पिंपरी चिंचवड, अहिल्यानगरमध्ये सुकाणू समिती स्थापन
पणजीः सासरच्यांकडून हुंडा, पैशांची मागणी, शारिरीक, मानसिक छळ या कारणाने पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) या विवाहितेने केलेल्या आत्महत्येमुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हुंडा हा विषय सर्वत्र पुन्हा चर्चेत आलाय. लग्न समारंभाबाबत समाजात निरनिराळ्या प्रकारे जनजागृती होत असताना आता मराठा समाजातील लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे.
मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता तयार केली आहे. त्यामध्ये हुंडा घेऊ नका व देऊ नका, याबरोबरच लग्नात डीजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ११ जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
ह.भ.प बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची बैठक अहिल्यानगरमध्ये एन. बी. धुमाळ फाउंडेशनने आयोजित केली होती. या वेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष राज्यश्री शितोळे, किशोर मरकड, मराठा वधू-वर सूचक मंडळाचे अशोक कुटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, विठ्ठल गुंजाळ, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. विवाह सोहळ्याच्या आचारसंहितेबाबत जनजागृती करण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकार यांनी पुढाकार घ्यावा असाही सूर या बैठकीदरम्यान उमटला.
आचारसंहिता पुढीलप्रमाणे
• मराठा समाजाने विवाह सोहळा १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा.
• केवळ पारंपरिक वाद्य व लोककलावंतांचा वापर करावा.
• प्री-वेडिंग हा प्रकार बंद करावा.
• विवाह, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात साड्या, भेटवस्तू देऊ नयेत.
• लग्नात हुंडा देऊ व घेऊ नये.
• लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावे.
• दशक्रिया विधी व तेराव्याच्या निमित्ताने घातली जाणारी भोजनावळ बंद करावी, असे आणि अन्य काही नियम तयार करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातही बांधव एकवटले
पिंपरी चिंचवड शहरातही दोन दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हुंडा बंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून, मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच लग्नाचा अवाढव्य खर्च टाळणं, हुंडा न देणं, हुंडा घेणाऱ्यावर बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड येथे झालेल्या सभेत मराठा समाज समन्वयक रेखा कोंढे म्हणाल्या की, वैष्णवीच्या प्रकरणानंतर ही वेळ मराठा मुलींवर येऊ नये याची काळजी आणि नियोजनबद्ध समाजाप्रती आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. यामध्ये लग्नाच्या खर्चाच्या चढाओढीत मुलीचा बाप हा वर्षानुवर्षे कर्जात बुडला जातो. त्याहूनही आत्महत्यासारखे प्रकार सर्रास चालू आहेत, म्हणून लग्नाचा अनावश्यक खर्च हा मुलीच्या नावे एफडी स्वरूपात साठवून ठेवला तर भविष्यात त्या दाम्पत्याचे आर्थिक नियोजन बिघडणार नाही.