उद्यापासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात, कोंडी वाढण्याची शक्यता
वाळपईः वाळपई वाहतुकीची समस्या सोडवण्यात अद्याप प्रशासनाला यश आले नसून स्थानिकांना नित्यनियमाने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा आराखडा जोपर्यंत अधिसूचित होत नाही, तोपर्यंत बेशिस्त वाहन पार्किंग व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे उद्या ४ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षांला सुरूवात होत असून वाहतुकीची कोंडीची समस्या तीव्रतेने जाणवणार असल्याचे स्थानिकांनी म्हणणे आहे.
वाहनाच्या संख्येमध्ये दुप्पटीने वाढ
सत्तरी तालुक्याची वाळपई ही प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले सरकारी कार्यालय, बाजारपेठ, खाजगी आस्थापने अशा विविध कारणास्तव ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात वाळपई शहरांमध्ये येत असतात. यामुळे गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत वाळपई शहरांमधील वाहनांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे.
सकाळ, दुपारच्या सत्रात वाहतुकीची कोंडीचे प्रमाण जास्त
खास करून सकाळी व दुपारच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत असते. वाळपई अवर लेडी ऑफ लूड्स हायस्कूल, सरकारी माध्यमिक विद्यालय वाळपई, सरकारी प्राथमिक विद्यालय या ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे.
पोलिसांनी कारवाई केल्यास प्रश्न मार्गी लागणार
नगरपालिकेने अनेकवेळा या संदर्भाच्या बैठका घेतल्या. बैठकीतून अनेक वेळा पोलिसांनी वाहतूक खात्याने व वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली. नगरपालिकेने या संदर्भात पूर्णपणे सहकार्य केले आहे. मात्र कारवाई करण्याचा भाग हा पोलिसांचा असतो. त्यांनी तो करणे गरजेचे आहे. पोलिसांनी कारवाई केल्यास कोंडी सुटून वाहतूक सुरळीत होऊ शकते, असे मत नगराध्यक्ष प्रसन्ना गावस यांनी व्यक्त केले आहे.