टपाल व रेडिओ अजरामर

माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे रेडिओचे स्थान कमी झाले असले तरी, टपाल आणि रेडिओ या दोन सरकारी संस्था अजरामर आहेत, असे मडगावचे लेखक सखाराम शेणवी बोरकर ठामपणे सांगतात.

Story: ये आकाशवाणी है |
01st June, 12:15 am
टपाल व रेडिओ अजरामर

अनेक लेखक, व्यावसायिक, प्रशासक एके काळी आकाशवाणीचे कार्यक्रम व खासकरून बातम्या नियमित ऐकत असत. अद्ययावत राहायला व विश्वासार्ह बातम्या मिळायला रेडिओ हे एकमेव साधन होते. ज्या त्या दिवशीच्या गोव्याच्या बातम्या त्याच दिवशी प्रादेशिक बातम्या ऐकल्यावर मिळत. देश-विदेशातील बातम्या दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी-इंग्रजी बातमीपत्रांवर समजत.

मडगावचे लेखक सखाराम शेणवी बोरकर हे आकाशवाणीचे कैक वर्षांचे श्रोते व कलाकार होते. बातम्या तर ते दररोज ऐकत. त्यांच्याकडे एक समीक्षात्मक नजर होती. कधी कधी काही वृत्तनिवेदकांची वाचनाची गती वेगात वा संथ झाली, अथवा अनुवादात किंचित चूक झाली, तर ते माझ्या निदर्शनास आणून देत.

लहानपणच्या रेडिओच्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितलं, "आमच्या घरात त्या काळी ‘पाय’ कंपनीचा मोठा ट्रान्झिस्टर होता. तो उंच कपाटावर ठेवला जात असे. माझे बाबा व मोठा भाऊ दोघेच जण तो हाताळत. बाबा दिल्ली व मुंबई केंद्रावरील बातम्या ऐकत. ते ‘रेनासेन्स’ हा पोर्तुगीज कार्यक्रमही ऐकत. रेडिओला लायसन्स घ्यावं लागे. दर वर्षी टपाल खात्यात जाऊन त्या लायसन्सचं नूतनीकरण करावं लागे."

रेडिओ श्रवणाच्या इतर आठवणी सांगताना बोरकर यांनी सांगितलं, "१९६४ साली माझे मामा लायन्स क्लबच्या डेलिगेशनसमवेत जपानला गेले होते. त्यांनी येताना पोर्टेबल ‘नॅशनल पॅनासॉनिक’ रेडिओ आणला. वाड्यावर तो एकच ट्रान्झिस्टर होता. रात्री शेजारीपाजारी जमायचे. अंगणात चांदण्याच्या छताखाली चटई घालून ऐकत बसायचे. भारत-पाकिस्तान १९६५ व १९७१ युद्धांच्या बातम्या व कार्यक्रम आम्ही बीबीसी रेडिओ केंद्रावरून या ट्रान्झिस्टरवर ऐकत. जमलेले लोकही चवीने ऐकत. नंतर सर्वांचा आवडता व लाडका कार्यक्रम रेडिओने दिला तो म्हणजे सिलोन रेडिओचा 'बिनाका गीतमाला'. हा कार्यक्रम अमीन सायानी या निवेदकाने आपल्या हुकमी लाघवी कंठाने जगभर पोहोचवला. सायानींनी निवेदनाचे नवे मानदंड प्रस्थापित केले."

"पणजी केंद्रावर आम्ही 'खळार आणि मळार' हा मुलांचा कार्यक्रम दर रविवारी ऐकत बसत असू. 'मनपसंत गीते' (मराठी गीते) आणि 'मनाजोगती गितां' (कांतारां) हे फर्माईशवर आधारित कार्यक्रम कधी येणार याची आम्ही वाट पाहत असू. 'तुमची चिठी आमची जाप' हा साप्ताहिक कार्यक्रम उत्कंठावर्धक असायचा. श्रोत्यांच्या पत्रांना त्यातून उत्तरे देत असत. आम्हीही पोस्टकार्ड पाठवत असू. नाव आल्यावर आनंद होई. आकाशवाणीवरील हिंदी, इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत असत. त्या आम्ही नियमितपणे ऐकत असू, कारण त्या काळी बातम्या समजण्यासाठी इंटरनेटसारखे साधन नव्हते, टीव्ही नव्हता. विविध भारतीवरून अजरामर हिंदी गाणी ऐकायला मिळत असत."

रेडिओ केंद्रावरील सहभागाविषयी बोलताना लेखक सखाराम बोरकर म्हणाले की, "मलाही आकाशवाणीवरून कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कविसंमेलन प्रसारित होतं. त्यात सर्व भारतीय भाषांमधून एकेक कविता निवडली जाते. मला काही वर्षे कविता अनुवादित करून सादर करायची संधी मिळाली. त्या कवितेचे हिंदी व इंग्रजी अनुवाद येत असत. कविता वाचन, कथा वाचन असे कार्यक्रमही केले. न्यूज विभागाने मला अनुवाद करण्याची संधी दिली. त्यात मी केंद्र सरकारच्या कार्यक्रमांवर, योजनांवर आधारित जो मसुदा हिंदी-इंग्रजीमध्ये येत होता, तो कोंकणीत अनुवादित करून दिला."

सखाराम बोरकर पुढे म्हणाले की, "रेडिओ श्रवण आज माध्यमांच्या स्फोटामुळे कमी झालं तरी चालू आहे. मी कमी ऐकतो, पण गाडीतून जाताना एफएम, गाणी, बातम्या ऐकतो." बोरकर यांनी असाही दावा केला की, दोन सरकारी संस्था- टपाल व रेडिओ यांना कधीही मरण नाही.


मुकेश थळी

(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)