वाढत्या वायू आणि जल प्रदूषणाबाबत सतर्कता

गोवा सुंदर समुद्र किनारे, पश्चिम घाटातील हिरवळ, जंगल, धबधबे यासाठी प्रसिद्ध आहे. याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात. मात्र वाढते प्रदूषण ही गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे. जी स्वच्छ हवा घेण्यासाठी, किनाऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे येतात तेच जर मिळाले नाही तर त्यांचे येणे बंद होईल.

Story: कॉलिंग अटेंशन |
12 hours ago
वाढत्या वायू आणि जल प्रदूषणाबाबत सतर्कता

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या अहवालानुसार राज्यातील काही ठिकाणी वायू आणि जल प्रदूषण वाढले आहे. मंडळाने मागील आर्थिक वर्षात राज्यातील १८ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा तपासला होता. विविध ठिकाणी ४६ ते १०८ दिवस हवेतील प्रदूषण घटकांचे मोजमाप केले होते. बायणा, वास्को, कुंकळ्ळी, कुंडई, डिचोली, म्हापसा येथे काही दिवस वायू प्रदूषण वाढल्याचे आढळून आले. याशिवाय मंडळाने राज्यातील नद्या, तलाव, खाड्या, झरे, धरण, समुद्रकिनारे तसेच विहरीतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली होती. मंडळाने एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ विविध ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली होती. या नमुन्यांतील ३० ते ५० प्रकारच्या प्रदूषण घटकांचे मापन करण्यात आले होते.

बहुतेक ठिकाणी पाण्यातील फिकल कॉलिफॉर्म या घातक जिवाणूंचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तर  काही ठिकाणी पाण्याचा पीएच, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी झाल्याचे आढळले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वायू प्रदूषण तपासण्यासाठी हवेतील पीएम १०, पीएम २.५ या  प्रदूषण कणांचा तसेच हवेतील सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइड यांचा अभ्यास केला जातो. याचे विश्लेषण करून मग एक्यूआय काढला जातो. यानुसार ० ते ५० एक्यूआय चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अतिखराब तर ४०१ ते ५०० हा गंभीर स्वरूपाचा समजला जातो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार मध्यम आणि खराब स्वरूपाच्या एक्यूआयमुळे अस्थमा, फुफ्फुसाचे रोग तसेच हृदय रोग असणाऱ्या व्यक्तींना श्वास घेण्यात त्रास होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे व्यक्ती अस्वस्थ होण्याची शक्यताही असते.  

गतवर्षी कुंकळ्ळी, कुंडई, डिचोली, म्हापसा येथील एक्यूआय काही दिवस मध्यम स्वरूपाचा होता. बायणा, वास्को येथे काही दिवस एक्यूआय २०१ च्या पुढे गेला होता. येथे घातक पीएम १० कणांचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर गेले होते. १९ जून २०२४ मध्ये बायणातील पीएम १० चे प्रमाण २४ तासात तब्बल ३३७ पर्यंत पोहोचले होते. तर या दिवशी येथील एक्यूआय २८७ होता. वास्कोमध्ये १० जानेवारी २०२५ रोजी पीएम १० चे प्रमाण २३० पर्यंत पोहोचले होते. हवेतील पीएम १० प्रदूषण कणांची २४ तासातील मर्यादा २०१ च्या पुढे गेल्यास डोळे, नाक, घसा, तसेच फुफ्फुसाला त्रास होऊ शकतो. बायणात १०० पैकी १८ दिवस हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्यूआय) हा मध्यम स्वरूपाचा तर ३ दिवस खराब स्वरूपाचा होता. वास्कोमध्ये ८६ पैकी १३ दिवस एक्यूआय मध्यम तर १ दिवस खराब होता.  

मिळालेल्या माहितीनुसार २०२४-२५ मध्ये बायणामध्ये केवळ २२ दिवस एक्यूआय चांगल्या दर्जाचा होता. तर वास्कोमध्ये ४६ दिवस एक्यूआय चांगला होता. मंडळाने कुंकळ्ळीमध्ये १०७ दिवस हवेचे प्रदूषण तपासले होते. येथे हवेचा दर्जा १३ दिवस मध्यम स्वरूपाचा, ८१ दिवस समाधानकारक तर केवळ १३ दिवस चांगला होता. राजधानी पणजीत मागील काही वर्षे स्मार्ट सिटीची कामे सुरू होती. असे असले तरी येथील हवेचा दर्जा सुधारला.  २०२३-२४ मध्ये १० टक्के दिवस, तर २०२४-२५ मध्ये ६ टक्के दिवस पणजीतील एक्यूआय हा मध्यम स्वरूपाचा होता. २०२४-२५ मध्ये पणजीत ४२ दिवस एक्यूआय दर्जा चांगला होता. 

राज्यातील जल प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. मंडळाच्या अहवालानुसार मार्च २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान मांडवी, साळ, वाळवंटी, जुवारी, शापोरा या नद्या, कोलवा खाडी येथील पाण्याच्या नमुन्यात बहुतेक वेळेस फिकल कॉलिफॉर्म या जिवाणूंचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले होते. फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण जास्त असणारे पाणी पिल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.  याशिवाय बायणा, बांबोळी, मिरामार, बागा, कळंगुट, मोरजी, मोबोर, गालजीबाग, कोलवा, बाणवली, बेताळभाटी, वार्का, अगोंद, पाळोळे, राजबाग, वेळसांव, वागातोर, हरमल, बोगमाळो येथील समुद्र किनाऱ्यावरील पाण्यात फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे.

राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारसह आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ ठराविक दिवस हवेची तपासणी न करता दररोज केली पाहिजे. आपल्या शहरात दररोज किती प्रदूषण होते याची माहिती सामान्य जनतेला मिळाली पाहिजे. स्वयंचलित केंद्रातून गोळा करण्यात आलेली माहिती दररोज प्रसिद्ध झाली पाहिजे. 

गोवा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. वर्षभरात येथे करोडो देशी, विदेशी पर्यटक येत असतात. गोवा सुंदर समुद्र किनारे, पश्चिम घाटातील हिरवळ, जंगल, धबधबे यासाठी प्रसिद्ध आहे. याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात. मात्र वाढते प्रदूषण ही गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे. जी स्वच्छ हवा घेण्यासाठी, किनाऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे येतात तेच जर मिळाले नाही तर त्यांचे येणे बंद होईल.


पिनाक कल्लोळी
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)