उतावीळ पर्यटकांना नियंत्रणात आणण्यासाठी फक्त बंदी घालून चालणार नाही तर बंदी झुगारून नदी, धबधब्यांच्या पाण्यात उतरणाऱ्यांवर कठोर कारवाईही करायला हवी. कारवाई सुरू होईल त्यावेळीच दुर्घटना नियंत्रणात येतील.
गोव्यात मे महिन्यातच पंचवीस इंचांचा टप्पा गाठून पावसाने इतिहास रचला आहे. नद्या, नाल्यांचे स्वरूप बदलले. जूनच्या एका महिन्यात जेवढा पाऊस पडायचा, तो मे महिन्याच्या गेल्या दहा दिवसांत पडला आहे. मान्सूनचेही आगमन झाले. सध्या गोव्यात पावसाची विश्रांती असली तरी अधिकृतपणे मान्सून हजेरी लावून पुढे सरकला. त्यामुळे पाऊस सक्रिय झाला, असे म्हणायला हरकत नाही. पावसाळा मे महिन्यातच सुरू झाल्यामुळे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनीही तळ्या, धबधबे, नद्या, खाणींच्या खंदकांमध्ये पोहण्यास, आंघोळीसाठी उतरण्यावर बंदी लागू केली होती. गेली काही वर्षे धबधब्यांवर जाणारे पर्यटक बुडू लागल्यामुळे सरकार सतर्क होऊन पावसात अशा ठिकाणी उतरू नये, यासाठी निर्बंध लागू करते. यावेळीही असे निर्बंध लागू झाले होते. नियम मोडणाऱ्यांवर भारतीय न्याय दंड संहितेप्रमाणे कारवाई होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशात म्हटले होते. असे असतानाही अनेक पर्यटक तळ्या, नद्या, खंदकांमध्ये आंघोळीसाठी उतरून जीव धोक्यात घालतात. उसगाव - गांजे येथे म्हादई नदीत बुडून दोघांनी आपला जीव गमावला. अन्य दोघांना अग्निशमन दलाने वाचवले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी संबंधित काहीजण गांजे येथे म्हादई नदीवर गेले असता, ही दुर्घटना घडली. जलक्रीडा प्रकार सुरू असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी अशा गोष्टींसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उभा राहतो. पाण्यात उतरले असता पाण्याचा प्रवाह वाढला, असे इतरांनी पोलिसांना सांगितले. पावसाचे दिवस असताना नदीत उतरण्याची चूक या लोकांनी केली. म्हादईच्या पात्रात वरील भागात पाऊस सुरू झाल्यामुळे नदीचा प्रवाह वाढल्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीत जलक्रीडा करण्यासाठी उतरणे हेच चुकीचे होते.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात बुडण्याच्या घटना तसेच पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे अडकून पडण्याच्या घटना घडल्यामुळेच सावधगिरीचे उपाय म्हणून यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी लागू केली होती. बंदी झुगारून नदीच्या पात्रात उतरण्याची चूक रविवारी काही लोकांनी केल्यामुळे या वर्षीही ही दुर्घटना घडली. अशा लोकांवर नियंत्रण आणणे अशक्य असल्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांना रोखणे हे एक आव्हानच बनले आहे.
गोव्यात समुद्र वगळता तळी, खाणींचे पाण्याने भरलेले खंदक, धबधबे आणि नद्यांमध्ये बुडून मृत्यू येणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. २०१७ पासून अशा अनेक घटना गोव्यात घडल्या आहेत. यात फक्त पर्यटनासाठी गेलेले नागरिक नव्हेत तर गोव्यात अनेक मुलांचाही घराजवळील नाले, तळ्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२३ मध्ये सांगेतील मैनापी धबधब्यावर बुडून दोघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर वन खात्याने अभयारण्य आणि वनक्षेत्रातील धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली होती. पावसाळ्यात किंवा इतर वेळी नदी, धबधब्यांवर जाण्यास बंदी घालतानाच त्या परिसरातील काही स्वयंसेवक तेथे नियुक्त करण्याचीही गरज आहे. गावातील धबधब्यांवर, धोकादायक ठिकाणी जाण्यापासून पर्यटकांना रोखण्यासाठी वन खात्याचे कर्मचारी तसेच संबंधित गावांतील स्वयंसेवक नियुक्त केल्यास पर्यटकांना रोखणे शक्य आहे. पावसात सहलीसाठी जाणाऱ्यांकडून मद्यप्राशन करण्यासह धबधब्यांवर दंगामस्ती करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा प्रकारांना रोखण्यासाठी शनिवारी, रविवारी काही ठिकाणी पोलीस, वन खात्याचे कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे. बंदी घालता येत नसेल तर काही प्रसिद्ध धबधब्यांवर लाईफगार्ड नियुक्त करण्याचीही गरज आहे. कुठलेच सुरक्षात्मक उपाय नसताना अनेक पर्यटक आंघोळीसाठी उतरून जीव गमावून बसतात. अनेक घटनांमध्ये एकाला वाचवताना दुसऱ्याने जीव गमावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. समुद्र किनाऱ्यांवर लाईफगार्ड असतात. धबधबे, तळ्या, नद्यांवर लाईफगार्ड नसतात. अनेकदा वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून गेलेले पर्यटक बुडण्याच्याही घटना घडल्या आहेत. आपल्या सुरक्षेसाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी उतावीळपणा करण्याचे सोडले तर आपला आणि इतरांचाही जीव वाचेल. अशा उतावीळ पर्यटकांना नियंत्रणात आणण्यासाठी फक्त बंदी घालून चालणार नाही तर बंदी झुगारून नदी, धबधब्यांच्या पाण्यात उतरणाऱ्यांवर कठोर कारवाईही करायला हवी. कारवाई सुरू होईल त्यावेळीच दुर्घटना नियंत्रणात येतील.