आता निर्णायक लढाईशिवाय पर्याय नाही : प्रा. वेलिंगकर

डिचोलीत मराठी निर्धार मेळावा : ‘मराठी राजभाषा झालीच पाहिजे’चा नारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th June, 11:49 pm
आता निर्णायक लढाईशिवाय पर्याय नाही : प्रा. वेलिंगकर

डिचोली : मायमराठीवर आजवर खूप अन्याय सहन केला, आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे, असे उद्गार प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी काढले. डिचोली येथे आयोजित 'मराठी निर्धार मेळाव्यात' ते बोलत होते. संपूर्ण गोव्यात मराठीसाठी जागृती करताना केवळ मराठीप्रेमीच नव्हे, तर मराठी व्होट बँक तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठीप्रेमी ८० टक्के असूनही मराठीला न्याय मिळत नसल्याने, यापुढे मराठी राजभाषा मागणीला मान्यता देणाऱ्यालाच मत देण्याचा निर्धार करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठी राजभाषा निर्धार समिती गोवा मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा हा डिचोली प्रखंड मेळावा तारी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गो.रा. ढवळीकर, मुकुंद कवठणकर, शाणुदास सावंत, बाबुसो सावंत, सुबोध मोने, सायली गर्दे आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मुकुंद कवठणकर यांनी प्रास्ताविक केले.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष मराठीच्या बाजूने असेल, त्यालाच मत मिळेल, असा निर्धार करण्याचे आवाहन वेलिंगकर यांनी केले. पूर्वी मराठी आमदारांनी मतदान केले असते, तर आज इतकी वर्षे मराठीसाठी संघर्ष करावा लागला नसता. ‘आता नाही तर कधीच नाही’ हा निर्धार करून मराठी व्होट बँक म्हणून कार्यरत राहण्याची वेळ आली आहे, असेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

गो. रा. ढवळीकर यांनी मराठी राजभाषा होणारच आहे, असा विश्वास व्यक्त केला. कोकणी नुकतीच वर येत होती, तिचा कुठेच वापर नव्हता, पात्रता नसताना कोकणीला राजभाषा करण्यात आले आणि मराठीला तिचे स्थान मिळाले नाही, हे घटनेच्या विरोधी असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषा गोव्यात ज्ञानेश्वर काळापासून कार्यरत असून, कोकणीचे कृत्रिम शब्द तयार केल्यामुळे आज एकही कोकणी वृत्तपत्र चालू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

‘डिचोली प्रखंड समिती’ची स्थापना

यावेळी डिचोली प्रखंड समिती जाहीर करण्यात आली, ज्यात बाबुसो सावंत (अध्यक्ष), अरविंद सायनेकर (उपाध्यक्ष), मुकुंद कवठणकर (समन्वयक), ओंकार केळकर (सचिव), नितीन मळगावकर (कोषाध्यक्ष) व इतर सदस्यांचा समावेश आहे.

यावेळी 'मराठी राजभाषा झालीच पाहिजे' अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी केली. मराठी भाषिक, लेखक, कलाकार, कीर्तनकार आणि पत्रकार यांचा यावेळी गौरव करण्यात आला. 

मराठी संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक

अनुदान इंग्रजी शाळांना देताना मतांसाठी 'आईला विकण्यात' आल्याची संतप्त भावना व्यक्त करत वेलिंगकर म्हणाले, आता ताकद निर्माण केली पाहिजे. यावेळी मराठी राजभाषा झालीच पाहिजे! माझी आई माय मराठीसाठी संघटित राहा, कारण मराठी भाषा राष्ट्रीय स्वाभिमान, संस्कृती आणि राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे. गोव्यात भारतीय संस्कृती नांदते आहे आणि या संस्कृतीशी प्रतारणा करून मराठी शाळा बंद करणे हे गोव्यासाठी 'अराष्ट्रीय' असल्याचे त्यांनी म्हटले. सर्व मतभेद विसरून एकसंघ येणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा