‘शुभमंगल’ करताना ‘सावधान’!

अंधानुकरणातून लग्नासारख्या पवित्र कौटुंबिक सोहळ्यांना आपणच बाजारू स्वरूप दिले आहे. निव्वळ इतरांचे अनुकरण करण्याच्या ओघात आणि मुलांप्रती असणाऱ्या हळव्या संवेदनांना बळी​ पडून ऐपत नसतानाही अनेक जण ऋण काढून ‘सोहळे’ साजरे करतात. लग्न या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सोहळ्याचा इव्हेंट बनला आहे. बोलणी करण्यापासून साखरपुड्यापर्यंत आणि हळदीपासून ते लग्न उरकेपर्यंत केले जाणारे सेलि​ब्रेशन अक्षरश: उबग आणते. अनुकरणप्रिय समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी व्यापक आणि दीर्घकालीन परिणाम साधणाऱ्या प्रबोधनाची गरज आहे.

Story: वर्तमान |
9 hours ago
‘शुभमंगल’ करताना ‘सावधान’!

लग्न हा असा योग आहे जो बहुतेकांच्या आयुष्यात एकदाच येतो. त्यामुळे हा क्षण जन्मभर लक्षात राहावा, ती आयुष्यभरासाठीची साठवण राहावी, यासाठी प्रत्येकाची धडपड असते. याच भावनेतून विवाह सोहळ्यासाठी अनेक वर्षे पुंजी साठवून नंतर ‘पाण्यासारखा’ पैसा खर्च करण्याकडे कल असतो. श्रीमंत, अतिश्रीमंत, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि अगदी कमी उत्पन्न गटातील लोकही आपापल्या स्तरानुसार खर्च करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत विवाह सोहळ्यांना आलेले बाजाराचे स्वरूप आणि या उधळपट्टीतून काय गवसते, याचा धांडोळा घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर अवघ्या विवाह व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले. जाहीररीत्या समोर आलेला हा एक प्रकार. अशा घटना शेकडोंनी घडत असतात, मात्र त्याची जाहीर वाच्यता कोणी करत नाहीत. त्यामुळे एकूणच विवाह व्यवस्थेतील बदलांना, रचनेला कुठे तरी आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

आधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण काय आहे ते पाहू. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी शशांक हगवणे हिचा १६ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला ही आत्महत्या आहे, असे सांगण्यात आले. परंतु शवचिकित्सा अहवालात गळफास, मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले. यामुळे खुनाचा संशय बळावला. लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार, चांदीची​ भांडी, चांदीची मूर्ती, पती शशांकसाठी दीड लाखांचा मोबाईल, महागडा गॉगल, घड्याळ आदी वस्तू दिल्या होत्या. तरीही माहेरहून रोख रक्कम आणि इतर गाेष्टींसाठी वैष्णवीकडे तगादा लावला जात होता. त्यातून मारहाणही होत होती, असे तपासात उघड झाल्यामुळे तिच्या मृत्यूप्रकरणी नवरा, सासू, सासरे, दीर, नणंद यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्र​क्रिया सुरू आहे. या प्रकरणात हुंड्याचा कंगोरा समोर आल्याने महाराष्ट्रासह देशभर या प्रकरणाची चर्चा होत आहे. लग्न होत असताना दीड कोटींच्या आसपास रकमेच्या वस्तू दिलेल्या असतानाही आणखी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ हाेत होता. हा छळ सहन करत तिने आणि तिच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबीयांच्या प्रत्येक मागणीला प्रतिसाद दिला. लग्न टिकावे यासाठी तिच्या वडिलांनी​ पडती बाजू घेतली. मात्र नेहमीच्या पैशांच्या तगाद्याला वैतागलेल्या वैष्णवीच्या वडिलांनी एकदा नकार दिला आणि पुढचा काळ वैष्णवीसाठी बिकट बनला. हुंड्याचा सोस अखेर तिच्या मृत्यूवर बेतला.

