हे अर्जुना, हा सगळा यज्ञ म्हणजेही सगळा मीच आहे! त्याचा यजमान मीच, पुरोहित मीच, श्रौतकर्म मीच, स्मार्तकर्म मीच, ओदन मीच, घृत मीच, समिधा मीच, मंत्र मीच, अग्नी मीच आणि हवनक्रियाही मीच!
नवव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकाचे विस्तृत विवेचन सुरू आहे. अधिभौतिक जीवनाचे लाभ देणाऱ्या यज्ञांच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मसुख प्राप्तीच्या ज्ञान-यज्ञाबद्दल माहिती देत आहेत.
"सुख आणि दु:ख या द्वंद्वांना सम पातळीवर आणणारी अशी मनाची जी जाण असते ती या ज्ञान-यज्ञाची शोभिवंत वेदिका म्हणजे 'स्थंडिल' समज" - या त्यांच्या सूचनेपर्यंत आपण मागील लेखांत आलो होतो. आता त्यापुढील विवेचन पाहूया.
सत्-असत्, आत्म-अनात्म यांची सूक्ष्म फोड करू शकणारी जी बुद्धी असते तिला 'विवेकबुद्धी' म्हणतात. ही विवेकबुद्धी त्या ज्ञान-यज्ञांत मंत्र-विद्येच्या थोरवीची जागा घेते! म्हणजे काय? तर मंत्र-विद्या काय करते? अधिभौतिक यज्ञांत तिची भूमिका काय असते? ध्वनी-शास्त्रानुसार मंत्रांतल्या अक्षरांचा व पर्यायाने शब्दांचा व्यवस्थित उच्चार करून निसर्ग-शक्तीला यज्ञमंडपांत आकृष्ट करून प्रकट व्हायला लावणे. म्हणजे मंत्रोच्चाराने यज्ञाग्नी प्रज्ज्वलित करणे. हेच काम ज्ञान-यज्ञात विवेकबुद्धी करते.
या ज्ञान-यज्ञात मनाची निश्चल शांती ही स्त्रुक आणि स्त्रुव या दोन मोठ्या लाकडी पळ्यांचे घृतोदन हवन करण्याचे काम करते. या ज्ञानयज्ञाचा यजमान आपला जीव असतो. तो यज्ञात आत्म-प्रचीतीचे पात्र हाती घेऊन विवेकाचा महामंत्र जपतो.
अशा या मनबुद्धीरूप, ज्ञानरूप अग्निहोत्रात जो धगधगीत ज्ञान-वह्नी पेटतो तो जीवामधला द्वैताद्वैत भेद नाहीसा करून टाकतो. भाषा लोपते. अज्ञानरुपी तूपही संपते. ज्ञानरुपी यज्ञफल जीवाला प्राप्त होते. तेव्हा यजमान जीव त्या आत्मसमरसाने त्या यज्ञातील शेवटचे म्हणजे अवभृथ स्नान करतो. तेव्हा पंचमहाभूते, शब्दादी विषय, हे सर्वजण आपण भिन्न नसून अभिन्न आहोत आणि अशारीतीने ब्रह्मतादात्म्यता पावून एकरूप झालेले असल्याच्या स्थितीला प्राप्त होतात.
ज्याप्रमाणे एखादा कोणीतरी झोपेतून जागा झाल्यावर म्हणतो ना की, "काय वेगळेच स्वप्न पडले होते हो मला! काय ती विचित्र सेना! आणि गंमत म्हणजे मीच स्वतः ते एवढे मोठे सैन्य झालो होतो! प्रत्यक्षात ती सेना नव्हतीच! मीच एकटा होतो तिथे उभा!", त्याचप्रमाणे त्या याज्ञिक जीवाला त्या ज्ञान-यज्ञाचा तो ज्ञान-वह्निस्वरूप प्रसाद मिळाल्यानंतर संपूर्ण विश्व एकरूपपणे प्रत्ययास येते. मग त्याच्यातला जीव-भाव संपून तो पूर्णतया आकंठ परमात्म-बोधाने भरून जातो!
