शेतकऱ्यांना महिन्यानंतर मिळणार हानीभरपाई

कृषी खात्याकडून आढावा पूर्ण : ९८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
शेतकऱ्यांना महिन्यानंतर मिळणार हानीभरपाई

पणजी : राज्यात २० ते २५ मे दरम्यान झालेल्या पावसामुळे पाच तालुक्यांतील कापणी न केलेल्या भात शेतीचे नुकसान झाले होते. कृषी खात्यातर्फे नुकसानीचा आढावा पूर्ण झाला आहे. यानुसार सांगे, केपे, काणकोण, सासष्टी आणि धारबांदोडा या तालुक्यांतील ३२३ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. पावसाने ९८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. कृषी खात्यातर्फे प्रति हेक्टर ४० हजार रुपये किंवा त्याहून अधिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई मिळण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.
कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाने १० हेक्टर भात शेतीचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर नुकसान वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यानुसार राज्यातील ९८ हेक्टर भात शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधी योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यानुसार प्रति हेक्टर ४० हजार रुपये नुकसान भरपाई देता येते. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड असणे आवश्यक असते. राज्यातील काही शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही. असे असले तरी या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यात २० ते २५ मे दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या होत्या. रब्बी हंगामात धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण आणि सासष्टीमध्ये काही ठिकाणी भाताची पेरणी उशिराने होते. यामुळे कापणीस देखील थोडा उशीर होतो. बहुतेक पिके मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कापणीस घेतली जातात. परंतु, यंदा त्यापूर्वीच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने पिकांचे नुकसान झाले.
केपे तालुक्यात १०४ शेतकऱ्यांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाने केपे तालुक्यातील १०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येथे ३० हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. सांगे तालुक्यात ९६ शेतकऱ्यांच्या ४३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. सासष्टीमधील ९२ शेतकऱ्यांचे १६.९ हेक्टर जागेतील पिकाचे नुकसान झाले. धारबांदोडामधील ३० शेतकऱ्यांचे ६.७२ हेक्टर जागेतील पिकांचे नुकसान झाले. तर काणकोणमधील एका शेतकऱ्याचे १.२ हेक्टर क्षेत्रातील पीक वाया गेले.             

हेही वाचा