पणजी / नागरोटा बागवान (हिमाचल)
नागरोटा बागवान (हिमाचल) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय (ज्युनियर) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या संघाने इतिहास घडवत मुलगे आणि मुली दोन्ही गटांत विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट जिंकला. या कामगिरीमुळे गोव्याच्या खेळाडूंच्या जिद्द व कौशल्याला देशभरातून दाद मिळत आहे.
हिमाचल प्रदेश टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हिमाचल प्रदेशातील नागरोटा बागवान येथील शासकीय पदवी महाविद्यालय मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुलांच्या उपांत्य फेरीचा थरार
पहिल्या उपांत्य फेरीत गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात रंगलेला सामना अत्यंत चुरशीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना, गोव्याने ६ षटकांत ३३/६ धावा केल्या. शौर्य गावडे (१२) आणि चिन्मय केरकर (१२) यांनी थोडीफार चमक दाखवली. उत्तरादाखल, महाराष्ट्राचा संघ ५.५ षटकांत अवघ्या २२ धावांवर गारद झाला. गोव्याच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत महाराष्ट्राच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. चिन्मय केरकर (२/८), सनम कळंगुटकर (१/७), शौनक नाईक (२/१) आणि शौर्य गावडे (२/५) यांनी जबरदस्त गोलंदाजी करत गोव्याला ११ धावांनी विजय मिळवून दिला.
मुलांच्या अंतिम सामन्यात दिल्लीचा धुव्वा
अंतिम सामन्यात गोव्यासमोर दिल्लीचे आव्हान होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीचा डाव ५.४ षटकांत अवघ्या २८ धावांवर संपुष्टात आला. गोव्याच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल केली. शौनक नाईक (३/५), चिन्मय केरेकर (१/८), सनम कळंगुटकर (१/१०) आणि शौर्य गावडे (२/५) यांनी दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. प्रत्युत्तरात, गोव्याने विजयाचे लक्ष्य अवघ्या २.२ षटकांत, एकही विकेट न गमावता पार केले आणि ३३ धावा कुटल्या. साईश नाईकने एकहाती किल्ला लढवत २४ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. साईश नाईकला अंतिम सामन्याचा 'सामनावीर' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मुलींच्या अंतिम सामन्यात गोव्या बाजी!
मुलींच्या अंतिम सामन्यात गोव्यासमोर महाराष्ट्राचे आव्हान होते. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचा डाव ५.१ षटकांत अवघ्या २४ धावांत आटोपला. गोव्याच्या मुलींच्या गोलंदाजीचा तोफखाना पुन्हा धडाडला. संध्या राय (३/५), प्रतीक्षा केरकर (२/६), पूर्वा गावडे (१/८) आणि अंतरा नाईक (१/०) यांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. उत्तरादाखल, गोव्याने फक्त २ षटकांत २५/१ धावा करून ७ गडी राखून सहज विजय मिळवला. संध्या रायने आपल्या अष्टपैलू कामगिरीने 'सामनावीर' पुरस्कार पटकावला.
संघातील मुख्य खेळाडू
मुलांचा संघ
- शौर्य गावडे
- चिन्मय केरकर
- शौनक नाईक
- सनम कळंगुटकर
- साईश नाईक
मुलींचा संघ
- संध्या राय
- प्रतीक्षा केरकर
- पूर्वा गावडे
- अंतरा नाईक