गुवाहाटी : ईशान्य भारतात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाला आहे. भारत हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.
शनिवारी १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात अरुणाचल प्रदेशातील ९, आसाममधील ५ आणि मिझोरममधील ४ जणांचा समावेश आहे. शुक्रवारी मेघालयात ३, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला. दरम्यान अरुणाचल प्रदेशात एक मोठी दुर्घटना घडली, येथे एक प्रवासी वाहन दरड कोसळून दरीत पडल्याने दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. यात चार मुले आणि दोन गरोदर महिलांचा समावेश आहे. दुसरे वाहन थोडक्यात बचावले.
तसेच, लोअर सुबानसिरी जिल्ह्यात दोन मजुरांचा दरड कोसळून मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातही हानीची नोंद झाली आहे. मिझोरममधील चांपाई जिल्ह्यात एका कुटुंबातील पाच जण पूरात वाहून गेले. त्यातील दोन जणांना वाचवण्यात आले तर तिघांचा मृत्यू झाला. पीडित म्यानमारमधील निर्वासित होते. सर्चीप आणि लॉंगतलाई जिल्ह्यांतही दरडी कोसळून जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले.
आसामच्या गुवाहाटी शहरात तीन ठिकाणी दरडी कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते नदीसारखे वाहू लागले असून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुवाहाटी आणि सिलचरमध्ये शहरी पूर आला असून १०,१५० लोक बाधित झाले आहेत. कामरूप आणि कछार जिल्ह्यांतील पाच विभागांत दोन मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
तर, मिझोरममध्ये गुरुवारपासून शाळा बंद असून गुवाहाटीतही शनिवारी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.मणिपूरमध्ये तामेंगलोंग, उख्रूल, नोनी आणि फेर्जावाल या डोंगराळ जिल्ह्यांत दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. नंबूल, इरिल आणि नांबोल नद्यांचे पाणीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.