कर्नाटक सरकारकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
पणजीः रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या बंगळूरू संघाने विजेतेपद पटकावले. या जेतेपदाचा विजयी सोहळा (RCB celebration bangalore) सुरू असताना बंगळूरू येथे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात गेलेले ११ जणांचे बळी यामुळे विजयोत्सवाला डाग लागल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
ही चेंगराचेंगरी का झाली? कशी झाली? याबाबतच्या चौकशीच्या फेऱ्यांनंतर 'फ्री पासेस' अर्थात 'मोफत तिकिटे' वाटपाची अफवा चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत असल्याची बाब उघड झाली आहे. स्टेडियमच्या गेट क्रमांक ७ जवळ मोफत तिकिटे दिली जात असल्याची अफवा काही क्षणांत स्टेडियम बाहेर पसरली. ही माहिती मिळताच, हजारो चाहते ७ नंबरच्या गेटकडे गर्दी करू लागले. विशेषतः विराट कोहली (Virat Kohli) व RCB संघाच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकाच वेळी प्रवेशद्वार गाठले आणि तिथूनच सुरू झाले मृत्यूचे तांडव.
आरसीबी संघाच्या कौतुक सोहळ्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी व्यवस्था करण्यात आली होती. पण दुर्दैवाने कर्नाटक सरकारने स्टेडियमबाहेर गर्दीचं नियंत्रण करण्यासाठीच्या व्यवस्थेमध्ये केलेला ढिसाळपणा मात्र या घटनेनंतर उघड झाला आहे. गेट क्रमांक १ व ३ वर प्रामुख्याने ही गर्दी उसळल्याचं दिसून आलं. संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी गेट क्रमांक १ उघडण्यात आलं आणि तिथून चाहत्यांना मोफत प्रवेश देण्यात येऊ लागले. यातून मोठी गर्दी त्या दिशेनं वळली आणि त्या गेटच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली.
गेट क्रमांक ७ वर अधिक चेंगराचेंगरी
मात्र त्यानंतर स्टेडियमच्या गेट क्रमांक ७ वर मोफत तिकीटे मिळत असल्याची माहिती चाहत्यांना मिळाली आहे ती सगळी गर्दी ७ नंबरच्या गेटकडे वळली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेमुळे पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी ५ हजारहून अधिक कर्मचारी तैनात केल्याचा दावा केला. मात्र तरीही ही दुर्घटना टळली नाही.
सरकारकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
या घटनेनंतर कर्नाटकचे सरकारनं या दुर्घटनेवर दिलगिरी व्यक्त केली असली, तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'एवढी गर्दी तिथे येईल याचा अंदाजच सरकारला नव्हता' अशी भूमिका मांडत जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे.