अपघात टाळण्यासाठी वनखात्याचा निर्णय
वाळपई : सुरुवातीच्या पावसामुळे सत्तरी तालुक्यातील डोंगराळ भागातील धबधब्यांमध्ये पाणी वाहायला लागले असून, काही ठिकाणी दरडी व दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन खात्याने पुढील आदेश येईपर्यंत धबधब्यांवर जाण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.
वन विभागाच्या सूचनेनुसार, धबधब्यांवर प्रवेश व आंघोळीवर बंदी असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. शेळपे, करंझोळ, कुमठोळ, चरावणे, हिवरे, सालेली यांसारख्या लोकप्रिय धबधब्यांवर शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. गेल्या आठवड्यापासून सत्तरी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धबधब्यांच्या प्रवाहात अचानक वाढ होण्याची शक्यता असून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड-धोंडे खाली येण्याचा धोका वनखात्याने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी धबधब्यांवर जाणे टाळावे, अशी विनंती वन खात्याने केली आहे. वन कर्मचाऱ्यांची पथके विशेषतः शनिवार-रविवार या काळात धबधब्यांवर नजर ठेवणार आहेत. कुणी नियम नियमांची पायमल्ली केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.