अजगर होऊन बसू नका

गोव्यात जेवढे जास्त अॅप येतील तेवढी टॅक्सी सेवेतील स्पर्धा वाढेल. टॅक्सी चालकांना जास्त काम मिळेल. जास्त कमविण्याची संधी मिळेल. प्रवाशांना आपल्या सोयीनुसार आणि परवडणाऱ्या दरांनुसार टॅक्सी सेवेचा लाभ घेता येईल. या अॅपची भीती वाटत असेल तर टॅक्सी चालकांनी आपले स्वतःचे अॅपही सुरू करण्याचा पर्याय आहे.

Story: संपादकीय |
03rd June, 10:36 pm
अजगर होऊन बसू नका

पर्यटनासाठी गोव्यात येणाऱ्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरकडून आणि पर्यटकांकडून गोव्याची वेगवेगळ्या कारणांमुळे बदनामी सुरू असते. गोवा हे जागतिक नकाशावरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी गोव्यात येतात. अनेक पर्यटकांची गोव्याबाबत एक नेहमी तक्रार असते, ती गोव्यातील प्रवासी टॅक्सींच्या दराबाबत. हे दर कधीच नियंत्रित झाले नाहीत. अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्यामुळे पर्यटकांकडून अनेकदा गोव्याची प्रतिमा खराब करण्याचेही प्रयत्न झाले. यातच पर्यटकांना होणारी मारहाण आणि गोवा माईल्सच्या चालकांसोबत होणारे तंटे यामुळे गोव्यातील काही टॅक्सी चालक नियम मानत नसल्याचेच चित्र आहे. 

टॅक्सी व्यवसायावर आणि टॅक्सींच्या भाडे दरांवर नियंत्रण नसल्यामुळे इतर राज्यांमधून गोव्यात येणारे पर्यटक गोव्याची बदनामी करण्याची संधी सोडत नाहीत. हा व्यवसाय चांगला चालावा, नियंत्रित व्हावा, त्याचे दर परवडणारे असावेत, सर्वसामान्य पर्यटकालाही टॅक्सीने जाणे सुलभ वाटावे यासाठी गोव्यात अॅपवर आधारित टॅक्सी सेवा असावी अशी अनेक वर्षांची मागणी आहे. यापूर्वीही ओला, उबर सारख्या अॅप टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गोव्यात सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले होते. सरकारनेही अॅपवर आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना गोव्यात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले, पण स्थानिक टॅक्सी चालकांनी केलेल्या आंदोलनांमुळे वेळोवेळी सरकारने नमते घेतले. स्पीड गव्हर्नन्स असो किंवा टॅक्सींना बसविण्यात येणारे मीटर दरवेळी टॅक्सी चालकांनी सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. निवडणुकांच्या वेळी टॅक्सी चालकांमुळे अडचण होऊ शकते असे समजून राजकीय पक्षांनीही अनेकदा समझोते केले. या सगळ्या गोष्टींमुळे गोव्यातील टॅक्सी व्यवसाय आज इतर राज्यांतील टॅक्सी व्यवसायांपेक्षा महाग समजला जातो. बदनाम मानला जातो.

 सर्वसाधारण लोकांना यातून प्रवास करणे खर्चिक वाटते. टॅक्सी व्यवसायातील छुपे डावपेच माहीत नसलेले टॅक्सी चालक अॅपला विरोध करत राहिले. दुसऱ्या बाजूने काही धनिक लोकांनी या व्यवसायात घुसखोरी करून प्रवासी टॅक्सींना पर्याय म्हणून 'रेंट अ कॅब' आणि 'रेंट अ बाईक' हे व्यवसाय सुरू केले. ते पुढे फोफावले. आज हजारोंच्या संख्येने 'रेंट अ बाईक' आणि 'रेंट अ कार' आहेत. गोव्यातील टॅक्सी व्यवसाय हळूहळू संपविण्यासाठीच या व्यवसायांना चालना दिली आणि त्यातून काही लोक गब्बर झाले. अॅपवरील टॅक्सी व्यवसाय गोव्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर 'रेंट अ बाईक', 'रेंट अ कार' यांचे व्यवसाय रसातळाला जातील तसेच टॅक्सी व्यवसायात ज्यांनी शेकडोंच्या संख्येने टॅक्सी घेऊन आपला जम बसवला आहे, त्यांचा व्यवसाय धोक्यात येईल, त्यांचे या व्यवसायातील वर्चस्व संपुष्टात येईल या भीतीने टॅक्सी अॅप चालवणाऱ्या कंपन्यांना गोव्यात येण्यापासून रोखण्याचे कारस्थान होत आहे. या विरोधासाठी एक दोन टॅक्सी पदरात असलेल्यांना पुढे काढले जात आहे. पण ही भीती म्हणजे विनाकारणच्या भीतीमुळे अजगर होऊन बसण्यासारखा प्रकार आहे. गोव्यातील सर्वच टॅक्सी चालकांनी अॅपवरील टॅक्सी व्यवसाय स्वीकारला तर प्रवासी आणि टॅक्सी चालक या सर्वांसाठीच ते चांगले आणि फायद्याचे ठरू शकते. 

सध्या गोवा सरकारने अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक मसुदा जारी केला आहे. लोकांकडून त्यासाठी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे रद्द करावीत अशी मागणी करत टॅक्सी चालक सध्या आमदारांना भेटून त्यांना धमकावत आहेत. त्यांचे अस्तित्व संपविण्याची भाषा करत आहेत. असे करताना गोव्यात गोवा माईल्स ही अॅपवर चालणारी टॅक्सी सेवा सुरू आहे, याचा विसर त्यांना पडला असावा. कारण गोव्यात अॅपवर आधारित टॅक्सी सेवा सात वर्षांपासून सुरू आहे. ती नव्याने होत आहे असे नाही. आता फक्त अन्य कोणाला अॅपवर आधारित टॅक्सी सेवा द्यायची असेल तर सरकारने त्या सर्वांना मार्ग खुला करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गोव्यात जेवढे जास्त अॅप येतील तेवढी टॅक्सी सेवेतील स्पर्धा वाढेल. टॅक्सी चालकांना जास्त काम मिळेल. जास्त कमविण्याची संधी मिळेल. प्रवाशांना आपल्या सोयीनुसार आणि परवडणाऱ्या दरांनुसार टॅक्सी सेवेचा लाभ घेता येईल. या अॅपची भीती वाटत असेल तर टॅक्सी चालकांनी आपले स्वतःचे अॅपही सुरू करण्याचा पर्याय आहे. उगाच घाबरून जाऊन चांगल्या गोष्टींना विरोध करण्यापेक्षा जे चांगले आहे ते स्वीकारण्याची मानसिकता ठेवण्याची जास्त गरज आहे.