बेगडी पत्रकारितेची दुकाने थाटून वाचकांना सत्य माहिती न देणे हे पत्रकारितेच्या कोणत्या निकषात बसते हे तरी वाचकांना कळायला हवे. कोणी थोडासा आवाज उठवला तर त्यांचे नाव काळ्या यादीत घालून संबंधित वृत्त रोखणे ही कुठली पत्रकारिता?
गोवा मराठी पत्रकार संघाच्या स्थापना दिन कार्यक्रमात पुण्याचे एक ज्येष्ठ संपादक सम्राट फडणीस यांनी ‘आजची पत्रकारिता आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर जे विचार व्यक्त केले ते खूप महत्त्वाचे आहेत. पत्रकारितेतील त्यांचा गाढा अनुभव तसेच आजच्या डिजिटल पत्रकारितेत त्यांनी जे काही शिखर गाठले आहे ते पाहता त्यांच्याकडून आजच्या पत्रकारांना खूप काही शिकण्यासारखे आहे. पणजीतील स्थापना दिन कार्यक्रमात त्यांनी मांडलेले विचार आणि केलेले मार्गदर्शन त्यामुळेच खूप महत्त्वाचे ठरावे. पत्रकारांना मार्गदर्शन करताना सम्राट फडणीस म्हणाले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात एकदा आपल्यामागे संपादक वा आजच्या जमान्यातील काही वेगळी पदे लागली की आपल्याकडे जगाला शिकवायची जबाबदारी आल्याच्या भ्रमात आपण वावरतो आणि ते अगदी खरेही आहे. आपण काही शिकायचे नाही आणि वेगळ्याच जगात वावरायचे, हे प्रकार आम्हाला आपल्या गोव्यातही सर्रास आढळून येतात. आता अर्थातच सम्राट फडणीस यांनी हे स्पष्टपणे सांगितले नाही की पत्रकारांकडे तो मग साधा प्रतिनिधी असो वा संपादक ज्याच्याकडे अहंकार मुळीच नसावा आणि या क्षेत्रात तरी अहंकाराला मुळीच स्थान नाही. सम्राट फडणीस यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याची गरज तर होतीच, पण त्याचबरोबर पत्रकारांनी अहंकारी बनून वागू नये, कृती करू नये हे सांगण्याचीही गरज होती, असे त्यांचे विचार ऐकताना त्यावेळेस मनाला वाटून गेले.
पत्रकारितेबरोबर अन्य काही क्षेत्रातही अहंकारी व्यक्ती आम्हाला नियमित भेटतात. पत्रकारिता म्हटली आणि एखादे वरिष्ठ पद या क्षेत्रात आपल्याच मित्रांची शिडी करून मिळवलेले असले तर त्याला काही अंत नसतो आणि अशी उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर अनेक दिसतात.
मानसशास्त्राचा अभ्यास करणारे असे सांगतात की एका मर्यादेपर्यंत अहंकार हा आत्मविश्वासाची पातळी किंवा दृढता दर्शवतो. त्यापलीकडे तो घमेंड म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याविषयी गैरसमजात्मक अहंकार या अवस्थेला पोचतो. स्वतःच्या कुवतीची, पात्रतेची आणि स्वतःच्या मर्यादांची यथार्थ आणि योग्य जाणीव असणे अगदी योग्य आणि आत्मविश्वास वाढवणारे असले तरी नसलेल्या गुणांविषयी फुकाची पोकळ प्रौढी किंवा घमेंड चारचौघात आपले हसे होण्यास कारण ठरते. कारण अनेक बाबतीत तुमच्यापेक्षा सरस असणारे संबंधित क्षेत्रात वावरत असतात, त्यामुळे त्यांनी आव्हान दिल्यास तुमचे पितळ उघडे पडते व जाहीर फजितीही होते. आता सम्राट फडणीस यांनी सरळ सरळ याच शब्दात काही सांगितले नसले तरी आजच्या विकसित डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांना कसे सांभाळून आणि दक्षतापूर्वक काम करायचे आहे, हाच मंत्र दिला. आता अहंकारी पत्रकारांना त्यातून नेमके काय घ्यायचे आहे तो त्यांचा प्रश्न असला तरी सबंधितांना इशारा काफी है, असेही सम्राट फडणीस यांचे विचार ऐकल्यावर कोणालाही वाटावे. अहंकार एखाद्यामध्ये जरूर असावा, पण तो मर्यादित असावा. अहम् चे मीठ योग्य प्रमाणात असेल तर जीवनरूपी जेवण चवदार व्हायला मदत होते पण अहम् च्या मीठाचा अतिरेक झाला तर त्याचे काय होऊ शकते, हे यावेळी सम्राट फडणीस यांनी सांगितले असते तर कदाचित अनेकांचे डोळे उघडण्यास मदतच झाली असती.
