क्रुज बोटींचे सुरक्षा ऑडीट करा : काँग्रेस

आपत्ती व्यवस्थापनाअभावी बोटीसह फेरीबोट प्रवासही धोकादायक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd June, 04:44 pm
क्रुज बोटींचे सुरक्षा ऑडीट करा : काँग्रेस

पणजी : आग नियंत्रण उपकरणे तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठीची यंत्रणा नसल्याने राज्यातील क्रुज बोटी व फेरीबोटी प्रवाशांसाठी धोकादायक बनलेल्या आहेत. बिठ्ठोण येथे क्रुज बोटीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व क्रुज बोटींचे १५ दिवसांत सुरक्षा ऑडीट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बोटींच्या सुरक्षा ऑडिटची मागणी केली. क्रुज बोटी तसेच फेरीबोटीमध्ये सुरक्षेची किमान साधने नसल्याने शिरगावसारखी दुर्घटना एखाद्या बोटीवर घडणे शक्य असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

मागच्या आठवड्यात बिठ्ठोण येथे एका क्रुज बोटीला आग लागली होती. पहाटे घडलेल्या या घटनेवेळी सुदैवाने कोणीही प्रवासी बोटीत नसल्याने जीवितहानी टळली. पर्यटक वा प्रवासी असताना आग लागली असती तर शिरगाव दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती. या आगीपासून बंदर कप्तान (कॅप्टन ऑफ पोर्टस) तसेच सरकारने धडा घेण्याची गरज आहे. दिवाडी येथे फेरीबोटीलाही आग लागण्याची घटना घडली आहे. यावेळी आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नदीतील पाण्याचा वापर केला होता.
क्रुज बोट असो वा फेरीबोट असोत कोणतीही आपत्कालीन यंत्रणा वा सुरक्षेची साधने उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बोटींचे सुरक्षा ऑडिट करणे आवश्यक असून हजारो प्रवासी प्रवास करणाऱ्या फेरीबोटींचेही सुरक्षा ऑडीट करणे आवश्यक आहे.

सरकारने दुर्लक्ष करणे हे मोठ्या आपत्तींसाठी निमंत्रण
बंदर कप्तान खात्यात रेडिओ अधिकारी तसेच सुरक्षा अधिकारी नियुक्त झालेला नाही. यामुळे नवीन बोटींना परवाना देताना बोटींची तपासणी कोण करतो? हा प्रश्न आहे. बंदर कप्तान खाते तसेच सरकारचे बोटी तसेच फेरीबोटींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष मोठ्या आपत्तीला आमंत्रण देणारे ठरू शकते, असा इशारा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यानी दिला आहे.