कादंबरी म्हणजे गद्य लेखनातील महत्त्वाचा प्रकार. सलग, लांब कथानक हे त्याचे वैशिष्ट्य. या कथानकाच्या अनुषंगाने येणारी इतर पात्रे आणि या सगळ्या पात्रांच्या भोवती विणली गेलेली स्वतंत्र कथानके वाचकाला गुंतवून ठेवतात. कादंबरीतील दीर्घ कथनामुळे पात्रांचे स्वभाव, त्यांचे गुण-दोष त्यात पुरेसे स्पष्टपणे उमटतात आणि तसेच ते वाचकांच्या मनातही उतरतात.
माझ्यासारख्या सामान्य वाचकांच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे काल्पनिक कथन, सत्य घटनेचे नाट्यमय स्वरूपातले कथन किंवा इतिहासातील एखाद्या घटनेवर बेतलेले काल्पनिक कथन असे कादंबरीचे ढोबळमानाने वर्गीकरण होऊ शकते. एखाद्या वेळी इतिहासातील प्रसंग नव्हे, पण त्यातल्या एखाद्या प्रथेवर किंवा समस्येवर आधारित परंतु पूर्णतः काल्पनिक असे कथनही कादंबरीत केले जाते. दीपा गायतोंडे यांची ‘सती’ ही कादंबरी याच प्रकारातली.
या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सती या प्रथेवर आधारित काल्पनिक कथानक आहे. कथानक काल्पनिक असले, तरी ते एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक विषयावर बेतलेले असल्यामुळे लेखिकेला त्या काळातले कायदे, प्रथा यांचे संदर्भ कथानकात गुंफवावे लागले. कल्पकतेची मुभा फक्त कथानकापुरती असून, त्यातल्या इतर घडामोडींवर, महत्त्वाच्या टप्प्यांवर या ऐतिसाहिक घटनांचे संदर्भ आहेत. या दोन्ही गोष्टींत समतोल राखणे हे अर्थातच अवघड काम असले पाहिजे, पण एखाद्या कसलेल्या लेखिकेसारखे दीपा गायतोंडे यांनी ते लीलया पेलले आहे. इतिहासातील संदर्भ, कायद्यांविषयी माहिती देताना कथानक रटाळ होणार नाही याची पुरेपूर काळजी घेताना कथानक फक्त काल्पनिक, स्वप्नाळू होणार नाही याची दखल लेखिकेने घेतलेली आहे.
‘सती’ कथेतील नायिका गतकालीन आठवणींच्या स्वरूपात प्रथम पुरुषी निवेदनात कथन करते. सुरुवातीलाच नायिका आपली ओळख करून देते, तेव्हा ‘पडघवली’ या गो. नि दांडेकरांच्या कादंबरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शैलीतील साधर्म्य का अनुकरण असा प्रश्न सुरुवातीला पडतो, पण नंतर लेखिकेच्या स्वतंत्र शैलीची प्रचिती येते. उमा (नायिका) तिच्या जीवनाचा पट वाचकांसमोर उलगडते. ती लग्न होऊन सासरी जाते, तेव्हाच सासरी असलेल्या सती या प्रथेबद्दल तिच्या मनात भीती असते. दुर्दैवाने तिच्या पतीचा मृत्यू होतो आणि तिच्या मनातली भीती खरी ठरते. सती न जाण्याचा निर्णय वगैरे घेण्याची मुभा तिला नसते, पण त्या काळात नव्याने आलेला कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणारे समाजसुधारक यांच्या प्रयत्नांमुळे ती वाचते. मात्र तिचा जीव वाचल्यानंतर तिचे आयुष्य आणखी अवघड होते. अशावेळी तिच्या आयुष्यात अप्पासाहेबांचा प्रवेश होतो आणि तिला एक ध्येय मिळते. आप्पासाहेबांबरोबर ती या ध्येयापर्यंतचा प्रवास निश्चित करते. वाटेत असंख्य अडचणी येतात, पण त्या निभावून नेण्याचे सामर्थ्य तिच्यात असते.