अशारीतीनं, अर्जुना, सर्वांभूती मी एकच आहे अशी ठाम श्रद्धा ठेवून बरेच लोक मला ज्ञानयज्ञाने भजतात. या जगात अनंत काळापासून जरी अनेक नाम-रूपांनी लोक मला ओळखत व भजत असले तरी माझे ते अनेकपण सुद्धा माझ्या एकरूपत्वाबाबतीत असलेले त्यांचे निश्चितस्वरुपी ज्ञान भेदू शकत नाही! देहाची गात्रे जरी वेगळाली, भिन्न भिन्न असली, तरी तो देह हा अखंड एकच असतो व त्यात एकच जीव असतो. जसे किरण असंख्य अनेक असले तरी सूर्य एकच असतो. लहान मोठ्या फांद्या अनेक असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात. त्याचप्रमाणे लोक कितीही वेगवेगळे व वेगवेगळ्या प्रकारचे व वृत्तीचे असले तरी ते सगळे माझेच एकाचे अंश असतात!
अशारीतीने माझे वेगवेगळे भाग व वेगवेगळी रूपे स्वीकारून देखील जे खरे जाणते, जाणकार असतात त्यांच्या एकत्वाच्या ज्ञानाला भेद जात नाही.
जसे जिथे जिथे बुडबुडा असेल तिथे तिथे पाणी असलेच पाहिजे. ते (बुडबुडे) तसेच राहिले किंवा विरले तरीही तिथे पाणी हे असलेच पाहिजे. वाऱ्याने मातीचे कण कितीही जरी उडवले, तरी त्या मातीच्या कणांचे पृथ्वीपण काय नाहीसे होते काय? आणि ते उडवलेले कण खाली आले की त्यांना झेलणारी पृथ्वीच असते ना? तसे अर्जुना, हे सगळे वस्तुजात कुठेही असो, कुठल्याही स्थितीत असो, वा नसो, तरी सुद्धा ते सगळे म्हणजे मीच अशी त्यांची (म्हणजे ज्ञानी लोकांची) प्रचीती असते. माझ्या एकूण एक सर्व व्याप्तीचा त्यांना अनुभव असतो. असे ते माझेच रूप असून अनेक रूपांचे होऊन अनेक आकारांमध्ये वावरतात. जसे सूर्यबिंब सगळ्यांना सगळ्या वेळी सगळीकडे समोरच दिसते, सगळीकडे व्यापून असलेल्या त्या ज्ञान्यांचे ते ज्ञानही सर्वथा सन्मुख म्हणजे निश्चल असते. जसे आकाशातील सर्वव्यापक वायूला पाठ पोट नसते तसे यांच्या ज्ञानालाही ते नसते! जेवढी माझी परिपूर्णता आहे, त्यांचा सद्भावही तेवढा परिपूर्ण आहे! म्हणून साहजिकच न करताही त्यांच्याकडून माझे भजन वा भक्ती होते! पण ज्यांना कोणाला या माझ्या परिपूर्ण सर्वव्यापकतेची जाण नाही त्यांच्याकडून माझी भक्ती खऱ्या अर्थाने घडू शकत नाही!
वर कथित केल्याप्रमाणे उचित स्वरूपात ज्ञान-यज्ञ करून जे माझी भक्ती करतात त्या सगळ्यांकडून सगळे काही मला सर्वेश्वरालाच अर्पण होते! आणि तेही नित्य निरंतर व सहजच होते! पण मतिमंदत्वाने ज्यांना यातले काहीही ठाऊक नसते, त्यांना त्या कारणनिमित्ते माझी प्राप्ती होत नाही!
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रो s हमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ।।१६।।
सरळ अर्थ : क्रतु अर्थात् श्रौतकर्म मी आहे. यज्ञ अर्थात् पंचमहायज्ञादी स्मार्तकर्म मी आहे. स्वधा म्हणजे पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे. औषधी म्हणजे सर्व वनस्पति मी आहे. मंत्र मी आहे. घृत मी आहे. अग्नी मी आहे आणि हवनरूप क्रियाही मीच आहे.
विस्तृत विवेचन : या श्लोकात भगवंतांनी स्व-स्वरुपाची व्याप्ती किती खोलवर गेल्याचे सांगिले आहे ते बघण्यासारखे आहे! ते म्हणतात की हे अर्जुना, हा सगळा यज्ञ म्हणजेही सगळा मीच आहे! त्याचा यजमान मीच, पुरोहित मीच, श्रौतकर्म मीच, स्मार्तकर्म मीच, ओदन मीच, घृत मीच, वनस्पती म्हणजे समिधा मीच, मंत्र मीच, अग्नी मीच आणि हवनक्रियाही मीच!
ईशावास्य उपनिषदातील पहिला श्लोकार्ध अगदी याच अर्थाचा आहे.
"ईशावास्यमिदं सर्वं यात्किंच जगत्यां जगत्!"
(क्रमशः)
मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३