भविष्यात सीसीटीव्ही, ड्रोन यांचा देखरेखीसाठी वापर तर करावाच लागेल, शिवाय पोलीस व स्वयंसेवकांना गर्दी व्यवस्थापन प्रशिक्षण बंधनकारक करावे लागेल. सुरक्षा नियोजन व डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंबही सहाय्यभूत ठरू शकेल.
उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यात भाविकांनी गमावलेले प्राण, शिरगावमध्ये भाविकांचे चेंगराचेंगरीत गेलेले बळी अशा दुर्घटनांमुळे जनतेमध्ये शिस्तीचा अभाव आणि प्रशासकीय गलथानपणा दिसून आला होता. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली आणि त्याची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत माणसाचे प्राण जात राहतील याचा प्रत्यय नव्याने बंगळुरू येथे याच आठवड्यात आला. तेथे घडलेली चेंगराचेंगरी ही एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तथा आरसीबी या संघाच्या आयपीएल २०२५ च्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो चाहत्यांनी केम्पेगौडा मैदान परिसरात गर्दी केली होती. मात्र उत्सवाचे रूपांतर काही क्षणांतच गोंधळ आणि चेंगराचेंगरीत झाले, ज्यात अनेक निष्पाप जणांचा जीव गेला. या घटनेमागे मुख्यतः प्रशासनाचे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव आणि अफवांचा फैलाव ही प्रमुख कारणे आहेत. अफवेनुसार मैदानामध्ये विराट कोहली आणि इतर खेळाडू अगदी थोड्याच वेळासाठी दिसणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे गर्दीने गेटवर एकदम धाव घेतली आणि अफाट लोकसंख्येमुळे चेंगराचेंगरी झाली. सुरक्षेची तयारी अपुरी होती, तसेच मेडिकल पथकही वेळेवर पोहोचू शकले नाही. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये तरुण, महिला आणि वृद्ध यांचा समावेश होता. काही लहान मुलांनाही गंभीर इजा झाली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आणि क्रिकेटप्रेमातला हा आनंद एका शोकांतिकेत बदलला.
ही दुर्घटना फक्त बंगळुरूच नव्हे, तर देशभरात मोठी चर्चा आणि संतापाचा विषय बनली. नागरिकांनी सुरक्षेच्या अपयशावर प्रश्न उपस्थित केले. अनेक संघटनांनी प्रशासनावर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री व गृह खात्याने या घटनेची चौकशी जाहीर केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि डीएनए एन्टरटेनमेंट नेटवर्क्स प्रा. लि.च्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेच्या संदर्भात ताब्यात घेतले आहे. ज्यांची चौकशी केली जात आहे, त्यात आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसाळे, तसेच कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी डीएनए एन्टरटेनमेंटचे सुनील मथ्यू आणि किरन कुमार यांचा समावेश आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत आरसीबीचे निखिल सोसाळे पत्नीसह एकत्र वेळ घालवताना दिसले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्देशानुसार, राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांनी आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर काही पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेता असे दिसते की, पोलीस आणि आयोजकांना गर्दीचे नियंत्रण करणे जमले नाही. प्रवेशद्वारांची संख्या कमी होती तसेच ध्वनिक्षेपकावरून वेळीच आवश्यक सूचना दिल्या गेल्या नसल्याने अराजक माजले. सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती प्रसारित झाल्यावर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी धाव घेतली. आत प्रवेश देताना कोणालाच अडवले गेले नाही, त्यामुळे सारी झुंड स्टेडियममध्ये घुसली. आता सोशल मीडियावर अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे आयोजक, सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस यांची चौकशी सुरू आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या. बंगळुरू चेंगराचेंगरी हा केवळ एक अपघात नव्हे, तर नियोजन, शिस्त आणि जबाबदारीच्या अभावामुळे झालेले एक गंभीर प्रशासकीय अपयश आहे. यापासून धडा घेत भविष्यकाळात सार्वजनिक कार्यक्रम अधिक नियोजित, सुरक्षित आणि जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे. जनतेनेही संयम राखून व अफवांवर विश्वास न ठेवता आपली व इतरांची सुरक्षितता जपणे गरजेचे आहे. भविष्यात सीसीटीव्ही, ड्रोन यांचा देखरेखीसाठी वापर तर करावाच लागेल, शिवाय पोलीस व स्वयंसेवकांना गर्दी व्यवस्थापन प्रशिक्षण बंधनकारक करावे लागेल. सुरक्षा नियोजन व डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंबही सहाय्यभूत ठरू शकेल.