कॅन्सर इस्पितळ काळाची गरज

गोव्याला कॅन्सरचा विळखा बसायच्या आधीच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय केले तर अनेकांचे जीव वाचतील. त्यासाठी गरज आहे ती व्यापक कॅन्सर तपासणी शिबिरांची आणि सुसज्ज सरकारी इस्पितळाची. गोव्याच्या आरोग्याच्या भविष्यासाठी या गोष्टींची अत्यावश्यकता आहे.

Story: संपादकीय |
05th June, 10:41 pm
कॅन्सर इस्पितळ काळाची गरज

गोव्याला कॅन्सरचा विळखा बसतो, हे विधान आता केवळ चिंता व्यक्त करणारे वाक्य राहिलेले नाही; ही वास्तवाची, धोक्याची घंटा आहे आणि त्यावर कृतीची गरज अधोरेखित करणारी आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात कॅन्सरचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि विविध खासगी इस्पितळांतील आकडेवारी ही गोव्यातील वाढत्या आरोग्य संकटाची साक्ष देते. आरोग्य खात्याने राज्यभरातील सोळा ठिकाणी चार हजार नागरिकांची चाचणी केली त्यातील २० जणांना आधीच कॅन्सर झाला आहे, तर १५० जणांमध्ये या आजाराची लक्षणे आहेत असे स्पष्ट झाले. ही संख्या पाहता, राज्यभर व्यापक तपासण्या झाल्यास गंभीर परिस्थिती समोर येऊ शकते. २०२० ते २०२४ या कालावधीत केवळ गोमेकॉमध्ये १,५४० रुग्णांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांत एकूण १०,०७९ रुग्ण सापडले असून २०२४ मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. ही आकडेवारी पाहूनच गोव्यात भविष्यात कॅन्सरची काय स्थिती असेल, ते लक्षात येते. ही गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे.सध्या गोव्यात कॅन्सरवरील उपचारासाठी पुरेशा सुविधा नाहीत. अनेक रुग्णांना उपचारांसाठी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू अशा शहरांमध्ये जावे लागते. हे आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या रुग्णांसाठी कठीण ठरते. अनेकजण उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे मध्येच उपचार सोडतात किंवा उशिरा निदान झाल्यामुळे जीव गमावतात. हे चित्र बदलण्यासाठी गोव्यात एक स्वतंत्र, सुसज्ज आणि तज्ज्ञांनी युक्त असे कॅन्सर रुग्णालय उभारणे ही काळाची गरज आहे. सध्या गोमेकॉच्या आवारात सुरू असलेले टर्शरी कॅन्सर केअर सेंटर हे आशेचा किरण ठरू शकते. हे केंद्र लवकर पूर्ण व्हायला हवे. सर्व उपचार, निदान, केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी, पुनर्वसन अशा सर्व सेवा या टर्शरी कॅन्सर केंद्रात उपलब्ध व्हायला हव्यात. त्यासाठी कॅन्सरच्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, समुपदेशक यांचीही आवश्यकता आहे. आत्ताच्या घडीला कॅन्सर रुग्णांची संख्या पाहता गोमेकॉच्या परिसरात होणारे या केंद्राचे ‘सुपरस्पेशालिटी’मध्ये रूपांतर व्हायला हवे.

आरोग्य खात्याने सुरू केलेले मोफत कॅन्सर तपासणी अभियान हा एक सकारात्मक उपक्रम आहे. कॅन्सरच्या चाचण्या महागड्या असतात, त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या या सेवेमुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळतो. हा उपक्रम अधिक ठिकाणी, ‘प्रत्येक गावात चाचणी’ या ध्येयाने राबवणे गरजेचे आहे. सरकारने त्यासाठी धोरणात्मक उपाय राबवून कॅन्सरचा धोका ओळखून राज्यभर कोणीही मोफत चाचणी करू शकते, अशी व्यवस्था केली तर अनेकांना ते फायद्याचे ठरणार आहे. गोवा सरकारने कॅन्सर प्रतिबंध, निदान व उपचार धोरण तयार करावे. यात मोफत चाचणी, उपचारासाठी सवलती, विमा योजना आणि जनजागृतीसाठी विशेष तरतूद असावी. सोबतच या विमा योजनेत कॅन्सरवरील उपचारासाठीचा निधी वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून गरीब रुग्णांनाही जगण्यासाठी चांगल्या दर्जाचे उपचार घेता येतील.

कॅन्सर ही काही केवळ वैद्यकीय समस्या नाही, सामाजिक समस्याही आहे. बदलती जीवनशैली, तंबाखू, मद्यपान, प्रदूषण, अनियमित आहार यामुळे हा आजार वाढतो. शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत पातळीवर जीवनशैलीत सुधारणा आणि आरोग्य शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. जेव्हा कॅन्सरच्या तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन होते, त्यात निरोगी जीवनशैलीवरही जागृती करण्याची शक्यता सरकारने पडताळायला हवी. 

गोवा सरकारने वेळेत पावले उचलली, तर हजारो जीव वाचू शकतात. ही वेळ राजकीय घोषणांची नव्हे, तर वैद्यकीय क्रांतीची आहे. त्यासाठीच सरकारी स्तरावर लवकरात लवकर कॅन्सरचे इस्पितळ उभे रहायला हवे, जिथे चांगल्या सुविधा मिळतील. कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक चाचण्या होण्याची खरी गरज आहे. कारण यातूनच कॅन्सर बळावण्यापूर्वी निदान होऊ शकते. त्यासाठी सध्या सरकारने सुरू केलेली मोहीम व्यापक करून राज्यभर मोफत चाचणीच्या शिबिरांचे आयोजन करावे. हे करताना हजारो रुग्णांच्या उपचारासाठी समर्पित कॅन्सर रुग्णालयाची गरज आहे. गोव्याला कॅन्सरचा विळखा बसायच्या आधीच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय केले तर अनेकांचे जीव वाचतील. त्यासाठी गरज आहे ती व्यापक कॅन्सर तपासणी शिबिरांची आणि सुसज्ज सरकारी इस्पितळाची. गोव्याच्या आरोग्याच्या भविष्यासाठी या गोष्टींची अत्यावश्यकता आहे.