राष्ट्रविरोधी मानसिकतेचे भेसूर चेहरे

राहुल गांधींनी सैन्यदलाच्या कामगिरीबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी भारतीय लष्कराचे किती नुकसान झाले, हा प्रश्न विचारून विरोधाची मानसिकता किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचे पुरावेच सादर केले.

Story: विचारचक्र |
30th May, 02:32 am
राष्ट्रविरोधी मानसिकतेचे भेसूर चेहरे

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेने पाकिस्तानला जबर धक्का दिला. या कारवाईमुळे जागतिक पातळीवर भारताचा आत्मविश्वास उंचावला. मात्र, काँग्रेसने या विजयावर संशय घेत राजकारण केले. राहुल गांधी व विजय वडेट्टीवार यांची वक्तव्ये लष्कराविरोधी ठरली. इतिहासात इंदिरा गांधींना विरोध असूनही विरोधकांनी पाठिंबा दिला होता, हे विसरून आजचा विरोध निष्कृष्ट पातळीवर गेला असल्याचे नमूद केले आहे.

पहलगाम येथील हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादाला पोसणाऱ्या शक्तींनी घडवून आणला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी सैन्यदलाच्या पातळीवर तसेच राजनैतिक पातळीवरही कठोर उत्तर देणे अत्यंत गरजेचे होते. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी गुडघे टेकावे लागले. त्याचबरोबर सिंधू जल कराराला स्थगिती देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंतीही करावी लागली. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी तसेच संरक्षणविषयक तज्ज्ञांनी भारताच्या सैन्यदलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या नुकसानीची विस्ताराने माहिती दिली आहे. पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा भेदत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या सहा हवाई तळांचे मोठे नुकसान केले. आपले नुकसान झाकण्यासाठी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे खोटे दावे केले. हे चुकीचे दावे पाकिस्तानच्या जनतेलाही फसवू शकले नाहीत.

भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे कसे नुकसान झाले याचे खणखणीत पुरावे पत्रकार परिषदांमधून दिले. भारतीय सैन्यदलाच्या बिनतोड पुराव्यांचा पाकिस्तानला प्रतिवाद करता आला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या कामगिरीला अभिवादन करण्यासाठी देशात उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रा निघाल्या. भारतीय सैन्यदलाच्या अभूतपूर्व कामगिरीचा गौरव होत असताना दुसरीकडे या विषयातही क्षूद्र राजकारण आणण्याचे प्रयत्न काँग्रेससारख्या प्रमुख विरोधी पक्षाने केले. लोकसभेतील विरोधी पक्ष निभावणाऱ्या राहुल गांधी यांनी पाकिस्तानातील सत्ताधारी पक्षाला शोभेल अशा प्रकारचे वक्तव्य केले. “ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची किती विमाने पडली?” असा सवाल त्यांनी जाहीरपणे विचारत भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीवर शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदांमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे कसे नुकसान झाले, याच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा प्रसारित करण्यात आल्या होत्या. पाकिस्तान लष्कराने भारताचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. याचे पुरावे एका पत्रकाराने मागताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी, “भारतीय विमान आम्ही पाडल्याचे अनेक पुरावे समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत,” असे उत्तर देत आपल्या अकलेचे किती दिवाळे निघाले आहे, याचे दर्शन घडविले.

पाकिस्तानातील किती दहशतवादी तळ नष्ट झाले, पाकिस्तानच्या किती हवाई तळांचे नुकसान झाले ही माहिती जाणून घेण्यापेक्षा राहुल गांधी यांना भारताच्या सैन्यदलाचे किती नुकसान झाले याची माहिती विचारण्यातच का रस असावा, याचे उत्तर खुद्द राहुल गांधी देऊ शकतील. असा प्रश्न विचारून राहुल गांधींनी सैन्यदलाच्या कामगिरीबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी भारतीय लष्कराचे किती नुकसान झाले, यासारखे प्रश्न विचारून राजकारणातील विरोधाची मानसिकता किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचे पुरावेच सादर केले.

अशा पद्धतीचे प्रश्न सैन्यदलाच्या प्रमुखाला वैयक्तिकरीत्या भेटूनही विचारता येऊ शकतात. पण तेवढी परिपक्वता आणि राजकारणातील विशाल दृष्टिकोन याचा अभाव आपल्याकडे आहे, हे वारंवार दाखवून देण्याची हौस राहुल गांधींना आहे, त्याला आपण तरी काय करणार?

१९७१ मध्ये बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात बांगलादेश मुक्ती वाहिनीला भारताने का पाठिंबा दिला, याची माहिती अन्य देशांना कळावी यासाठी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतातील विविध पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यावेळच्या जनसंघाचे लोकसभेतील गटनेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे सोपविले होते. १९७१ च्या युद्धावेळी जनसंघासह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला नि:संदिग्ध पाठिंबा दिला होता. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणारी वक्तव्ये केली होती. जनसंघ, स्वतंत्र पक्ष यांनी आपली काँग्रेसविरोधाची भूमिका बाजूला ठेवत इंदिरा गांधी सरकारच्या पाठीशी एकमुखाने उभे राहण्याचा निर्णय घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभेतील भाषणात अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत इंदिरा गांधी सरकारच्या पाठीशी जनसंघ खंबीरपणे उभा आहे, याची ग्वाही संपूर्ण देशाला दिली.

देशावरील दहशतवादाच्या संकटाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्ष सरकारच्या मागे उभे आहेत, हे जगाला कळावे यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविणाऱ्या राहुल गांधींनी राजकारण बाजूला ठेवत सरकार आणि लष्कराला पाठिंबा देणारी वक्तव्ये करणे अपेक्षित होते. ही किमान अपेक्षाही राहुल गांधींना पूर्ण करता आली नाही.

आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता अशी विधाने करतो आहे, हे पाहून विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या वाचाळवीरांनाही चेव आला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना सादर केलेले छायाचित्रांचे पुरावे खोटे आहेत, अशी मुक्ताफळे वडेट्टीवारांनी दिवसाढवळ्या उधळली. या वक्तव्याबद्दल वडेट्टीवार यांच्यावर समाजमाध्यमांमधून जोरदार टीका झाली. तरीही वडेट्टीवारांनी सैन्यदलाची माफी मागितली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेतृत्वानेही वडेट्टीवार यांना अशा वक्तव्याबद्दल खुलासा विचारला नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला आपल्या प्रादेशिक नेतृत्वाकडून अशाच वक्तव्याची अपेक्षा असावी.

केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत अन्य देशांना माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यावरूनही काँग्रेसने कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले. मोदी सरकारला विरोध करताना आपण थेट राष्ट्रविरोधी भूमिकेत शिरतो आहोत, याचे भानही काँग्रेस नेतृत्वाला राहिलेले नाही.


केशव उपाध्ये
(लेखक भाजपचे महाराष्ट्रातील प्रवक्ते आहेत.)