अॅम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाने दिला होता नकार.सरकारच्या योजना केवळ कागदावरच ? सोशल मिडियावर लोकांनी व्यक्त केला संताप.
कंधमाल : आधुनिक आरोग्य सुविधांचा दावा करणाऱ्या यंत्रणेची पोलखोल करणारी एक हृदयद्रावक घटना ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात उघडकीस आली आहे. दारिंगबाडी भागातील एका गर्भवती महिलेचा मृत्यू उपचारादरम्यान झाला, परंतु मृतदेह घरी नेण्यासाठी ना अॅम्ब्युलन्स मिळाली, ना कोणतीही सरकारी मदत. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ८ किमी अंतर तिचा मृतदेह खांद्यावर वाहून नेला.
नेमके प्रकरण काय ?
मृत महिलेचे नाव सुनीमा प्रधान (वय अंदाजे २८) असून, ती काजुरी पादेरी गावातील रहिवासी सुरेंद्र प्रधान यांची पत्नी होती. तब्येत बिघडल्याने तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाकडे अॅम्ब्युलन्सची मागणी केली, पण कोणतीही सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही. कुटुंबीयांनी सांगितले की, अनेक वेळा विनंती करूनही त्यांना रुग्णालयाच्या प्रसंसनाने कुठलेही वाहन उपलब्ध करून दिले नाही. अखेर, कुटुंबातील पुरुषांनी आणि नातेवाइकांनी मिळून सुनीमा यांचा मृतदेह कापडात गुंडाळून खांद्यावर घेतला आणि ८ किलोमीटरचे अंतर पायी पार करत गावात पोहोचवले.
या घटनेमुळे २०१६ मध्ये कालाहांडी जिल्ह्यातील दाना माझी प्रकरणाची आठवण ताजी झाली. येथे एका गरीब व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन १० किलोमीटर प्रवास केला होता. त्या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या दुर्दैवी घटनेपासून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गावकऱ्यांमध्ये संताप : चौकशीची मागणी
या घटनेनंतर संपूर्ण गावात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, राज्य सरकारने या प्रकाराची चौकशी करून अशा घटना पुन्हा होऊ नयेत याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.
सरकारच्या योजना केवळ कागदावर?
जननी सुरक्षा योजना, मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा योजना आणि सुविधांचा अनेकदा प्रचार केला जातो, परंतु अंमलबजावणीत मोठी कुचराई दिसून येते. याप्रकरणातही आरोग्य यंत्रणेचा दायित्वशून्यपणा स्पष्टपणे समोर आला आहे. सोशल मीडियावर देखील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही केवळ एका महिलेची शोकांतिका नाही, तर एका ढासळलेल्या व्यवस्थेचे दर्शन आहे. अशा घटनांनी आपण सर्वांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे, असे मत अनेक युजर व्यक्त करत आहेत.