३ मे २०२३ पासून कुकी-मैतेई यांच्यातील हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरला लवकरच नवीन सरकार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे भाजपचे एन. बिरेन सिंह यांना राजीनामा द्यावा लागला होता. फेब्रुवारी २०२५ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. बुधवारी राज्यातील भाजपच्या आठ आमदारांसह एकूण दहा आमदारांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे लवकरच पुन्हा सरकार स्थापन होण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्यपालांची भेट घेतलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळातील एका आमदाराने सांगितले की, नवीन सरकारच्या रचनेवर आमची सविस्तर चर्चा झाली. १५ जूनपर्यंत राज्यात नवे सरकार स्थापन होण्याची अपेक्षा आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन विचारविनिमय करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला गती आली आहे.
राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी ३१ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. राज्यात १३ फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी रोजी भाजप सरकारचे नेतृत्व करणारे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता. राज्यात दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्यामुळे बिरेन सिंग यांना दबावापोटी पायउतार व्हावे लागले होते. ३ मे २०२३ पासून राज्यात कुकी-मैतेई दरम्यान हिंसाचार सुरू आहे. या दोन वर्षांत ३०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. १५०० हून अधिक जण जखमी झाले. ७० हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले. ६ हजारांहून अधिक गुन्हे विविध पोलीस स्थानकांत नोंदवण्यात आले आहेत.
एकूण ६० आमदारांच्या विधानसभेत सध्या ५९ आमदार आहेत. एका आमदाराचे निधन झाल्यामुळे एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआमध्ये एकूण ४४ आमदार आहेत. पैकी ३२ मेईतेई, तीन मणिपुरी मुस्लिम आणि ९ नागा आमदार आहेत. काँग्रेसचे पाचही आमदार मैतेई आहेत. उर्वरित १० आमदार कुकी आहेत. यापैकी सात आमदार २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. दोघे कुकी पीपल्स अलायन्सचे आहेत आणि एक अपक्ष आहे.
राज्यात नव्याने घडत असलेल्या राजकीय घडामोडीने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. नवे सरकार केव्हा स्थापन होते आणि ते कोणाच्या नेतृत्वाखाली बनते, याबाबत जनतेत औत्सुक्य आहे.
- प्रदीप जोशी