स्वातंत्रपूर्व काळातील या घटना, त्यामुळे तत्कालीन सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, भाषिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथानक पुढे जायला हवे याचे भान लेखिकेने कुठेही सोडलेले नाही. आजच्या तारखेला त्यातील अनेक गोष्टी विसंगत वाटतील. लेखिकेचे वय लक्षात घेता, तिलाही हे संदर्भ कथानकात गुंफणे सहज साध्य नसले पाहिजेत असे वाटते. पण संपूर्ण कादंबरीत कुठेही ते तिच्या लेखणीतून निसटत नाहीत. त्याचबरोबर त्यात बेमालूमपणे ऐतिहासिक संदर्भही अलगद विणले गेले आहेत हे पुन्हा एकदा नमूद करणे जरुरीचे वाटते.
कथानक पुढे जाते, तसे त्यात अनेक पात्रे येत जातात. प्रत्येक पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे स्वतंत्रपणे प्रकटीकरण होते आणि कथानक एका लयीत पुढे जात राहते. कथानकाच्या या प्रवासात काही ठिकाणी आता कुठे आणि कसे वळण येणार आहे याची कल्पना वाचकाला आधीच येते. त्याचप्रमाणे घडतेही; पण त्यातही काही धक्के अलगद येतात, कधी सुखद तर कधी दुःखदही. वाचकाला पुढे काय घडणार आहे हे काही ठिकाणी अगदी आधीच कळून जाते, तरीही यामुळे वाचन रटाळ होत नाही.
कथानकात येणाऱ्या पात्रांचे वेगवेगळे स्वभाव याबरोबरच महत्त्वाचे आहेत त्या त्यांच्या वेगवेगळ्या समस्या. आधी म्हटल्याप्रमाणे, एका क्रूर प्रथेवर आधारित कादंबरी असल्याने त्या प्रथेशी निगडित (आणि त्या प्रथेमुळे निर्माण होणाऱ्या इतर प्रथा) सगळ्या समस्या लेखिकेने उपस्थित केल्या आहेत. प्रत्येक पात्राच्या उपकथनकात या समस्यांचा आपल्यापरीने वेध घ्यायचा प्रयत्न करून त्यावरचे उपाय लिहितानाही लेखिकेने सामाजिक भान पाळले आहे.
विधवा पुनर्विवाह याबाबतीत लिहिताना लेखिकेने अनेक छोट्या समस्यांच्या, गोष्टींचा विचार केला आहे. प्रत्येक घटनेतून वेगळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हे कथानक जुन्या काळातले त्यातून स्त्रियांच्याबाबतीत घडणाऱ्या अत्याचारांवर आधारित असले, तरीही यातील स्त्रिया या बिचाऱ्या, पीडित न वाटता कणखर आहेत. या स्त्रियांचे असे चित्रीकरण करतानादेखील लेखिकेने त्या काळातील त्यांच्या सामाजिक स्थानाचे भान ठेवले आहे, ही गोष्ट विशेष. यामुळे या स्त्रियांचा कणखरपणा उगाच कुठलातरी आव आणलेला न वाटता, अस्सल वाटतो.
सती जातानाच्या प्रसंगांचे वर्णन यामध्ये अर्थातच येते. तिथे कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त प्रभाव साधण्याचे लेखिकेचे कौशल्य दिसून येते. उगाच भडक वर्णने, मानसिक, भावनिक पातळीवर वाचकाचा छळ होईल अशी वाक्ये न लिहितासुद्धा लेखिका अगदी एखाद-दुसऱ्या वाक्यांत थेट आणि परिणामकारक लिहिते. या लेखनशैलीमुळे कथानक एका वेगाने पुढे जात राहते.
कादंबरी शेवटाकडे येते, तशी ती जास्त जलद होत जाते. एव्हाना त्यात निर्माण झालेली अनेक उपकथानकेही पूर्ण व्हावीत अशी वाचकाची अपेक्षा असते. तशी ती होतातही. वाईट, दुष्ट प्रथा अशा एकाएकी संपत नाहीत, मग कादंबरी का असेना, त्याला वास्तवाची जाणीव हवी, हे भानही लेखिकेला आहे. शेवटचे काही प्रसंग नाट्यपूर्ण आहेत, पण अतिरंजित मात्र नाहीत.
एक प्रथा, त्यावर आधारित एक सशक्त कथानक आणि ते सांगण्याची लेखिकेची शैली या त्रिसूत्रीमुळे ही कादंबरी वाचनीय झाली असून पुढेमागे यावर आधारित एखादा चित्रपट आल्यासही आश्चर्य वाटणार नाही.
मुग्धा शेवाळकर मणेरीकर