वर्तमानपत्रे ही समाजाची आरसा असतात असे खूप म्हटले जात असले तरी आजच्या जमान्यात हा आरसा खरोखरच राहिला आहे काय, याचा विचार करावा लागतो. या आरशाला तडे गेलेले अगदी स्पष्टच दिसतात आणि त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास गोव्याच्या पलीकडेही जाण्याची गरज नाही. आपण करू तीच पत्रकारिता असा गैरसमज काही अहंकारी संपादकांनी करून घेतला आहे आणि अशी पत्रकारिता ही कोणी समाजाच्या भल्याची म्हणत असतील तर म्हणोत बापडे. पत्रकारितेतील आव्हानांवर सम्राट फडणीस तपशीलवार अगदी विस्तृत बोलले, पण अशा अहंकारी पत्रकारितेवरही ते काही शब्द बोलले असते तर बरे झाले असते. आता केवळ गोव्यात हे घडते असे मी म्हणणार नाही, पण अहंकाराच्या रूपातील राक्षसही ठेचण्याची आज गरज आहे. अहंकार अखेर विनाशाकडे मार्गक्रमण करतो हे बरोबर असले तरी तोपर्यंत त्यामुळे झालेली हानी भरून निघणारी नसते. सम्राट फडणीस यांनी आजच्या पत्रकारितेबद्दल केलेले विवेचन त्यामुळे खूपच अर्थपूर्ण ठरते. जगात कुठेही पत्रकारिता निष्पक्षपाती नसल्याचे सम्राट फडणीस जे सांगतात, ते अगदी बरोबर आहे आणि त्यावर कुणाचे दुमतही नसावे. पण आता पक्षपाती आणि निष्पक्षपाती यामधील एका नवीनच अशी 'हम करेसो' पत्रकारिता अनेक ठिकाणी दिसून येते. अशा पत्रकारितेला अभय द्यायचे की नाही, याचाही विचार करावा लागेल.
बेगडी पत्रकारितेची दुकाने थाटून वाचकांना सत्य माहिती न देणे हे पत्रकारितेच्या कोणत्या निकषात बसते, हे तरी वाचकांना कळायला हवे. कोणी थोडासा आवाज उठवला तर त्यांचे नाव काळ्या यादीत घालून संपादकीय वर्गाला दमदाट्या देत संबंधित वृत्त रोखणे ही कुठली पत्रकारिता? आजची पत्रकारिता बदलत चाललीय ती अशी आणि तिला कोणताही धरबंध नाही. बदललेल्या या काळात पत्रकार किंवा मीडिया म्हणून आपण किती शिकलो, असा प्रश्न पडतो असे फडणीस सांगतात. पत्रकार वा संपादक झाल्यावर आपण आता काय शिकायचे असे त्यांना वाटते, हेही बरोबर आहे आणि अशा मनोवृत्तीतूनच काही वेळा अहंकारी संपादक जन्मास येतो. निकोप पत्रकारितेसाठी अशा गोष्टी खरे म्हणजे वर्ज्य आहेत, पण शेवटी लक्षात कोण घेतो. मालकांनी महसुलाचे जे काही लक्ष्य ठरवून दिलेले असते ते या ना त्या मार्गाने पूर्ण केल्यानंतर तुम्ही कराल ती पत्रकारिता, अशी पत्रकारितेची सहज सोपी व्याख्या झाली आहे. मग अपेक्षा कोणाकडून कराव्यात. सम्राट फडणीस यांनी आपल्या भाषणात अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या की युवा पत्रकारांनी अंतर्मुख होऊन त्यावर विचार केल्यास पत्रकार म्हणून त्यांचा पुढील मार्ग बराच सोपा आणि यशस्वी होण्यास बरीच मदत होईल. अहंकारी पत्रकारितेचा आदर्श मात्र कोणीही आपल्यासमोर ठेवू नये, हाच संदेश त्यातून मिळेल. पत्रकारितेचाही एक धर्म असतो पण त्यापासून खूप दूर दूर जात आहोत आणि हे चित्र बदलेल, तोच सुदिन असेल.