विचार व विनोद हवेत

रेडिओ वा इतर प्रसार माध्यमांतून विचार व विनोद दोन्ही हवेत. विनोद पाहिजे पण हॅ हॅ हा हा करून २४ तास नव्हे. विचार नसेल तर जीवनाची गाडी पुढे कशी चालेल? जीवनात विनोद व विचार ही दोन्ही चाकं पाहिजेत व याचं भान प्रसार माध्यमांना हवं!

Story: ये आकाशवाणी है |
13 hours ago
विचार व विनोद हवेत

आकाशवाणीवर सकाळी म्हणजे पहाटे प्रथम सत्र सुरू होताना शहनाई असायची. प्रेरक संगीत असायचं. कारण ती दिवसाची सुरूवात. ‘तुझ्या कृपेने दिन उगवे हा...’ हे वातावरण. नंतर ‘विचारधारा’ असायची. विचारधारा सांगणं, विचार वाचणं हे जरी दोन मिनिटांचं काम असलं तरी ते वाचन एका नम्र, गोड, हृदयस्पर्शी, आर्जवी आवाजात सादर करणं हे सोपं काम नव्हे. एकेका श्रोत्याच्या हृदयात ते खोलवर रूतलं पाहिजे. तो ऐकणारा श्रोता रिफ्रेश व्हायला पाहिजे. तो विचार त्याच्या विचारांना चालना देणारा सकारात्मक असला पाहिजे. दिवसभराच्या संघर्षांना तोंड देण्यासाठी त्याला बळ मिळालं पाहिजे. 

आरंभी हे विचार आम्हीच आकाशवाणीवरील अधिकारी आणि निर्माते वाचत असू. सगळे अनुभवी असल्याने ते वाचन सफाईदारपणे व्हायचं. कन्टेन्ट म्हणजे आशयघन सुविचार लिहिणं किंवा ते निवडून काढणं हे एक मोठं कार्य असे. मला अनेकदा सुविचार लिहायची संधी मिळाली. वाचलेही खूप.

इथं एक किस्सा आठवतो. संचालकांना वाटलं की आमचे आवाज सर्वपरिचित आहेत. कलाकारांचे आवाज घेऊ. विविधता येईल. कलाकार म्हणजे नाट्य कलाकार. काही कलाकारांनी येऊन सुविचार वाचले. पण काहींचे वाचन नाट्यमय झाले. सुविचार वाचताना एक वेगळाच वाचिक अभिनय लागतो. स्पष्ट, स्वच्छ दुसऱ्याला पटेल अशा प्रकारची वाणी. त्या कलाकारांना जर व्यवस्थित दिग्दर्शन किंवा मार्गदर्शन दिलं असतं, तर किंबहुना ते अधिक चांगलं सादरीकरण करूही शकले असते. काही स्तंभलेखकांना सुविचार लिहून आणायला सांगत आणि पाच-सहा बरोबरच ध्वनिमुद्रीत करत. असे वेगवेगळे रंग या छोट्याशा दोन मिनिटांच्या कॅप्सूलला येत गेले. 

‘विविध भारती’ चॅनलवरून हिंदी सुविचार पहाटेच येत. त्या निवेदकांचे आवाजच इतके मंद्र, घनगर्भ असायचे की ते शब्द थेट हृदयात घुसत. आजही स्मरण केले तर अंगावर रोमांच उठतात. ते विचार बहुतेक आध्यात्मिक असत. ईश्वर, सत्य, दया, प्रेम अशा विषयांवर असत. या विचारांचे दिवसभर अंगी अभिसरण होत राही. श्रोत्याला त्या प्रभावी सुंदर आवाजाची व अर्थबोधाची गोडी लागत असे.

विचार तर पाहिजेच. तो एक शक्तीवर्धक असा जीवन घटक. त्याच बरोबर समतोल राखायला दैनंदिन रहाटगाडग्यात विनोदही हवा. दिल्ली केंद्राच्या मुख्य एफएम केंद्रावरून फार प्रभावी विनोद सादर केले जात असत. हे चुटकुले सादर करणारी टीम, थिएटर फेकल्टी स्कूलमध्ये सादरीकरण कला शिकलेली असावी असं वाटायचं. कारण त्यांचं निवेदन, नाट्यमय मांडणी विलक्षण कमालीची पकड घेणारी असे. रेडिओ बंद  करावासा वाटत नसे. त्यांचा आवाज व सादरीकरणाची समज उत्कृष्ट असायची. दिल्लीला असे अनुभवी युवा कलाकार मिळतात. हे चुटकुले कार्यक्रम लोकप्रिय झाले. मध्येच एक ‘नॉस्टॅल्जीक हिंदी फिल्म गीत’ वगैरे यायचं. त्याचा फ्लो शैलीदारपणे गुंफलेला असे. एक कुठला तरी विषय घेऊन तो कार्यक्रमाचा कणा असल्यासारखा फिरवत. त्या आशयाला हसवायची ताकद होती. उपहास असायचा. ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ वगैरे टीव्हीवर यायच्या अगोदरची ही गोष्ट. 

आमच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम वाहिनीवरून विनोद प्रसारित करायला सुरूवात झाली. त्यात मध्ये गितांचा शिडकावा असायचा. मी सुध्दा काही छान ऐकलेले विनोद कलाकारांना दिले. कालांतराने या कार्यक्रमात सातत्य राहिलं नाही. तो कार्यक्रम कधी बंद झाला कळलं नाही. 

मला कायम वाटतं, रेडिओ वा इतर प्रसार माध्यमांतून विचार व विनोद दोन्ही हवेत. विनोद पाहिजे पण हॅ हॅ हा हा करून २४ तास नव्हे. विचार नसेल तर जीवनाची गाडी पुढे कशी चालेल? म्हणून त्यात अधूनमधून विराम, विसावा हवा आणि ते म्हणजे विनोदाचं शिंपण. सर्व शीण, ताण विसरून जायला विनोद हवेत. पेपरात व्यंगचित्र असतं. विनोद, उपरोध दाखवणारं, हसवणारं. जीवनात विनोद व विचार ही दोन्ही चाकं पाहिजेत व याचं भान प्रसार माध्यमांना हवं!


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)