंभ, कॉन्फरन्स व इतर कार्यक्रमांसाठी करू नये, अशी मागणीही स्थानिक टॅक्सीचालकांची आहे. मात्र, ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याने अॅपवरून बुकिंग केल्यानंतर हॉटेलमध्ये पर्यटकांना आणण्यासाठी गेलेल्या टॅक्सीचालकांसह पर्यटकांनाही धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत. यातून स्थानिकांवर गुन्हे नोंद होत असल्याने वादाला मोठे स्वरूप येत आहे व हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. सरकारने गोव्याची बदनामी रोखण्यासाठी, पर्यटकांना सुरक्षितता मिळण्यासाठी, टॅक्सीचालकांतील वाद मिटवण्यासाठी एक पाऊल पुढे न टाकल्यास, हा वाद गोव्याच्या पर्यटनाला बट्टा लावणारा ठरणार आहे.
राज्यातील पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रात वेगाने बदल होत असताना, टॅक्सीचालकांकडून त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक सुधारणांसाठी वाढता आग्रह दिसून येत आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील पर्यटक टॅक्सीचालकांनी यापूर्वी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन पर्यटन वाहतूक क्षेत्रातील कॅब भाड्यातील असमानता आणि व्यावसायिक संधींबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केल्या होत्या. टॅक्सीचालकांनी अॅप-आधारित टॅक्सी सेवा आणि पारंपरिक ऑपरेटरकडून आकारल्या जाणाऱ्या भाड्यांमधील वाढती तफावत अधोरेखित केली. एकाच क्षेत्रात व्यावसायिक चढाओढ सुनिश्चित करण्यासाठी एकसमान भाडे रचनेची मागणी केली. गोव्यातील सध्याची व्यवस्था अन्यायकारक आहे आणि हजारो स्थानिक चालकांच्या उपजीविकेला धक्का पोहोचवत असल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञान किंवा स्पर्धेच्या विरोधात नाहीत, परंतु निष्पक्षता असली पाहिजे. सर्व टॅक्सीचालक - मग ते अॅप-आधारित असोत किंवा पारंपरिक - समान भाडे रचनेखाली काम करावे, अशी मागणी टॅक्सीचालक संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.
खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आश्वासन दिले की, ते संसदेत हा प्रश्न मांडतील. त्यांनी गोव्याच्या पारंपरिक टॅक्सीचालकांच्या सध्याच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचे आश्वासनही दिले.
दक्षिण गोव्यासह राज्यातील टॅक्सी चालक-मालक यांच्याकडून पारंपरिक व्यवसाय टिकावा यासाठी प्रयत्न होत आहेत. ज्यावेळी पर्यटन धोरणही नव्हते, त्या वेळेपासून स्थानिक टॅक्सीचालक पर्यटकांना चांगल्या सेवेसह सुरक्षितता उपलब्ध करत आहेत. त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या टॅक्सी, पर्यटकांच्या व इतर घटकांच्या मागणीनुसार वारंवार महागड्या गाड्या भाड्यासाठी विकत घेतलेल्या आहेत. पर्यटन स्थानिक टॅक्सीचालकांकडून वाढवण्यात आले असून, आता हा व्यवसाय दुसऱ्याच्या ताब्यात देण्यास किंवा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यास कोणीही तयार नाही, हा मुद्दा स्थानिक टॅक्सी चालक-मालक मांडत आहेत. अॅप-आधारित टॅक्सींच्या पर्याय उपलब्धतेशिवाय अन्य पर्यायांसाठी खुल्या मंचावर विचारांची देवाणघेवाण करून राज्य सरकारकडून यावर सुवर्णमध्य काढण्याची गरज सध्या दिसून येत आहे.
अजय लाड
(लेखक गोवन वार्ताचे दिक्षण गोवा
ब्युरो चीफ आहेत.)