अंधानुकरणातून पायावर धोंडा!

एक म्हणजे, लग्न टिकावे म्हणून वधू पक्षाकडून नेहमीच पडती बाजू घेतली जाते. दुसरी गोष्ट, ऐपत नसतानाही वर पक्षाच्या अवास्तव मागण्या मान्य केल्या जातात. तिसरी बाब म्हणजे कायद्याचा आधार न घेता आपसात तोडगा काढण्याचा मार्ग स्वीकारला जातो. हुंड्याशी संबंधित प्रकरणांत कमी-अधिक फरकाने ही स्थिती सगळीकडेच बघायला मिळते. वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे या ‘हुंडाप्रेमी’ समाजाचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे. परंपरांच्या जोखडात आपण इतके बेमालुमपणे अडकले जातो की, योग्य काय आणि अयोग्य काय, याचा अर्थ लावायच्या भानगडीत पडत नाही. समाजाच्या चालीरीतींचे पालन करताना आपली आर्थिक ससेहोलपट मुकाट्याने सहन करतो. शेजाऱ्याने, नातेवाईकाने किंवा मित्रवर्गातील कोणी तरी मोठ्या थाटात केलेला विवाह, सगळा झगमगाट, वारेमाप खर्च आदी बाबतींचे अंधानुकरण करण्याची प्रथाच पडली आहे. विवाह व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या घटकांचे त्यातून भले हाेतही असेल. मात्र अलीकडच्या काळात आलेले बाजारू स्वरूप पाहता, विवाह संस्थेच्या बदलत्या रचनेला कुठे तरी लगाम घालण्याची​ गरज असल्याचे जाणवते.

दिखाऊपणाचा सोस...

हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रभावामुळे म्हणा किंवा चंगळवादी​ संस्कृतीशरण वृत्तीमुळे म्हणा, लोकांना देखाव्याचा जास्त सोस असल्याचे दिसून येते. मी अमूक इतक्या रकमेचे दागिने मुलीला घातले इथपासून ते आम्ही इतक्या लाखांचा खर्च लग्नात केला, अशा बढाया मारणाऱ्यांची कमतरता नाही. काही जण तर निव्वळ इतरांचे अनुकरण करण्याच्या ओघात आणि मुलांप्रती असणाऱ्या हळव्या संवेदनांना बळी​ पडून ऐपत नसतानाही ऋण काढून ‘सोहळे’ साजरे करतात. याचे दूरगामी परिणाम अर्थात त्यांना स्वत:लाच भोगावे लागतात. या काेंडीतून बाहेर पडण्याचे मार्ग आम्ही स्वत:च बंद करून घेतले आहेत. त्यामुळेच लग्न या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सोहळ्याचा इव्हेंट बनला आहे. बोलणी करण्यापासून साखरपुड्यापर्यंत आणि हळदीपासून ते लग्न उरकेपर्यंत केले जाणारे सेलि​ब्रेशन अक्षरश: उबग आणते. अनुकरणप्रिय समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी समाजधुरिणांनी​ पुढे यायला हवे. त्यासाठी ठोस कार्यक्रम आखणे क्रमप्राप्त असून महाराष्ट्रातील मराठा समाजाने त्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे.

मराठा समाजाने आपल्या ज्ञातीतील बांधवांना लग्न समारंभ करत असताना काही सूचना केल्या आहेत. त्यातील उल्लेखनीय सूचना पुढीलप्रमाणे,

१०० ते २०० लोकांच्या उपस्थितीतच लग्नसोहळा उरकावा. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना पसंती द्यावी. प्री-वेडिंग शुट बंद करावे, केलेच तर जाहीर दाखवू नये. नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये.लग्नात फक्त वधुपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत. भेटवस्तूऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख अहेर करावेत. देखावा करू नये, लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. इच्छा असेल, तर मुलीच्या नावावर एफडी करावी. जेवणात पाचपेक्षा जास्त पदार्थ नको. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी.

