जगभरातील संस्कृतींमध्ये काजव्यांना आध्यात्मिक/पौराणिक महत्त्व दिले आहे. पश्चिम आफ्रिकेत काजव्यांना अंधार दूर करुन उजेड दाखवणारी प्रकाशाची देवता मानले जाते. काजव्यांची संख्या जरी चिंता करण्यासारखी नसली तरी काजवा जगवणे हे आपले कर्तव्य आहे.
वर्षा ऋतुची लागलेली चाहुल ग्रीष्म ऋतुच्या समाप्तीचे संकेत देत असते. ह्या काळात आपल्याला निसर्गाच्या विविध छटा पहायला मिळतात. वातावरण एकदम खुलून जाते व तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, प्रभाकर करकरे, संदीप खरे यांसारख्या कवीवर्यांनी शब्दांच्या वेणीत गुंफलेल्या कविता अलगद ओठांवर येतात. ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूचा वनी रुजवा’, ‘आला पाऊस मातीच्या वासात गं’, ‘वादळवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो’, ‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची’... यांसारख्या कवितांच्या जोरावर मन थुई थुई नाचु लागते.
सरल्या आठवड्यात अचानक रात्र भटकंतीसाठी जंगलात जाण्याचे ठरले. किण्ण शांतता, किट्ट काळोख, रातकीड्यांची किर् किर् ऐकत टाॅर्चच्या सहाय्याने आम्ही सर्वजण जंगल पिंजत चाललो होतो. दाट झाडी, मातीचा घमघम, दरवळणारी सुगंधित रातराणी व झुळझुळणाऱ्या झऱ्यापाशी पोहोचताच वन मार्गदर्शकाने अचानक आम्हाला थांबवले व सर्व टॉर्च बंद करत क्षणभर डोळे बंद करुन उघडण्यास सांगितले. 'काजवे काजवे उजेडाचे थवे रानात भेटती काळोखाच्या, थव्यासभोवती रातकिडे गाती माळरानी एका काळोखाच्या'...डोळे उघडताच पहायला मिळाला तो लखलखणाऱ्या काजव्यांचा थवा आणि कानात घुमू लागली तिसऱ्या इयत्तेतील गोमंतभारतीची ती मराठी कविता.
काजवा हा निशाचर भुंगा. भारतात काजव्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. काजव्याच्या प्रत्येक प्रजातीमध्ये एक अद्वितीय फ्लॅश पॅटर्न असतो जो त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यास आणि जोडीदार निवडण्यास मदत करतो. कोणता जोडीदार निवडायचा हे काजव्याचा फ्लॅश पॅटर्नवरुन ठरतं. काही काजवे सतत फ्लॅश करतात, तर काही काजवे विशिष्ट वेळानंतर फ्लॅश करतात. हा भुंगा सामान्यतः पोटाजवळच्या अवयवातून शीत प्रकाश उत्सर्जित करतो. हा प्रकाश सौम्य उष्णतेचा असतो. काजव्यांद्वारे प्रकाश उत्सर्जित होणाऱ्या ह्या प्रक्रियेला 'बायोल्युमिनेसन्स' असे म्हणतात. बायोल्युमिनेसन्स या रासायनिक अभिक्रियेद्वारे काजवे प्रकाश निर्माण करतात. काजव्यांच्या पोटातील 'लाईट एमिटींग कंपाऊंड-ल्युसिफेरिन (एंजाइम)' जेव्हा अल्ट्राव्हायोलेट लाईट शोषून घेते तेव्हा काजवे प्रकाश उत्सर्जित करतात. ऑक्सिडेशन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या प्रक्रियेत ऑक्सिजन, कॅल्शियम आणि एडेनोसिन ट्रायफॉस्फेट ही रसायने ल्युसिफेरिनसोबत मिसळतात व काजव्यांच्या पोटाखालच्या भागात प्रकाश निर्माण करतात. या निर्माण झालेल्या प्रकाशाला 'कॉल्ड-लाईट' किंवा 'वॉर्म-ग्लो' असे म्हटले जाते.
काजवे किंवा विजेचे किडे त्यांच्या जादुई तेजासाठी ओळखले जातात. काजवे ही मोहक चमक प्रामुख्याने जोडीदार शोधण्यासाठी/निवडण्यासाठी, शिकार आकर्षित करण्यासाठी किंवा भक्षकांपासून स्वतः चे रक्षण करण्यासाठी वापरतात. काजव्यांच्या नर आणि मादीमध्ये फरक असतो. नर काजव्यांना पंख असतात म्हणून ते उडू शकतात. जर तुम्हाला जमिनीवर रेंगाळणारा काजवा दिसला तर समजून जा की ती मादी आहे. मादी काजवा उडू शकत नाहीत. कारण त्यांना पंख नसतात. इतर मोठे कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, वटवाघळे काजव्यांची शिकार करतात. बहुतेक काजवे बेचव असतात. ते खाल्ल्याने भक्षकांना तात्पुरते आजारही जडू शकतात. त्यामुळे काजव्याची एकदा चव घेतलेला भक्षक सहसा परत त्यांच्यावर हल्ला करायला जात नाही.
काजव्याच्या जीवन चक्राचे मुख्यत्वे चार टप्पे असतात. अंडी, अळी, कोश व प्रौढ. काजवे मे महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्यापर्यंत पाहायला मिळतात. मिलनानंतर मादी काजवा गोगलगायीच्या पाठीवर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या गोगलगायीला खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतात. ह्या प्रक्रियेमध्ये त्या मातीत मिसळून जातात. गोगलगाय हे अळीचे मुख्य खाद्य. एकदा का मिलन झाले की नराचा जीवनक्रम संपतो. मार्चनंतर उष्णता वाढू लागली व उकाडा असह्य होऊ लागला की अधूनमधून पावसाच्या सरी सुरु होतात. पाऊस सुरू झाल्यानंतर किंवा पावसाच्या गार हवेमुळे काजवे मातीतून बाहेर येतात.
काजव्याची अळी पूर्णपणे मांसाहारी असते. प्रौढ झाल्यानंतर काजवा स्वयंप्रकाशित व पूर्णतः शाकाहारी बनलेला असतो. फुलातील परागकण एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर पसरवण्याचे कामही तो करतो. प्रौढत्वापर्यंत पोहोचेपर्यंत काजवे शाकाहारी जीवनशैलीकडे वळतात. जगभरातील संस्कृतींमध्ये काजव्यांना आध्यात्मिक/पौराणिक महत्त्व दिले आहे. पश्चिम आफ्रिकेत काजव्यांना अंधार दूर करुन उजेड दाखवणारी प्रकाशाची देवता मानले जाते. काजव्यांची संख्या जरी चिंता करण्यासारखी नसली तरी काजवा जगवणे हे आपले कर्तव्य आहे. काजव्यांना आकर्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रांगणातील दिवे मंद/बंद करुया. स्थानिक फुलांची रोपटी लावून काजव्यांसाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करुया. लखलखणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाचा आनंद लुटूया.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)