कोल्हापूरात अमानुषतेचा कळस! ४० वर्षीय महिलेला कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून लावले कुलूप

पोलीस चौकशीत प्रकार उघड,

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
31st May, 01:07 pm
कोल्हापूरात अमानुषतेचा कळस! ४० वर्षीय महिलेला कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून लावले कुलूप

कोल्हापूरः एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमधील राजारामपुरी भागात उघडकीस आली आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली असून तिची प्रकृती बिघडलेली असल्याने तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार साळी यांच्या कुटुंबातील सदर महिलेला ती दोन वर्षांची असताना पोलिओ झाला होता. अपंगत्वावर मात करत तिने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. पण काही दिवसांपासून मानसिक स्थिती अचानकपणे बिघडत गेल्याने तिचे स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण उरले नाही.

कोणालाही दगड मारणे, वाटेत वाहने अडविणे, दुकानांत शिरून तोडफोड अशा तिच्या कृतीमुळे तक्रारी वाढत चालल्या होत्या. यावर उपाय म्हणून तिच्या भावाने तिला घरातच ठेऊन तिला जेवण-खाणे देणे सुरू होते. गल्लीतील नागरिकांनाही हे जाणवत होते.

मात्र दीड महिन्यापासून या मनोरुग्ण महिलेच्या हातात, गळ्यात साखळी बांधून, तीन कुलुपांनी तिला बंदिस्त करून ठेवल्याच्या प्रकाराची पोलिसांना कुणकुण लागली. पोलीस सदर कुटुंबाच्या घरी चौकशीसाठी पोहोचताच हा संतापजनक प्रकार समोर आला. मानसिक स्थिती बिघडल्याने सारिका यांना उपचारांची आवश्यकता होती. तिला एखाद्या रुग्णालयात दाखल करून उपचार दिले असते, तर सुधारणा झाली असती. परंतु, अशाप्रकारे साखळीने बांधून घालणे ही अमानुषता असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

महिलेने कथन केली परिस्थिती
दौलतनगरातील पाथरवट वसाहतीत ही महिला भाचा, तिचे भाऊ आणि भावाची पत्नी यांच्यासोबत राहते. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बांधलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती ती महिला देत आहे. तिची प्रकृती बिघडलेली असल्याने तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.

हेही वाचा