या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन शक्य नसले, तरी तसा प्रयत्न करायला हरकत नसावी. कारण अलीकडे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने लग्न सोहळ्यांचे ‘प्रदर्शन’ सुरू आहे, ते पाहता वायफळ खर्चाला आळा घालण्यासाठी अशा काही उपाययोजनांची गरज आहे. ग्रामीण भागात लग्न करायचे म्हटले तर शेजारी-पाजारी आणि नातेवाईक मिळूनच पाचशे लोकांचा गोतावळा सह​ज जमतो. त्यामुळे उपस्थिती लावणाऱ्यांची संख्या नियंत्रित करणे कठीणच आहे. मात्र मराठा समाजाच्या इतर सूचना स्वागतार्ह आहेत. त्याचे पालन केल्यास आपल्या ‘अनुकरणप्रिय’ समाजातील दुर्बल घटकांना तरी दिलासा नक्की​च मिळू शकतो. समाजाने स्वत:च अशा आचारसंहिता अमलात आणल्या, तर विवाहासारख्या उत्तम कौटुंबिक सोहळ्याला इव्हेंटसारखे कृत्रिमतेचे गालबोट लागणार नाही.

व्यापक प्रबोधनाची गरज...

समाजाला चांगल्या मार्गावर नेणाऱ्या कुठल्याही उपक्रमाबाबत प्रबोधन आवश्यक असते. विवाह संस्थेच्या समाजानुकूल स्वरूपाबाबत प्रबोधन अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी किर्तनकार, निरुपणकार, व्याख्याते, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यायला हवा. समाजाला दिशा देण्याचे कार्य आम्ही​ करतो, असे हे घटक ठासून सांगत असतात. आता त्यांच्या दिशादर्शन कौशल्याची समाजाला गरज आहे. ज्यांच्या वक्तृत्वाला समाजमान्यता मिळाली आहे, अशा लोकांनी लग्न समारंभांमधील उधळपट्टीबाबत भूमिका मांडावी. निकोप समाजनिर्मितीसाठी अशा धुरिणांनी प्रबोधनाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी. धार्मिक संघटनांनी तर या मोहिमेचे नेतृत्व आपणहून स्वीकारायला हवे. समाजाला केवळ धर्मतत्त्वांचे डोस पाजून थांबून चालणार नाही, तर अशा दीर्घकालीन समाजोपयोगी​ उपक्रमांसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी धार्मिक संघटनांनी आपल्या संघटनकौशल्याचा आणि हुकूमतीचा वापर करावा.

युवा पिढीने पुढाकार घ्यावा...

गेल्या काही वर्षांत प्रागतिक, पर्यावरणपूरक विवाहपद्धतीचे उत्तम उदाहरण काहींनी समाजासमोर ठेवले आहे. गतवर्षी विठ्ठल शेळके या शिक्षकाने आपला विवाह परंपरागत चालीरिती आणि पर्यावरणपूरक पद्धतीची सांगड घालून समाजाच्या साक्षीने घडवून आणला. त्यांच्या लग्नाची गोव्यात आणि गोव्याबाहेरही मोठी​ चर्चा झाली, बातम्या प्रसारित झाल्या, सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट पडला. मात्र त्यांचे अनुकरण कोणी केल्याचे पाहण्यात आले नाही. अशांचा आदर्श युवा पिढीने घ्यायला हवा. अंधानुकरणातून जसे चंगळवादी​ वृत्तीला आपण आपलेसे केले, तसेच यापुढे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या पथदर्शी कृतींपासून प्रेरित होऊन समाजात बदल घडविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यायला हवा. कारण नव्या, चौकटीबाहेरच्या विचारांना प्रस्थापित करण्याची कुवत आणि धमक युवकांमध्येच असते. युवापिढीने स्वत:हून लग्न सोहळ्यांचे ‘इव्हेंट’ करण्याच्या वृत्तीला फाटा देण्यासाठी पुढाकार घेतला, तर वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी अपेक्षा करता येईल.


सचिन खुटवळकर 
(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)