आपली पाळेमुळे

आज तो गावाचा सरपंच आहे, पण अजूनही त्याची पावलं त्याच मातीत चालतात, जिथे त्याने आपली स्वप्नं रुजवली. आपल्या भाषेची, मातीची पाळेमुळे तो विसरला नाही.

Story: कथा |
01st June, 12:12 am
आपली पाळेमुळे

एका निसर्गरम्य स्वप्नात उगवलेल्या त्या गावात, जणू मातीही माणुसकीचा सुगंध पसरवत होती. तेथे चंद्रासारखी शांतता आणि सूर्यासारखी कार्यशीलता नांदत होती. लोकांचे हृदय गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे कोमल आणि त्यांची नाती वटवृक्षाच्या मुळांसारखी खोलवर गेलेली होती. दुजेपणाला तिथे तसूभरही वाव नव्हता. साधेपणाचं माणिक आपल्या हृदयात जपणारे हे गावकरी, एकमेकांच्या सुखदुःखाचे सावलीसारखे साथी होते.

त्या वाडीत वसंत आणि संजय ही दोन भावंडं, जणू दोन फुलणारी फुलं. वसंत म्हणजे त्यागाचं झाड, ज्याने आपल्या सावलीत संजयला फुलवलं. वडिलांच्या मृत्यूनंतर वसंताने आपलं बालपण मातीला अर्पण केलं आणि आपल्या भावाच्या भविष्याची मशागत सुरू केली. त्याने स्वत:चं शिक्षण अर्धवट सोडलं, पण संजयच्या स्वप्नांना आभाळ देण्यासाठी आपली झोप, आपलं आरोग्य, आपला प्रत्येक श्वास अर्पण केला. 

दहावीच्या निकालाच्या दिवशी, संजयचा नंबर पाहून वसंताचं मन फुलपाखरासारखं थिरकलं. “माजो भाव शिकान-सवरान व्होडलो माणूस जातलो आणि माजा नाव मोठा करतलो असो माजो विश्वास आसा” असे म्हणत तो मनोमन सुखावला. “देवा म्हादेवा, तुजे उपकार आसंत, असोच तुजो या झिलाचेर लक्ष थेय..” अशी प्रार्थना करत भविष्याची सुखद स्वप्ने तो रंगवू लागला. 

वसंताने आपल्या मातीच्या हातांनी शहरातल्या संजयसाठी रक्ताचे पाणी केले, कधी कर्जात आकंठ बुडून, तर कधी नांगर चालवताना सारा घाम संजयच्या यशात रुपांतरित केला हे त्याला त्याचेच कळले नाही. पण काळाच्या प्रवाहात संजयचं मन शहराच्या कडवट वाऱ्यांनी विटून गेलं. पैशांवर त्याची नजर जडली, उच्चभ्रू समाजाच्या झगमगाटात त्याने आपल्या पाळामुळांवर माती ओतली. त्या मृगजळामध्ये, तो आपलाच भाऊ ओळखेनासा झाला. संजयने वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी करवून घेतली व आपला हिस्सा विकला. तो आता तिरसट, स्वार्थी, संकुचित प्रवृत्तीचा बनला आहे ह्या सद्यस्थितीची जाणीव करवून देऊन वसंताचे डोळे उघडण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला परंतु तो वायफळ ठरला. ‘नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे त्याने सपशेल दुर्लक्ष केले. 

“माजा भावाक काय तरी अडचण येयली आसतली म्हणान त्येनीन ह्या टोकाचा पाऊल उखल्ला आसतला” असे मत व्यक्त करीत त्याने सद्यस्थितीपासून पलायन करण्याचा वायफळ प्रयत्न केला. तरीही त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. “पोर, वाट चुकलो आसात जाल्यार त्येका सारक्या मार्गाचेर हाडपाक जाया...” असा निर्धार करून त्याने शहराची वाट धरली. 

काँक्रिटच्या जंगलात त्याला अवघडल्यासारखे झाले. “संजय हय... हयसर रवता न्हू?” भलत्याच माणसाने घराचे दार उघडल्यानंतर त्याने काचरतच विचारले. “संजय परब नावाचा इसम येथे राहत होता. परंतु आता इथून पुढे दोन कि.मी. अंतरावर असलेल्या निता अपार्टमेंटमध्ये तो शिफ्ट झाला.” 

वसंताला ह्याची काहीच माहिती नसल्यामुळे त्याला धक्काच बसला. सांगितलेल्या पत्त्यावर तो पोहोचला असता बाहेरच संजयची गाठ पडल्यामुळे तो सुखावला. परंतु त्याला बघताच संजयच्या चेहऱ्यावरील भाव विचित्र झाले. हायप्रोफाइल लोकांच्या पुढ्यात आपली लाज जाईल म्हणून त्याने वसंतला फरफटत दूर नेले. क्षणभर वसंत गोंधळला. “संजय, असो किद्याक वागतय रे?”

बोली भाषा ऐकून संजय वैतागला. आजूबाजूला कोणी नाही याचा कानोसा घेऊन तो म्हणाला, “हे काय मळलेले कपडे घालून इथे आला आहेस? शिक्षणाचा मागमूस नाही. वर तुझी भाषा! लोक हसतील मला... जमिनीचा जाब विचारायला आला असशील तर त्यावर माझासुद्धा समान हक्क होता आणि त्याच पैशांनी मी फ्लॅट घेतला. पैसे मागायला आला असशील तर माझ्याकडे नाहीत.”

संजयच्या मनातील आपली जागा वसंतच्या लक्षात आली व स्वाभिमानाने जगण्यासाठी तो तेथून परतला. शहरी विचारांचा पगडा संजयच्या विचारांवर, वागण्या-बोलण्यावर कोसावरुन दिसत होता. आपल्या गावातील पाळेमुळे ह्यांचा विसर त्याला पडला होता. 

स्वत:साठी जगण्याचे राहिले हे वसंताच्या लक्षात आले. संजयच्या ओठांतून निघालेल्या त्या काटेरी शब्दांनी वसंताच्या काळजात आसूड उगारला. पण तो ना डगमगला, ना मोडला. “मी ढासळलंय तरी, माझी माती ना विसारचंय ” असा निश्चय त्याने मनोमन केला.

वाऱ्याचा वेग रोखता येत नाही, पण मुळं खोलवर असली की वृक्ष उन्मळत नाही. वसंताने आपली शिक्षणाची वाट परत धरली. त्याचा मुलगाच त्याचा शिक्षक झाला. वसंताच्या कष्टांच्या शेतात आता ज्ञानाची पिकं उगवली. पन्नाशी ओलांडूनही त्याचे डोळे चमकले, पदवीच्या प्रमाणपत्रात त्याला आपली खरी ओळख सापडली.

आज तो गावाचा सरपंच आहे, पण अजूनही त्याची पावलं त्याच मातीत चालतात, जिथे त्याने आपली स्वप्नं रुजवली. आपल्या भाषेची, मातीची पाळेमुळे तो विसरला नाही. तो ना झगमगाटाने आंधळा झाला, ना शहरी दिखाव्याने मोहवला. त्याच्या मनात एकच मंत्र – “शिक्षणाने माणूस मोठा होतो, पण माणुसकीने तो खरा महान ठरतो.”


रंजिता बा. शेणवी देसाई 
पेडणे